आहेरच्या रकमेतून फुटपाथवरील गरीबांना धान्यदान, नवविवाहित जोडप्याने जपली सामाजिक बांधिलकी

| Updated on: Jul 03, 2021 | 10:27 AM

मित्रांच्या आहेरातून आणि लग्नाची वरात न काढता त्याच पैशांतून फुटपाथवर संसार मांडलेल्या 60 कुटुंबियांना धान्यदानाचे सत्कार्य करुन लग्नसोहळ्यातही सामाजिक बांधिलकी जपण्याचं आदर्श उदाहरण लोकांसमोर ठेवलंय प्रभादेवीच्या प्रफुल्ल गावडेने (Mumbai Newly Weds Donate Food Grains To The Poor From The Money Collected In Marriage As Aher).

आहेरच्या रकमेतून फुटपाथवरील गरीबांना धान्यदान, नवविवाहित जोडप्याने जपली सामाजिक बांधिलकी
Newly Married Couple
Follow us on

मुंबई : इच्छा असेल तर मार्ग सापडतोच, हे खरं आहे. आपल्या संसाराची सुरुवात करताना आपल्याला मिळालेल्या मित्रांच्या आहेरातून आणि लग्नाची वरात न काढता त्याच पैशांतून फुटपाथवर संसार मांडलेल्या 60 कुटुंबियांना धान्यदानाचे सत्कार्य करुन लग्नसोहळ्यातही सामाजिक बांधिलकी जपण्याचं आदर्श उदाहरण लोकांसमोर ठेवलंय प्रभादेवीच्या प्रफुल्ल गावडेने (Mumbai Newly Weds Donate Food Grains To The Poor From The Money Collected In Marriage As Aher).

“तुम्ही मला जो लग्नाचा आहेर देणार आहात, तो मंडळाच्या सामाजिक कार्यासाठी दिलात तर मला जास्त आनंद होईल,” असा मेसेज आपल्या मित्रांना लग्नाच्या आदल्या दिवशी टाकला आणि आपल्या वरातीचा प्लॅन रद्द करत त्याचा खर्चही प्रफुल्लने मंडळाला दिला. गरीब आणि गरजू लोकांप्रती असलेली त्याची भावना पाहून त्याच्या मित्रमंडळींनी त्याच्याच इच्छेनुसार आहेर आणि वरातीच्या जमा झालेल्या पैशातून गरीबांसाठी धान्य विकत घेतले आणि लग्नबंधनात अडकल्यानंतर गावडे नवदाम्पत्यांच्याच हस्ते वडाळा पश्चिमेला फुटपाथवर राहात असलेल्या 60 गरीब कुटुंबियांना धान्यदान करण्याचे अनोखे सत्कार्य साकारले.

गेल्या 50 दिवसांपासून अन्नदान

गेले 50 दिवस प्रभादेवीच्या सौरभ मित्र मंडळाच्या माध्यमातून गरीब-गरजूंच्या मुखी अन्नाचे दोन घास लागावेत म्हणून प्रफुल्ल गावडे धडपडत होता. अन्नदान करत होता. कितीही अन्नदान केलं तरी ते कमीच होतं. लोकांची मागणीही धान्याचीच असायची. पण ती पूर्ण करण्याची क्षमता ना मंडळाची होती ना प्रफुल्ल गावडेची. त्यामुळे धान्यदान करता येत नव्हते. पण गरजूंना किमान 15 दिवसांचे तरी धान्य द्यायचे हा विचार त्याच्या मनात सारखा घोळत होता.

मंडळाच्या या सत्कार्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींकडून धान्याची मदतही मिळू लागली होती. मंडळाच्या माध्यमातून देह विक्रय करणाऱ्या महिला असो किंवा किन्नर असो किंवा फुटपाथवरचे गरीब असो किंवा रुग्णालयांबाहेरचे त्रस्त नातेवाईक आणि रुग्ण. मंडळाने या सर्वांना आपल्यापरीने अन्नदानही केले. पण हे अन्नदान करताना अनेकांची फक्त एक मागणी असायची ती म्हणजे धान्याची.

दुसरीकडे लॉकडाऊनमुळे अनेकदा लांबणीवर पडलेल्या प्रफुल्लच्या लग्नाची तयारीही जोरात सुरू होती. मित्रांचा लाडका असलेल्या प्रफुल्लला त्याच्या गरजेची महत्त्वाची वस्तू आहेर म्हणून देण्याची तयारी त्याचे मित्र करत होते. ही गोष्ट त्याच्यापर्यंत पोहोचली आणि त्यांच्या भावस्पर्शी मनाला हे खटकलं. माझ्यापेक्षा अधिक गरज त्या असंख्य गरीब-गरजू कुटुंबांना आहे, ज्यांच्याकडे खाण्यासाठी दोनवेळचे अन्नही नाही. मला आहेर नको, तेच पैसे तुम्ही गरीबांच्या मुखी अन्नाचे दोन घास लागावेत म्हणून धडपडणाऱ्या आपल्या मंडळाच्या उपक्रमासाठी वापरावेत, अशी इच्छा प्रफुल्लने व्यक्त करून त्याच पैशातून गरीब कुटुंबियांना धान्यदान करा, असे स्पष्ट संकेतही दिले.

वरातीचा खर्चही मंडळाला

एवढेच नव्हे तर त्याने आपल्या वरातीचा वायफळ खर्चही मंडळाला दिला. गरीबांप्रती असलेलं प्रेम पाहून त्याच्या मित्र मंडळींनीही जमा झालेल्या आहेराच्या रकेमतून तात्काळ तांदूळ, गहूपीळ, तूरडाळ, मूगडाळ, साखर, पोहे आणि तेल खरेदी केले आणि वडाळा पश्चिमेला रफिक किडवई मार्गावरील फुटपाथवर रहात असलेल्या 60 कुटुंबियांना धान्य देण्याचे निश्चित केले. दिवसभर चाललेल्या लग्नाच्या सर्व पवित्र विधी आणि स्वागत समारंभानंतर सायंकाळी गावडे दाम्पत्यांनी गरीब कुटुंबांना धान्यदानाचे सत्कार्य करून त्यांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा मिळवत आपल्या नव्या आयुष्याची सुरूवात केली.

Mumbai Newly Weds Donate Food Grains To The Poor From The Money Collected In Marriage As Aher

संबंधित बातम्या :

आधी लगीन लसीकरणाचं; मुलाच्या लग्नाचा पैसा नागरीकांच्या लसीकरणावर खर्च करणार, आमदार गणपत गायकवाडांचा नवा आदर्श

नवदाम्पत्याकडून कोव्हिड सेंटरला 50 बेड, लग्नाचा अनावश्यक खर्च टाळत रुग्ण सेवेसाठी मदत