मुंबईची वाहतूक कोंडी फुटणार, खासगी बसला आता नो एन्ट्री, मास्टर प्लॅन काय?

मुंबईतील वाहतूक कोंडी कायमची संपवण्यासाठी पालिकेने १,२३२ कोटींचा विशेष मास्टर प्लॅन तयार केला आहे. सर्व खाजगी ट्रॅव्हल्स बसेस मुंबईच्या वेशीवरच रोखल्या जाणार असून दहिसर नाक्यावर थ्री-स्टार हॉटेल, मॉल आणि भव्य पार्किंग हब उभारण्यात येणार आहे.

मुंबईची वाहतूक कोंडी फुटणार, खासगी बसला आता नो एन्ट्री, मास्टर प्लॅन काय?
mumbai bus
| Updated on: May 20, 2026 | 9:16 AM

मुंबई शहरात दररोज होणारी वाहतूक कोंडी आणि वाहनांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) एक अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि धाडसी पाऊल उचलले आहे. मुंबईत प्रवेश करणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्स आणि आंतरराज्य बसेसमुळे अंतर्गत रस्त्यांवर होणारी कोंडी फोडण्यासाठी पालिकेने १ हजार २३२ कोटी रुपयांचा सर्वसमावेशक आराखडा तयार केला आहे. या योजनेचा मुख्य भाग म्हणून मुंबईत येणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्स आता शहराच्या वेशीवरच रोखल्या जाणार आहेत. दहिसर येथील जुन्या जकात नाक्याच्या (Octroi Naka) जागेवर एक भव्य वाहतूक आणि व्यावसायिक केंद्र उभारले जाणार आहे.

मुख्य अडचण काय?

सध्या गुजरात, राजस्थान, दिल्ली आणि उत्तर भारतातून दररोज हजारो खाजगी आणि आंतरराज्य बसेस मुंबईत प्रवेश करतात. या बसेस बोरिवली, कांदिवली, अंधेरी, वांद्रे अशा मुख्य रस्त्यांवर किंवा उड्डाणपुलांखाली अनधिकृतपणे पार्क केल्या जातात. यामुळे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे (WEH), एस. व्ही. रोड आणि लिंक रोडवर वाहनांची प्रचंड कोंडी होते. तसेच प्रवाशांना चढवण्यासाठी आणि उतरवण्यासाठी या बसेस रस्त्यातच थांबत असल्यामुळे इतर वाहनांचा वेग मंदावतो. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पालिकेने आता एक मास्टर प्लॅन तयार केला आहे.

दहिसर ट्रान्सपोर्ट हबचे वैशिष्ट्ये

दहिसर चेकनाका येथील सुमारे १८,६०४ चौरस मीटर (साडेचार एकरपेक्षा जास्त) जागेवर हे भव्य हब उभारले जाईल. मुंबईबाहेरून येणाऱ्या सर्व खाजगी आणि आंतरराज्य लक्झरी बसेसना मुंबई शहराच्या अंतर्गत भागात प्रवेश करण्यास पूर्णपणे बंदी असेल. या सर्व बसेस दहिसर येथेच थांबवल्या जातील. या हबमध्ये एकाच वेळी ४५० आंतरराज्य बसेस पार्क करण्याची क्षमता असेल. याशिवाय, मुंबईकरांसाठी आणि प्रवाशांसाठी १,४०० खाजगी गाड्या (फोर-व्हीलर) पार्क करता येतील असे अत्याधुनिक बहुमजली पार्किंग (Multi-level Parking) उभारले जाईल.

लांब पल्ल्याचा प्रवास करून थकलेल्या प्रवाशांसाठी, तसेच चालक आणि वाहकांसाठी (Drivers & Cleaners) या हबमध्येच सर्व सुविधायुक्त थ्री-स्टार हॉटेल आणि डॉर्मिटरी (विश्रामगृहे) बांधली जातील. प्रवाशांच्या मनोरंजनासाठी आणि खरेदीसाठी येथे रिटेल शॉपिंग मॉल्स, फूड कोर्ट, रेस्टॉरंट्स, बँक्वेट हॉल्स आणि डिजिटल स्क्रीनसह आधुनिक प्रतिक्षालये (Waiting Lounges) असतील.

 प्रवासी मुंबईत पुढे कसे प्रवास करणार?

खाजगी बसेस दहिसरलाच थांबणार असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये, म्हणून या हबला ‘मल्टी-मोडल कनेक्टिव्हिटी’ दिली जाणार आहे. प्रवासी येथून पुढे जाण्यासाठी मेट्रो, बेस्ट बस, टॅक्सी, रिक्षा हा पर्याय अवलंबू शकतात. हे ट्रान्सपोर्ट हब मुंबई मेट्रो मार्ग ९ (दहिसर ते मिरा-भाईंदर) आणि मेट्रो मार्ग ७ (दहिसर ते अंधेरी पूर्व) यांच्या पांढुरंगवाडी इंटरचेंज स्टेशनला थेट जोडलेले असेल. त्यामुळे प्रवासी बसमधून उतरून थेट मेट्रो पकडू शकतील.

मुंबईच्या विविध भागांत जाण्यासाठी या हबमधून थेट विशेष बेस्ट बसेस सोडल्या जातील. ओला, उबर, काळी-पिवळी टॅक्सी आणि रिक्षा यांच्यासाठी स्वतंत्र पिक-अप आणि ड्रॉप-ऑफ झोन तयार केले जातील.

यामुळे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहनांचा ताण ५० टक्क्यांहून कमी होईल. तसेच बोरिवली ते वांद्रे दरम्यान प्रवाशांचा प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या वाचेल. यामुळे शेकडो मोठ्या डिझेल बसेस शहराबाहेरच थांबणार असून मुंबईतील वायू आणि ध्वनी प्रदूषणात मोठी घट होईल. यामुळे हॉटेल, मॉल्स आणि पार्किंगच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेला दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळणार आहे.

Follow Us