‘भगतसिंह कोश्यारी यांचं पार्सल महाराष्ट्रातून परत पाठवण्याची वेळ आलीय’, मनसेचा घणाघात

| Updated on: Nov 19, 2022 | 6:34 PM

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटलंय.

भगतसिंह कोश्यारी यांचं पार्सल महाराष्ट्रातून परत पाठवण्याची वेळ आलीय, मनसेचा घणाघात
Follow us on

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटलंय. छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या कराळातील आदर्श, असं वादग्रस्त विधान त्यांनी केलंय. त्यांच्या या विधानावरुन मनसेचे नेते गजानन काळे यांनी खोचक शब्दांमध्ये टीका केलीय. “आता या भगतसिंह कोश्यारींचं पार्सल महाराष्ट्रातून परत पाठवण्याची वेळ आलीय”, असा घणाघात गजानन काळे यांनी केलाय.

गजानन काळे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर व्हिडीओ शेअर करत आपली भूमिका मांडली आहे. “छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे जुन्या काळातील आदर्श असं म्हणत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी परत एकदा माती खाल्ली आहे”, अशी टीका गजानन काळे यांनी केली.

हे सुद्धा वाचा

“भगतसिंह कोश्यारी यांचा परत एकदा तोल गेलाय. खरंतर राज्यपालांना ज्या विषयातलं कळत नाही त्या विषयांत आपण ज्ञान का पाजळताय? महाराष्ट्राच्या राज्यपालांनी सुधारायचं नाही, असं ठरवलेलं दिसतंय का?”, असे सवाल करत त्यांनी निशाणा साधला.

 

“आता या भगतसिंह कोश्यारींचं पार्सल महाराष्ट्रातून परत पाठवण्याची निश्चित वेळ आलीय”, अशी टीका गजानन काळे यांनी केली.

भगतसिंह कोश्यारी नेमकं काय म्हणाले?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदवीदान समारंभात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी बोलत होते. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि भाजप नेते नितीन गडकरी यांनी डीलिट पदवी देऊन गौरवण्यात आलं. यावेळी भाषण करताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नितीन गडकरी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी केली.

“आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो. तेव्हा आम्हाला आमचे शिक्षक विचारायचे तुमचा आवडता नेता कोण आहे? तेव्हा ज्यांना सुभाषचंद्र बोस आवडायचे, ज्यांना गांधीजी आवडायचे आणि नेहरू आवडायचे ते त्यांची नावे घ्यायची. मला आता असं वाटतं तुम्हाला कोणी विचारलं तुमचा आयकॉन कोण? तुमचा आवडता नेता कोण? तर तुम्हाला बाहेर जायची गरज नाही. महाराष्ट्रातच तुम्हाला भेटून जातील. शिवाजी महाराज तर जुन्या काळातील आहेत. मी आधुनिक काळाबाबत बोलत आहे. इथेच मिळतील. डॉ. आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला सर्व इथेच मिळून जातील”, असं विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं.

राज्यपालांच्या विधानावर संभाजीराजेंचा आक्षेप

राज्यपालांनी केलेल्या विधानावर माजी खासदार संभाजीराजे यांनी आक्षेप घेत संताप व्यक्त केलाय. “राज्यपाल असं का बडतात मला माहीत नाही. त्यांना महाराष्ट्रातून पाठवून द्या, असं मी परवा सुद्धा म्हटलं होतं. मी पंतप्रधानांना हात जोडून विनंती करतो, प्लीज प्लीज अशी व्यक्ती महाराष्ट्रात नकोय आम्हाला. शिवाजी महाराज असतील इतर महापुरुष असतील संत असतील यांच्याबाबत घाणेरडा विचार घेऊन राज्यपाल येऊच कसे शकतात?”, असा सवाल संभाजी छत्रपती यांनी केला आहे.