मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधानसभेच्या पराभूत उमेदवारांची बैठक बोलावली आहे. येत्या 8 सप्टेंबरला मुंबईतील पक्ष कार्यालयात ही महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने पुढील निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरु केली आहे.
पुढच्या काही महिन्यात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत. तसंच पाच महापालिकांच्या निवडणुका देखील पार पडत आहेत. त्या दृष्टीने या बैठकीत नेत्यांना काही महत्त्वाच्या सूचना तसंच विविध विषयांवर चर्चा होणे अपेक्षित आहेत. राज्यात जरी महाविकास आघाडीचं सरकार असलं तरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पडत असल्याने स्थानिक पातळीवरचे निर्णय तिथल्या स्थानिक नेत्यांवर पक्ष सोपविण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीचे असे काही उमेदवार आहेत जे विधानसभा निवडणुकीत अगदी थोड्या मतांनी पराभूत झाले आहेत, अशा नेत्यांवर काही महत्त्वाची जबाबदारी सोपविली जाण्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात येतीय. एकंदरितच 8 सप्टेंबरच्या बैठकीत निवडणूक आणि त्यासंबंधी चर्चा पार पडणार आहे, एवढं नक्की….!
शरद पवार यांनी ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक बोलावून त्यांच्याशी खात्यांर्गत विविध विषयांवर आणि त्यांच्य कामावर चर्चा केली. गेल्या एका महिन्यापासून राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक पार पडली नव्हती. मात्र मंगळवारी अर्थात 31 ऑगस्टला ही बैठक पार पडली. महाविकास आघाडीच्या नेत्यांना येणाऱ्या ईडीच्या नोटीस, भाजपची नुकतीच झालेली जन आशिर्वाद यात्रा या सर्व पार्श्वभूमीवर शरद पवारांनी बोलावलेल्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे.
शरद पवारांनी बोलावलेल्या या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्व बडे नेते उपस्थित होते. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री छगन भुजबळ, मंत्री जितेंद्र आव्हाड, मंत्री राजेश टोपे, मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादीच्या सर्व 16 मंत्र्यांचा समावेश होता.
(NCP President Sharad Pawar Call Vidhansabha Defeat Candidate meeting 8 September mumbai maharashtra Over Election)
हे ही वाचा :
ईडीच्या धाडी, भाजपचे हल्ले, शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक बोलावली!