
शनिवार, १४ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबईतील मुलुंड (पश्चिम) भागात भीषण अपघात झाला. मेट्रो लाइन ४ (ग्रीन लाइन) च्या बांधकामादरम्यान उंचावरील पॅरापेट (काँक्रीटचा भाग) खाली पडून एका चालत्या ऑटो रिक्षावर आदळला. ही घटना दुपारी सुमारे १२:१५ वाजता LBS रोडवर, मुलुंड अग्निशमन केंद्राजवळील राजीव (मिलान) स्ट्रीट भागात, पियर क्रमांक P196 जवळ घडली. या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तर तीन ते चार जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आता मृत व्यक्तीबाबत मोठी माहिती समोर आली आहे.
कोण आहे मृतव्यक्ती?
उत्तर प्रदेशच्या जौनपुर जिल्हातील सरपंच रामधनी यादव आणि माजी सरपंच महेंद्र यादव मुंबईत फिरण्यासाठी आले होते. मुलुंड परिसरात सरपंच यादव यांच्या मित्राचे ऊसाच्या रसाचे दुकान आहे. याच दुकानामधून कळव्यातील एका नातेवाईकाच्या घरी लग्नासाठी सरपंच आणि माजी सरपंच रिक्षाने निघाले होते. मात्र दुपारी साडेबाराच्या सुमारास मेट्रोचा सिमेंट ब्लॉक कोसळून सरपंच रामधन यादव यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सरपंच मुंबईत फिरण्यासाठी आले होते. मात्र, या मेट्रोचा सिमेंट ब्लॉक रिक्षावर कोसळल्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
MMRDA चे अधिकृत स्पष्टीकरण
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) ने या दुर्घटनेबाबत स्पष्ट केले आहे की, मेट्रो मार्ग 4च्या बांधकामादरम्यान ही घटना घडली. अपघातानंतर मेट्रोचे अधिकारी, कर्मचारी आणि यंत्रणा तात्काळ घटनास्थळी पोहोचल्या आणि जखमींना मदत पुरवली. MMRDA ने सांगितले की, “आम्ही अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे. वेगळ्या टीममार्फत चौकशी करून दोषी आढळल्यास लगेचच कठोर कारवाई केली जाईल.”
काँग्रेस नेत्या आणि खासदार वर्षा गायकवाड यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झालाय का? आज दुपारी मुलुंड पश्चिम, एलबीएस रोडवर जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीजवळ मेट्रोच्या निर्माणाधीन पिलरचा भाग कोसळून मोठी दुर्घटना घडली. यात एक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला असून काही जण गंभीर जखमी झाले आहेत. सरकार आणि एमएमआरडीए प्रशासनाला काही देणंघेणं आहे की नाही? फक्त इन्फ्रा मॅन म्हणून PR करायचे, मार्केटिंग करायचं पण मुंबईकरांचा जीव टांगणीला लागला आहे, त्याच काय? असा सवाल वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केला आहे.
पुढे त्या म्हणाल्या, मेट्रोचे काम सुरू असताना सुरक्षेचे नियम फक्त कागदावरच का? वर्दळीच्या रस्त्यावर काम सुरू असताना खालून जाणाऱ्या वाहतुकीसाठी पुरेशी सुरक्षा व्यवस्था का नव्हती? मेट्रोची कामं वेगाने होत आहेत, हे दाखवण्याच्या नादात त्याचा दर्जा आणि तांत्रिक सुरक्षेकडे दुर्लक्ष होतंय का? जबाबदारी कोणाची? दरवेळी अशा घटना घडल्यानंतर फक्त ‘चौकशी’चं नाटक होतं. याची जबाबदारी कोण घेणार? विकास हवाय, पण तो मुंबईकरांच्या जीवावर बेतणारा नको!