तर 2024मध्ये मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत; प्रकाश आंबेडकर यांचं लॉजिक काय?

| Updated on: Feb 25, 2023 | 7:55 AM

आताचे राजकारण योग्य नाही. सध्या माहौल बिघडवला जात आहे. 2014 मध्ये आपण मैत्री कोणाशी केली होती? तेव्हाचे सरकार भ्रष्टाचारी होते. पण येणाऱ्या सरकारची विचारधारा कोणती होती?

तर 2024मध्ये मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत; प्रकाश आंबेडकर यांचं लॉजिक काय?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : मुसलमांनांची साथ मिळाली तर नरेंद्र मोदी 2024मध्ये पुन्हा सत्तेत येणार नाहीत. पंतप्रधान होणार नाहीत. ही सत्य परिस्थिती आहे. इतर समाजाची संख्या कमी आहे. त्यामुळे बदलाची लाट मुस्लिमांकडून आली पाहिजे. मुसलमानांकडून बदलाची लाट आली तर 2024 मध्ये देशात बदल होईल. त्यामुळे तुम्हा सर्वांना एकत्र यावं लागणार आहे, असं विधान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. मुस्लिमांकडे पॉलिटिकल लीडरशीप नाही. तरीही मुस्लिमांनी एकत्र आलं पाहिजे. कारण आज आपण पुन्हा 1947च्या परिस्थितीत आलो आहोत. जोपर्यंत आपण आपल्या चुका मान्य करणार नाही तोपर्यंत आपल्याला मार्ग सापडणार नाही, असं सांगतानाच कर्नाटकाचा निकाल विरोधात गेल्यावर भाजप देशातील माहौल बिघडवण्याचा प्रयत्न करू शकतो, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला.

प्रकाश आंबेडकर यांनी काल माध्यमांशी बोलताना हा दावा केला. यावेळी त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवरही भाष्य केलं. देशात बऱ्याच ठिकाणी चर्चा सुरू आहेत. तेलंगनाच्या मुख्यमंत्र्यांनी त्याची सुरुवात केली आहे. आता केजरीवाल चर्चा करत आहेत. उद्धव ठाकरे यांच्याशी माझी जेव्हा भेट झाली होती, तेव्हा त्यांनी म्हटलं होत की सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना भेटलं पाहिजे. केंद्र सरकारचा राज्य शासनात हस्तक्षेप वाढल्याची जाणीव सर्वच राजकीय पक्षांना झाली आहे. शिवसेनेचा जो निर्णय आला त्यातूनच हे दिसते, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

हे सुद्धा वाचा

तरच नामांतर मानेन

निवडणूक आयोगाच्या निकालावर आम्ही काही करू शकत नाही. असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं. सर्वोच्च न्यायालयाचं हे मत संविधानाला धरून नाही, असं मला वाटतं, असंही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी नामांतरावरही भाष्य केलं. औरंगाबादचं नाव संभाजीनगर झालं. पण औरंगाबाद कोर्टाचं नाव औरंगाबाद कोर्ट असंच आहे. ते संभाजीनगर कोर्ट असं नाहीये. त्यामुळे औरंगाबाद हायकोर्टाचं नाव जेव्हा बदलेल तेव्हाच नामांतर झालं असं मी मानेन असं त्यांनी स्पष्ट केलं.

संविधान तयार

आपण जितके सेक्युलर होऊ तेवढा त्रास आरएसएसला होणार आहे. जेव्हा सेक्युलरची गोष्ट येते तेव्हा कळते की धर्म हा व्यक्तिगत आहे. पण आजची परिस्थिती अशी आहे की, मुसलमान सुद्धा महात्मा गांधींना विसरला आहे. जेव्हा जनता दलाचे सरकार आले तेव्हा त्यांना राजघाटावर शपथ घेण्याची परवानगी दिली. गांधींबाबतचे जे आरोप होते त्यातून ते वाचू पाहत होते, असं सांगतानाच त्यांचे नवीन संविधान तयार आहे. आपली संपूर्ण मेजॉरिटी कधी येते त्याची ते वाट पाहत आहे. विरोधात कोणी नसेल तेव्हा ते त्यांचं संविधान लागू करतील, असा दावाही त्यांनी केला.

सेक्युलर आजही जिवंत

पैगंबर बिल आणणे आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या समस्यांना सेक्युलर का नाही करत? बॅकवर्ड हिंदूंची चर्चा जर केली तर त्यांच्याकडे सुद्धा शिक्षण नाही. यासाठी वेगवेगळे होऊन मागणी करण्यापेक्षा एकत्र येऊन, सेक्युलर होऊन आपण याला विरोध करू शकतो अशी परिस्थिती आहे. आज सुद्धा सेक्युलर जिवंत आहे. कारण ते जर नसते तर पैगंबर बिल हे सदनामध्ये मांडले गेलेच नसते. हे मंजूर करण्यासाठी बहुमताचा जो रस्ता आहे तो आपल्याला इथून तयार करावा लागेल, असं त्यांनी सांगितलं.

2014 मध्ये चूक केली

आताचे राजकारण योग्य नाही. सध्या माहौल बिघडवला जात आहे. 2014 मध्ये आपण मैत्री कोणाशी केली होती? तेव्हाचे सरकार भ्रष्टाचारी होते. पण येणाऱ्या सरकारची विचारधारा कोणती होती? गोळवलकरांचं पुस्तक वाचा. संघाचं सरकार येईल तेव्हा सरकार नेमकं काय काम करेल याची माहिती या पुस्तकातील शेवटच्या धड्यात दिली आहे. आणि ते सध्या तसेच करत आहेत. एखाद्या कॅन्सरसारखे पसरत आहेत. 2014 मध्ये आपण चुकी केली की भ्रष्टाचार संपवण्यासाठी आपण सेक्युलर पक्षांना नाकारले आणि धार्मिक पक्षांना मतदान केले, असं ते म्हणाले.

दुरावा वाढवण्याचे राजकारण सुरू

90 च्या दशकानंतर दंगलीचे राजकारण संपले आणि बॉम्बस्फोटचे राजकारण सुरू झाले. सध्या ते सुद्धा संपले आणि आता समाजातील दूरी वाढवण्याचे राजकारण सुरू आहे. एखाद्याला पकडून असे बेदम मारायचे आणि तो व्हिडिओ व्हायरल करून एक प्रकारे दहशत निर्माण करायची. अशाप्रकारे दुरावा वाढवण्याचे राजकारण सुरू आहे. घाबरवण्याचा प्रयत्न सुरू आहेत, असंही ते म्हणाले.