पोलीस भरतीत हायटेक कॉपी, लेखी परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी काय केले उमेदवारांनी

| Updated on: May 26, 2023 | 3:55 PM

mumbai police recruitment : मुंबई पोलीस दलातील भरती प्रकरणात पोलिसांच्या चौकशीला सुरुवात झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाचवा गुन्हा दाखल केला आहे. मुंबईतील हायटेक कॉपी प्रकरणाची चौकशी चार उपायुक्त करत आहेत.

पोलीस भरतीत हायटेक कॉपी, लेखी परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी काय केले उमेदवारांनी
mumbai police bharti exam (फाईल फोटो)
Follow us on

गोविंद ठाकूर, मुंबई : महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी पोलीस भरतीसाठी प्रयत्न करतात. या परीक्षेत उत्तीर्ण होऊन महाराष्ट्र पोलीस दलात काम करण्याची अनेकांची इच्छा असते. पोलिसांची जबाबदारी आणि वर्दीबद्दल तरुणांच्या मनात एक वेगळाच आदर असतो. त्यामुळे लाखो विद्यार्थी परीक्षेसाठी अर्ज करतात. यापैकी काहींचे पोलीस होण्याचं स्वप्न पूर्ण होतं. तर काही तरुण पुन्हा नव्या जोमाने पोलीस भरतीच्या तयारीला लागतात. परंतु काही जण गैरप्रकाराचा अवलंब करतात. मुंबई पोलीस भरती परीक्षेत हायटेक कॉपी प्रकरण समोर आले होते. आता या प्रकरणी पाचवा गुन्हा दाखल झाला आहे.

विरोधकांकडून आरोप

मुंबई पोलीस भरतीत घोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी उमेदवारांकडून 10-12 लाख घेतले जात असल्याचा दावा केला होता. पोलीस दलात झालेल्या भरती प्रक्रियेतील गैरप्रकारांची विशेष चौकशी पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करण्याची मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पोलीस महासंचालकांकडे केली.

हे सुद्धा वाचा

काय झाला होता प्रकार

७ मे रोजी मुंबई पोलीस भरती लेखी परीक्षा पार पडली. या लेखी परीक्षेत बटन कॅमेरा आणि मायक्रो ब्ल्यूटूथचा वापर करून उमेदवारांनी कॉपी केल्याचे प्रकार समोर आला होता. स्पर्धा परीक्षा समन्वय समितीच्या आरोपानंतर हा प्रकार उघड झाला. मुंबई पोलीस भरतीचा हा हायटेक कॉपी प्रकरणी दहिसर पोलीस ठाण्यात पाचवा गुन्हा दाखल झाला आहे. परीक्षेनंतर झालेला गैरप्रकार समोर आल्यानंतर मुंबईत चार ठिकाणी गुन्हे दाखल झाले होते. आता स्पर्धा परीक्षा समन्वय समितीकडून मुंबई पोलिसांना देण्यात आलेल्या पुराव्यानंतर दहिसर पोलीस ठाण्यात पाचवा गुन्हा दाखल केला आहे.

चार उपायुक्तांकडून चौकशी
मुंबई पोलीस भरतीचा हायटेक कॉपी प्रकरणाची चौकशी मुंबईतील चार उपायुक्त करत आहेत. या सगळ्या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे आदेश राज्याच्या पोलीस महासंचालकांनी दिले आहेत. दरम्यान, या प्रकरणी संबंधित उमेदवार आणि त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहेत आरोप

  • पोलीस भरतीच्या लेखी पेपरवेळी हायटेक कॉफी करण्यात आली.
  • परीक्षा पेंद्रावर प्रवेश देताना काही उमेदवारांची बायोमेट्रिक घेतली गेली, तर काहींची घेतली नाही.
  • पोलीस पर्यवेक्षकांनी काही जणांना मोबाईलमध्ये उत्तरे सर्च करून दिली.
  • स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने पुराव्यासहित दहिसर पोलीस स्टेशन येथे यासंदर्भात तक्रार केलीय
  • उत्तरपत्रिकेवर कोणीही नाव व नंबर लिहू नये असा नियम असताना पर्यवेक्षकांनी काही उमेदवारांना नाव व नंबर लिहायला सांगितले.

हे ही वाचा

पोलीस भरतीत तो जीव तोडून धावला, अंतिम रेषाही गाठली, अन् जमिनीवर कोसळला