‘त्या’ बड्या नेत्याचं तिकीट कापून महाराष्ट्रातून लढावं, असं मोदींच्या डोक्यात; संजय राऊतांचा मोठं विधान

Sanjay Raut on Nitin Gadkari PM Narendra Modi and BJP : नागपूर अन् लोकसभा निवडणूक...; संजय राऊत यांचं स्पष्ट भाष्य, म्हणाले, नितीन गडकरींचं तिकीट कापून नागपुरातून लढावं, असं मोदींच्या डोक्यात... ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांची पत्रकार परिषद... नेमकं काय म्हणाले? वाचा...

त्या बड्या नेत्याचं तिकीट कापून महाराष्ट्रातून लढावं, असं मोदींच्या डोक्यात; संजय राऊतांचा मोठं विधान
आयेशा सय्यद | Updated on: Mar 10, 2024 | 12:44 PM

गणेश थोरात, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, मुंबई | 10 मार्च 2024 : शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपवर घणाघाती टीका केली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचं नाव घेत संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. आधी तुमची जागावाटप नीट करा. माझ्या माहितीनुसार महाराष्ट्रात भाजप पक्ष आणि त्यांचे दोन डंपर त्यांच्या हातून निसटतोय. यामुळे महाराष्ट्रातून जाऊन लोकांनी मोदींना विनंती केली आहे की, तुम्ही महाराष्ट्रातून निवडणूक लढा आणि मोदी ती ऑफर स्वीकारत आहेत. मोदी महाराष्ट्रातून लढले तर यांना चार-पाच जागा मिळतील. नितीन गडकरींचं तिकीट कापून नागपूरातुन लढावं असं मोदींच्या डोक्यात आहे, असं संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत काय म्हणाले?

आधी कट्यार कमरेला बाळगायला शिका. चाकू सूरेवाले आम्ही लोक आहोत. ही शिवसेना चाकू सूऱ्यातून वाढलेली आहे म्हणून आम्हाला शिकवू नका कट्यारची नाटकी… जर आमची कट्यार घुसली ना ती कुठे घुसते त्यांना माहिती आहे आणि कोणत्या भोकात घुसते ती… आम्ही सर्व मिळून 40 च्या वर जागा जिंकणार आहोत आणि ते जर रोखायचं असेल तर मोदींनी महाराष्ट्रातून नागपूर किंवा पुण्यातून निवडणूक लढावी ही त्यांची भीती आहे,असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.

फडणवीसांवर निशाणा

कोणाचा डंपर पलटी होतोय आणि कोणाचा @x#वर जातोय हे कळेल आता.. तुकारामांच्या अभंग गाथा या लोकांनी वाचाव्यात. डुक्कर कितीही चिखलात लोळलं आणि त्याला सांगितलं तुम्ही स्वर्गात येता काय़ तर तो म्हणेल चिखलच माझं स्वर्ग आहे ही डुकराची नीती भाजप पक्षाची आहे. हे चिखलात लोळत आहेत. आमच्याबरोबर असताना हे स्वर्गात होते. स्वर्ग सुखात आनंद घेत होते. आज त्यांच्या बाजूला दोन डबकी आहेत त्या डबक्यात हे डुकर लोळत आहेत. फडणवीस यांची सध्याची जी काय वचवच सुरू आहे, हे त्यांचं नैराश्य आहे. निराश झालेला माणूसच अशा प्रकारे बोलू शकतो, असं म्हणत संजय राऊतांनी फडणवीसांवर टीका केली आहे.

राऊतांचं टीकास्त्र

उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात ज्याप्रकारे तुफान निर्माण केलंय त्या तुफानाची यांना भीती वाटतेय. उद्धव ठाकरे आणि आमचा पक्ष संपवण्याचा प्रयत्न या फडणवीसछाप सरकारने केला पण काही फायदा झाला नाही. ज्यांच्या कचऱ्याच्या डंपरमध्ये हे बसले आहेत. जो डंपर आहे तो कचऱ्याचा डंपर आहे या कचऱ्याच्या डंपर मध्ये बसून भाजप पक्षाचा प्रवास जर सुरू असेल. तर महाराष्ट्र हा डंपिंग ग्राउंड नाही तर सगळा कचरा या डंपरसह महाराष्ट्राच्या सीमापार गुजरात मध्ये जाऊन आम्ही टाकणार आहोत. हे मी फडणवीस यांना सांगू इच्छितो, असं म्हणत राऊतांनी टीका केली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us