Mumbai Rains : पुढील दीड महिना नो टेन्शन! मुंबईतील पाणीसाठ्यात कमालीची वाढ

| Updated on: Jun 13, 2021 | 8:35 AM

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार, भातसा या सात धरणांचा समावेश होते. (Mumbai Lake Water Level Increase after heavy rain)

Mumbai Rains : पुढील दीड महिना नो टेन्शन! मुंबईतील पाणीसाठ्यात कमालीची वाढ
Mumbai Powai Lake
Follow us on

मुंबई : गेल्या चार-पाच दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे मुंबईतील पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाली आहे. मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांच्या पाणी साठा हळूहळू वाढत आहे. सध्या झालेल्या पावसामुळे मुंबईत जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पुढील दीड महिना तरी मुंबईकरांची पाण्यासाठीची चिंता मिटली आहे. (Mumbai Lake Water Level Increase after heavy rain)

मुंबईसह उपनगरातही पावसाचा जोर कायम

गेल्या चार दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे. मुंबईत दादर, सायन, माटुंगा, लोअर परेल, मरिन ड्राईव्ह यासारख्या भागात पावसाची रिपरिप सुरु आहे. तर दुसरीकडे मुंबईसह उपनगरातही पावसाचा जोर कायम आहे. मुंबईसह ठाणे, नवी मुंबईतही जोरदार पाऊस पाहायला मिळत आहे. सतत कोसळणाऱ्या या पावसामुळे मुंबईतील पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाली आहे.

पुढील दीड महिना मुंबईकरांची चिंता मिटली

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार, भातसा या सात धरणांचा समावेश होते. या धरणांतून मुंबईला दररोज तीन हजार 800 दशलक्ष लीटर एवढा पाणीपुरवठा होतो. सततच्या पावसामुळे तलावांमध्ये एकूण एक लाख 85 हजार 981 दशलक्ष लीटर इतका पाणीसाठा शिल्लक आहे. हा साठा जुलैपर्यंत पुरेल एवढा आहे. त्यामुळे पुढील दीड महिना मुंबईकरांची चिंता मिटली आहे.

तलावांतील पाणीसाठा (दशलक्ष लीटर)

मोडकसागर- 43,393
तानसा – 18,827
मध्य वैतरणा – 26, 676
भातसा – 81,684
विहार – 14,176
तुळशी – 4,217

पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता

मुंबईत जोरदार बॅटिंग करत असलेल्या पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. येत्या चार ते पाच दिवसांत मुंबई आणि कोकण परिसरात आणखी मुसळधार पाऊस (Rain) पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या दोन्ही परिसरात हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे.

जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यातील अनेक भागात पावसाची दमदार बॅटिंग सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने आज संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा अलर्ट दिला आहे. आज मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केला गेला आहे.

मुंबई हवामान विभागाचे उपसंचालक के.एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबच्या पट्टा तयार झाल्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर त्याचा परिणाम पाहायला मिळेल. त्यामुळे येत्या चार ते पाच दिवसांत किनारपट्टीलगत असणाऱ्या भागांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Mumbai Lake Water Level Increase after heavy rain)

संबंधित बातम्या : 

दाणादाण! मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात पावसाची जोरदार बॅटिंग; सखल भागात पाणी भरले, रस्तेही पाण्याखाली!

तुम्ही मुंबईवरुन पुण्याला ई-पासशिवाय जाऊ शकताय? पाहा महाराष्ट्राचा लेव्हलवाईज अनलॉक प्लॅन…

Mumbai Rain Live Updates | मुंबईत पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात, सायन पुलाखाली पाणी साचलं