Mumbai Building Collapse | मुंबईत रहिवाशी इमारतीचा भाग कोसळला, चौघांना सुखरुप बाहेर काढण्यात यश

| Updated on: Jul 16, 2020 | 7:34 PM

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसराजवळ फोर्ट भागात एका इमारतीचा भाग कोसळला

Mumbai Building Collapse | मुंबईत रहिवाशी इमारतीचा भाग कोसळला, चौघांना सुखरुप बाहेर काढण्यात यश
Follow us on

मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसराजवळ (Mumbai Building Collapse) फोर्ट भागात एका इमारतीचा भाग कोसळला. तुफान पावसामुळे भानुशाली या इमारतीचा काही भाग कोसळला आहे. अग्निशमन दलाच्या 14 गाड्या आणि जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. ही इमारत धोकादायक होती, तिला नोटीसही बजावण्यात आली होती, अशी माहिती मिळत आहे. संध्याकाळी पावणे पाचच्या सुमारास इमारतीचा काही भाग कोसळला (Mumbai Building Collapse).

आतापर्यंत या इमारतीच्या ढिगाऱ्याखालून चौघांना सुखरुप बाहेर काढण्यात जवानांना यश आलं आहे. सध्या जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. या ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकले असल्याची माहिती आहे. या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहे. त्याशिवाय एनडीआरएफची टीमही घटनास्थळी दाखल झाली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

भानुशाली ही इमारत सहा मजली आहे. आज या इमारतीचा 40 टक्के भाग कोसळला. मुंबईत गेल्या तीन दिवसापासून जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे धोकादायक इमारतींचे भाग कोसळत आहेत. कालही मरिन लाईन परिसरातील एका इमारतीचा भाग कोसळला होता.

फोर्ट भागात अशा अनेक जुन्या आणि मोठ्या इमारती आहेत. आज काही भाग कोसळलेल्या भानुशाली इमारतही जुनी आणि धोकादायक होती. मात्र तरीही या इमारतीत लोक राहत होते.

मुंबईतील मालाड भागात अब्दुल हमीद मार्गावर असलेल्या एका चाळीचा काही भागही सकाळी कोसळला होता. या दुर्घटनेतून चौघांना वाचवण्यात आले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

इमारतीत 20 जण अडकल्याची भीती

“भानुशाली ही चार मजली रहिवाशी आणि व्यावसायिक इमारत आहे, या इमारतीचा 40 टक्के भाग कोसळला, काही लोक अडकले आहेत, त्यांना बाहेर काढलं जात आहे, आतमध्ये किती लोक आहेत अंदाज नाही, 20 लोक असण्याचा अंदाज आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली होती.

Mumbai Building Collapse

मालकांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा : महापौर किशोरी पेडणेकर

“भानुशाली या इमारतीचा भाग कोसळला आहे. म्हाडाचे अधिकारी पोहोचले आहेत. मी स्वत: घटनास्थळी जात आहे. या इमारतींबाबत मी सोमवारी मीटिंग घेत आहे. सध्या घटनास्थळी जाऊन माहिती घेईन”, असं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

“मला मिळालेल्या माहितीनुसार, या इमारतीचा एक मालक आहे. त्याला महापालिकेकडून नोटीस देण्यात आली होती. पण इमारतीचा मालक आणि रहिवासी यांच्यात याविषयी चर्चा झालेली नसेल. मालकाने याबाबत रहिवाशांना माहिती दिली पाहिजे होती. इमारतीचं काम करायला हवं होतं. ही चालढकल झाली आहे. आता या दुर्घटनेनंतर नेमके किती जण अडकले आहेत ते कळत नाही. आताच एक मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. त्यामुळे जे चालढकल करतात अशा मालकांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा.”

“सगळ्याच प्राधिकरणाने एकत्र येऊन अशा मालकांवर कारवाई केली पाहिजे. आम्ही नोटीसा दिल्या. नवीन बांधकामासाठी परवानगी देखील दिल्या. इमारतीच्या मालकाची डागडुग किंवा नव्याने बांधण्याची जबाबदारी आहे”, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

इमारतीतून बाहेर काढलेले नागरिक रस्त्यावर येणार नाहीत : जितेंद्र आव्हाड

“जखम झाली आहे. त्यावर अगोदर औषधोपचार करुया. जखम झाली कशी हा नंतरचा भाग आहे. चार लोकांना आतापर्यंत बाहेर काढले आहेत. आणखी एक अडकल्याची माहिती मिळत आहे. बाजूच्या इमारतीमधील नागरिकही बाहेर काढण्यात येत आहेत. इमारतीतून बाहेर काढलेले नागरिक रस्त्यावर येणार नाहीत. कुणालाही रस्त्यावर सोडण्यात येणार नाही याची जबाबादारी सरकारची आहे. सरकार त्यापासून लांब जाणार नाही”, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंदिर आव्हाड यांनी दिली.

“नोटीस दिल्यानंतरही काही लोकं ऐकत नाहीत. घर हे माणसाच्या आयुष्याची कमाई असते. त्या घराशी त्याचं एक ऋणानुबंध असतं. पण त्याला हे कळत नाही की, त्याच्या मृत्यूचं ते कारण ठरु शकतं. अशा प्रकरणांमध्ये मालकांना जबाबदार ठरवून पुनर्विकास कसा करता येईल, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करुन यावर लवकरच निर्णय घेऊ”, असंही ते म्हणाले.

Mumbai Building Collapse

संबंधित बातम्या :

पुण्यात जोरदार वाऱ्यासह तुफान पाऊस, मोबाईल टॉवर कोसळला