Eknath Shinde : मुंबई, सुरत आणि आता आसाम, पण पहिली थेट प्रतिक्रिया टीव्ही 9 मराठीशी, शिंदेंच्या फोनोतले 5 मोठे मुद्दे

| Updated on: Jun 22, 2022 | 9:53 AM

परतीचे दोर कापले असल्याचेही स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत. आपल्याकडे आमदारांचे संख्याबळ अधिक असल्याचा दावा त्यांनी केला आहे. अर्थात संख्याबळ सिद्ध होईपर्यंत घटनेनुसार याबाबत कोणताही राजकीय निर्णय होऊ शकत नाही.

Eknath Shinde : मुंबई, सुरत आणि आता आसाम, पण पहिली थेट प्रतिक्रिया टीव्ही 9 मराठीशी, शिंदेंच्या फोनोतले 5 मोठे मुद्दे
एकनाथ शिंदे
Image Credit source: Facebook
Follow us on

मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत परतण्यास स्पष्ट नकार दिला आहे. विधान परिषद निवडणुकीनंतर नॉट रिचेबल झालेले एकनाथ शिंदे सुरत, अहमदाबादनंतर आसामधील गुवाहाटीत दाखल झाले. त्यानंतर त्यांनी टीव्ही 9ला प्रतिक्रिया देताना महत्त्वाच्या निर्णयांचा उलगडा केला आहे. हिंदुत्वाच्या (Hindutva) मुद्द्यावरून त्यांनी शिवसेनेवर अप्रत्यक्ष सवाल उपस्थित केला आहे. परतीचे दोर कापले असल्याचेही स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत. आपल्याकडे आमदारांचे संख्याबळ अधिक असल्याचा दावा त्यांनी केला आहे. अर्थात संख्याबळ सिद्ध होईपर्यंत घटनेनुसार याबाबत कोणताही राजकीय निर्णय होऊ शकत नाही. मात्र आज दुपारपर्यंत एकनाथ शिंदे हवाईमार्गे थेट राजभवनात (Raj Bhavan) येणार असल्याची माहिती आहे. या सर्व पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी टीव्ही 9सोबत साधलेल्या संवादातील पाच ठळक मुद्दे पाहू…

  1. 1. हिंदुत्व – आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलेले कार्यकर्ते आहोत. तर धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण आणि बाळासाहेबांचे हिंदुत्त्वाचे विचार आम्हाला पुढे घेऊन जायचे आहेत. मात्र सत्तेसाठी बाळासाहेबांच्या हिंदुत्त्वाशी आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही, आनंद दिघे आमच्यासाठी दैवत आहेत. त्यांना बाळासाहेबांनी हिंदुत्वाचे विचार दिले. तेच आम्हाला पुढे मिळाले. असे विधान एकनाथ शिंदे यांनी केले.
  2. 2. विकास – आम्हाला कोणावरही वैयक्तिक स्वरुपात टीका करायची नाही. आम्हाला विकासाचे राजकारण करायचे आहे. केवळ सत्ता म्हणून राजकारण करणार नाही. सध्याची शिवसेनेची भूमिका हिंदुत्वाचा अनुसरून नाही, असे वाटते. त्याचबरोबर विकासकामेही महत्त्वाची आहेत. विकासाचे राजकारण करण्यात आम्हाला रस आहे, असे ते म्हणाले.
  3. 3. संख्याबळाचा दावा – माझ्यासोबत कुणीही जोरजबरदस्तीने आलेले नाही. जवळपास 40पेक्षा जास्त आमदार आज सोबत आहेत. काल एक फोटो आणि व्हिडिओदेखील आलेला आहे. दोन तृतीयांश आमदारांहून जास्त संख्याबळ हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणे गरजेचे आहे. 37 हा आकडा एकनाथ शिंदे यांना गाठायचा होता. आता त्यांनी स्वतःच आपल्याकडे 40 आमदार असल्याचे म्हटले आहे.
  4. 4. उद्धव ठाकरे यांचा उल्लेखही नाही – शिवसेना नेमकी कुणाची, असा सवाल उपस्थित व्हावा अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली. ते म्हणतात, बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघेसाहेब आमचे दैवत आहे. त्यांच्या विचारांवर आम्ही चालणारी माणसे आहोत. तत्वांशी तडजोड मान्य नाही. हे सर्व बोलत असताना त्यांनी उद्धव ठाकरेचे नावही घेतले नाही.
  5. हे सुद्धा वाचा
  6. 5. आमदारांची भावना उद्धव ठाकरेंच्या कानी घातली होती, मात्र… – शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडून भाजपासोबत सत्ता स्थापन करावी, तत्वांशी तडजोड करू नये. आमदारांच्या मनातही हीच भावना आहे. त्यामुळे यासंबंधी निर्णय घेण्याची विनंती उद्धव ठाकरे यांनी केली होती. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही, अशी नाराजी एकनाथ शिंदेंनी व्यक्त केली.