‘भुजबळांना मुख्यमंत्री केलं असतं तर भविष्यात पक्षात फूट पडली असती’; शरद पवारांचं सर्वात मोठं वक्तव्य
2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वाधिक जागा येऊनही काँग्रेसचा मुख्यमंत्री का केला यावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यासोबतच छगन भुजबळ यांना मुख्यमंत्रिपद का दिलं नाही यावर बोलताना पक्षात फुट पडली असती, असं पवारांनी म्हटलं आहे.
!['भुजबळांना मुख्यमंत्री केलं असतं तर भविष्यात पक्षात फूट पडली असती'; शरद पवारांचं सर्वात मोठं वक्तव्य 'भुजबळांना मुख्यमंत्री केलं असतं तर भविष्यात पक्षात फूट पडली असती'; शरद पवारांचं सर्वात मोठं वक्तव्य](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/05/Sharad-Pawar-Chhagan-Bhujbal-.jpg?w=1280)
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना मुख्यमंत्री केलं असतं तर भविष्यात पक्षात फूट पडली असती, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे. 2004 साली राष्ट्रवादीच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या होत्या. मात्र त्यावेळी काँग्रेसचे नेते विलासराव देशमुख यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आलं होतं. याबद्दल एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलताना शरद पवार यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यासोबतच अजित पवारांना का मुख्यमंत्रीपद दिलं नाही? यावरही शरद पवारांनी भाष्य केलं आहे.
शरद पवार नेमकं काय म्हणाले?
2004 मध्ये पक्षात मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता. त्यावेळी छगन भुजबळ यांना मुख्यमंत्रीपद दिलं असतं तर पक्षात फूट पडली असती. तर अजित पवार हे राजकारणात नवखे होते, असं शरद पवार यांनी म्हणाले. 2004 निवडणुका झाल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 71 जागा तर काँग्रेस पक्षाला 69 जागा मिळाल्या होत्या. मात्र काँग्रेसचा मुख्यमंत्री करण्यात आला होता. त्यावेळी विलासराव देशमुख यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती.
शरद पवारांच्या वक्तव्यावर भुजबळांची प्रतिक्रिया
1991 मध्ये मी शिवसेना पक्ष सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी शिवसेना-भाजपच्या विरोधात काम केलं म्हणून जीवघेणे हल्ले झाले होते. त्यानंतर 1995 ला युती सरकार आलं आणी मला विधान परिषदेतून आमदार करण्यात आलं. तेव्हा विरोधी पक्षनेता म्हणून मी काम केलं. 1999 ला शरद पवारांनी काँग्रेस पक्ष सोडत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यावर मी त्यांच्यासोबत गेलो होतो. काँग्रसने मला मुख्यमंत्रिपद देऊ असं सांगितलं मात्र मी पवार साहेबांची साथ दिली. जर त्यावेळी मी पवारांसोबत गेलो नसतो तर मुख्यमंंत्री झालो असतो, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळांनी दिली.
दरम्यान, राज्याचे उपमख्यमंत्री अजित पवार यांनी 2004 मध्ये राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री का केला नाही? असा सवाल अनेकवेळा केला. शरद पवार यांनी यावर भाष्य केलं आहे.