Mumbai Rains : मुंबईत पाणी तुंबणार नाही असा दावा केला नाही, करणारही नाही : महापौर किशोरी पेडणेकर

| Updated on: Jun 09, 2021 | 1:09 PM

Mumbai Rains : मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपून काढलंय. मुंबईतील परिस्थितीचा महापौर किशोरी पेडणेकर ( Kishori Pednekar) यांनी आढावा घेतला.

Mumbai Rains : मुंबईत पाणी तुंबणार नाही असा दावा केला नाही, करणारही नाही : महापौर किशोरी पेडणेकर
Mayor Kishori Pednekar
Follow us on

मुंबई : “मुंबईत पाणी साचणार नाही असा दावा आम्ही केला नव्हता. पण चार तासांच्या आत पण्याचा निचरा झाला नाही तर नालेसफाई काम चांगलं झालं नाही हे मान्य करावं लागेल”, असं महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai Mayor Kishori Pednekar) यांनी सांगितलं. आज एकाचवेळी हायटाईड, सतत मुसळधार पाऊस यामुळे पाणी तुंबलंय. हिंदमाता प्रकल्पाला कोरोनाच्या अडथळ्यांमुळे उशीर झाला. पण ही कारणं आम्ही देणार नाही, असंही किशोरी पेडणेकर म्हणाल्या. (Mumbai rains update We never claimed that Mumbai will not be flooded said Mayor Kishori Pednekar)

मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपून काढलंय. मुंबईतील परिस्थितीचा महापौर किशोरी पेडणेकर यांनी आढावा घेतला. दहिसर मिलन सब वे, हिंदमाता कायम पाण्याखाली जातं, पण आता पाणी साचलेलं नाही. पाण्याचा निचरा झाला आहे. पाणी भरणार नाही असा दावा आम्ही कधीच केला नाही, चार तासात पाण्याचा निचरा होतो, असं पेडणेकर यांनी नमूद केलं.

“पाणी भरणार नाही असा दावा कधीच कुणी केला नाही, आम्ही करणारही नाही. पाणी भरल्यानंतर चार तासाच्या आत निचरा झाला नाही, तर केलेलं काम योग्य नाही असं आम्हालाही म्हणायला पुष्टी मिळते. पण त्याचवेळी मुसळधार पाऊस, हायटाईड अशा वेळेला थोडसं थांबणे गरजेचं आहे. आज मुंबईत सोडून दुसरी शहरं मग पुणे असेल, तिथेही तुंबलं आहे. मग एकमेकावर ब्लेम गेम का?  मुंबईत चार तासापेक्षा जास्त पाणी थांबत नाही हे मात्र नक्की”, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

मुंबई दोन दोन दिवस, चार चार दिवस पाणी भरल्यानंतर ठप्प व्हायची. मात्र आता ती परिस्थिती नाही. आम्ही आताच्या घडीला सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. जिथे निष्काळजीपणा दिसेल, तिथे कारवाई होईल, असं पेडणेकर यांनी सांगितलं.

हिंदमाता प्रकल्प 

195, 137 मिली, 85 मिली पाऊस आला तर पाणी साचवून समुद्रात सोडलं जातं. 2005 पासून उपाययोजना आतापर्यंत करत आलो म्हणून आता परिस्थिती नियंत्रणात आली आहे. हिंदमाता प्रकल्पाला उशीर कारण कोरोनामुळे मनुष्यबळ कमी पडत आहे. विरोधकांना काय आरोप करायचे ते करू देत, आमचं काम सगळ्या जगाने पाहिलं आहे, असा दावा किशोरी पेडणेकर यांनी केला.

हायटाईड वैगरे असेल तर पाण्याचा निचरा थोडा उशीरा होतो. इतर शहरांमध्ये पाणी तुंबलेलं दिसतं. चार तासांच्या आत पण्याचा निचरा झाला नाही तर नालेसफाई काम चांगलं झालं नाही हे मान्य करावं लागेल, असंही त्यांनी नमूद केलं.

VIDEO :  महापौर नेमकं काय म्हणाल्या? 

(We never claimed that Mumbai will not be flooded said Mayor Kishori Pednekar)