दिल्लीला जाण्यापूर्वी शरद पवार ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांसोबत अर्धा तास बैठक, महत्त्वाच्या तीन विषयांवर चर्चा

| Updated on: Jul 15, 2021 | 6:28 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी आज (15 जुलै) संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास 'वर्षा' निवासस्थानी दाखल झाले.

दिल्लीला जाण्यापूर्वी शरद पवार वर्षावर, मुख्यमंत्र्यांसोबत अर्धा तास बैठक, महत्त्वाच्या तीन विषयांवर चर्चा
उद्धव ठाकरे आणि शरद पवार (फाईल फोटो)
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी आज (15 जुलै) संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ‘वर्षा’ निवासस्थानी दाखल झाले. महाराष्ट्रातील एकंदरीत घडामोडी बघता ही भेट महत्त्वाची आहे. या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. पण यापैकी तीन मुख्य विषयांवर सर्वाधिक चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहेत. ठाकरे आणि पवार यांच्याच जवळपास अर्धा तास बैठक झाली. शरद पवार उद्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीसाठी रवाना होणार आहेत. त्यामुळे ते पुढचा आठवडाभर दिल्लीतच राहणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याची माहिती आहे. या बैठकीत संसदेचं अधिवेशन, कृषी कायदे आणि नव्या सहकार कायद्याबाबत चर्चा झाल्याची शक्यता आहे.

संसदेच्या आगामी अधिवेशनावर चर्चा

येत्या 19 जुलैपासून संसदेचं अधिवेशन सुरु होत आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना-राष्ट्रवादीची काय भूमिका आणि मुद्दे असावेत यावर चर्चा झाल्याची शक्यता आहे. शरद पवार यांनी आज सह्याद्री अतिथीगृहावर कृषी विषयक प्रश्नांचा आढावा घेतला. या बैठकीला राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि संदीपान भुमरे उपस्थित होते. या बैठकीनंतर शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आक्रमक आहेत. त्यामुळे या मुद्द्यांवर संसदेत काय भूमिका मांडावी, या विषयावरही चर्चा झाल्याची शक्यता आहे.

सहकार क्षेत्रावर चर्चा

शरद पवार उद्या दिल्लीत जाणार आहेत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूीमीवर ते दिल्लीत जाणार असून ते आठवड्याभर तिथे राहणार असल्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक विषय चर्चेसाठी आहेत. केंद्र सरकारने सहकार क्षेत्राचं नवं खातं निर्माण केलं आहे. या खात्याचे सर्व सूत्र अमित शाह यांच्याकडे देण्यात आले आहेत. महाराष्ट्रात सहकार क्षेत्रावर राष्ट्रवादी काँग्रेसचं चांगलं वर्चस्व आहे. सहकार क्षेत्राशी अनेक मुद्दे संबंधित आहेत. पुढच्या काळात केंद्र सरकारचा राज्यांच्या सहकार क्षेत्रावर हस्तक्षेर होऊ शकतो, अशी धास्ती आहे. त्यामुळे या विषयावर बैठकीत चर्चा झाल्याची शक्यता आहे.

काँग्रेसचा आक्रमकपणा

काँग्रेसने आता अत्यंत आक्रमक भूमिका घेतलेली आहे. काँग्रेसने स्वबळाची भूमिका घेतली आहेच पण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बारामतीत ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली आहे. काँग्रेसने यापूर्वी अशी आक्रमक भूमिका कधीच घेतली नव्हती. त्यामुळे शरद पवार हे महाविकास आघाडीचे शिल्पकार आहेत. तर शिवसेनेचे उद्धव ठाकरे हे सरकारचे चालक आहेत आणि काँग्रेस त्यांचा एक भाग आहे, असं चित्र होतं. पण काँग्रेसची भूमिका अचानक आक्रमक झाल्याने आगामी स्थानिक निवडणुका आणि सरकारचं काय? अशा अनुषंगाने चर्चा झाली  असेल, असं मत राजकीय विश्लेषक संजय आवटे यांनी दिलं आहे.

भाजपचे सरकार पाडण्या संदर्भातील हालचाली

भाजपने अत्यंत आक्रमकपणे हे सरकार पाडण्याच्या हालचाली सुरु केलेल्या आहेत. या हालचाली गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहेत. ईडी आणि इतर केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांवा जेरीस आणायचं. दोन्ही पक्षांपैकी एका पक्षाला आपल्यासोबत यायला भाग पाडायचं, असा प्रयत्न भाजपने सुरु ठेवला आहे. या विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे, असं संजय आवटे यांनी सांगितलं.

विरोधकांची मोट बांधण्यावर चर्चा

शरद पवार प्रशांक किशोर आणि त्यांच्या टीमसोबत राष्ट्रीय स्तरावर विरोधकांची एक मोट बांधण्याचा प्रयत्न करु पाहत आहेत. याच मुद्द्यावरुनही चर्चा सुरु आहे. तसेच भाजपसोबतही जुळवून घेण्यावरही या बैठकीत चर्चा होऊ शकते. ही बैठक महाराष्ट्राच्या राजकारणासाठी महत्त्वाची आहे, असं संजय आवटे यांनी सांगितलं.

हेही वाचा : शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला, भेटीगाठीच्या सिलसिल्यामागचं नेमकं कारण काय?