शिंदे सरकार वर्षभरात कोसळणार? शरद पवार यांचा नेमका दावा काय?

| Updated on: May 06, 2023 | 11:34 PM

महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोडी आता कुठपर्यंत जाणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा सुप्रीम कोर्टातील निकाल आता कधीही समोर येऊ शकतो. या निकालानंतर राज्यात राजकीय अस्थितरता निर्माण होऊ शकते, अशी चर्चा आहे. या घडामोडींवर शरद पवार यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली.

शिंदे सरकार वर्षभरात कोसळणार? शरद पवार यांचा नेमका दावा काय?
Follow us on

बारामती : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा सुप्रीम कोर्टातील निकाल पुढच्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. या निकालाआधी वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे काही आमदारांसह भाजपसोबत हातमिळवणी करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या सर्व चर्चांवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. विशेष म्हणजे त्यांनी महाराष्ट्रात सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर कथित संभाव्य सत्तासंघर्षाच्या पेचबद्दल सुरु असलेल्या चर्चांवर आपलं परखड मत मांडलं आहे.

“सुप्रीम कोर्टातील निकाल हा शिंदे गटाच्या विरोधात लागला तरी विधानसभेत असणाऱ्या बहुमताला काही फरक पडणार नाही. 16 अपात्र आमदारांच्या यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचंही नाव आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल त्यांच्याविरोधात लागला तरीही भाजप आणि शिंदेंच्या सरकारवर काहीच परिणाम होणार नाही. कारण तेवढी संख्या त्यांच्याकडे आहे”, अशी भूमिका शरद पवार यांनी आज मांडली.

अजित पवार यांच्याबद्दल शरद पवारांची महत्त्वाची प्रतिक्रिया

“सातत्याने कधी काही घडलं? असंय काही लोकं प्रचार करतात, काही लोकांच्या कामाच्या पद्धती असतात, मी कुठेही गेलो की, तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. अजित दादा यांचं प्राधान्य हे सर्वात आधी फिल्डवर काम करण्याचं आहे. रिझल्ट देण्याचं आहे. ते फार मीडिया फ्रेंडली नाहीयत”, असं शरद पवार म्हणाले.

हे सुद्धा वाचा

“मी तुम्हाला स्वच्छ सांगतो. काही लोकं काम करणारे असतात. तर काही लोकं आपलं नाव कसं येईल ते बघत असतात. अजित पवार यांना प्रसिद्धीची चिंता नसते. त्यांना आपण हातात घेतलेलं काम पूर्ण करण्याची चिंता असते. त्यामुळे हा स्वभावाचा फरक आहे. त्यामुळेच त्यांच्याबद्दलचे गैरसमज असतात. माझी विनंती आहे, असं काही नाहीय. ते त्यांचं काम करत आहेत. त्यांचं काम राज्यासाठी जास्त गरजेचं आहे”, असं मत शरद पवार यांनी मांडलं.

बारसू प्रकल्पावर म्हणाले….

यावेळी शरद पवार यांनी बारसू प्रकल्पाला होणाऱ्या विरोधावरही प्रतिक्रिया दिली. “मी स्वत: तिथल्या शेतकऱ्यांशी चर्चा केली. त्यांचे प्रश्न समजून घेतले. त्यानंतर उद्योगमंत्र्यांसोबत माझ्या एक-दोन वेळा बैठकही झाली. या बैठकीत मार्ग कसा काढता येईल, शेतकऱ्यांच्या हिताचं कसं होईल आणि राज्याच्या विकासाला मोठे प्रोजेक्ट लागतात ते कसे होईल, याबाबत चर्चा झाली”, अशी माहिती शरद पवार यांनी दिली.

“हे प्रोजेक्ट करत असताना पर्यावणाचं, शेतीचं आणि मत्स्य व्यवसायाचं नुकसान होणार नाही याची खबरदारी घ्यावी लागेल. पूर्ण तयारी करुन, इथल्या स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन यातून जाण्याची आवश्यकता आहे. सक्तीने हा प्रकल्प यशस्वी होऊ शकणार नाही आणि ते योग्य नाही”, असंही मत शरद पवार यांनी मांडली.