राष्ट्रवादीचा 100 विधानसभा मतदारसंघांवर डोळा?, काय आहे ‘सुपर 100’ मोहीम?; वाचा सविस्तर

| Updated on: Jun 17, 2021 | 8:03 PM

काँग्रेसने स्वबळावर तर शिवसेनेने राष्ट्रवादीसोबत युती करून विधानसभा निवडणुका लढवण्याचं जाहीर केलं आहे. विधानसभा निवडणुकीला अजून वेळ आहे. त्याआधीच आघाडीतील तिन्ही पक्षांनी उलटसुलट प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केलेली असतानाच राष्ट्रवादीने मात्र विधानसभेच्या मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.

राष्ट्रवादीचा 100 विधानसभा मतदारसंघांवर डोळा?, काय आहे सुपर 100 मोहीम?; वाचा सविस्तर
sharad pawar
Follow us on

मुंबई: काँग्रेसने स्वबळावर तर शिवसेनेने राष्ट्रवादीसोबत युती करून विधानसभा निवडणुका लढवण्याचं जाहीर केलं आहे. विधानसभा निवडणुकीला अजून वेळ आहे. त्याआधीच आघाडीतील तिन्ही पक्षांनी उलटसुलट प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केलेली असतानाच राष्ट्रवादीने मात्र विधानसभेच्या मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीने ‘सुपर 100’ या मोहिमेच्या माध्यमातून राज्यातील 100 मतदारसंघांना टार्गेट केलं असून या मतदारसंघांमध्ये संघटन मजबूत करण्यावर भर दिला आहे. (ncp’s mission ‘super 100’, NCP youth president appointed 34 observer in maharashtra)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक संघटन हे प्रत्येक मतदारसंघात मजबूत करण्याच्या हेतूने राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने ‘सुपर 100’ हा उपक्रम हाती घेण्यात आला असून आज 34 विधानसभा निरीक्षक पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी दिली. राज्यातील युवकांची बांधणी करण्याच्या हेतूने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मान्यतेने विधानसभा निरीक्षक पदी आज नवनिर्वाचित 34 पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत.

काय आहे ‘सुपर 100’

‘सुपर 100’ ही मोहीम राष्ट्रवादी युवक काँग्रेसने हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत राज्यातील 100 विधानसभा मतदारसंघ निवडण्यात आले आहेत. या मतदारसंघात पक्षाचं संघटन मजबूत करण्याची जबाबदारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तरुण पदाधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे. या पदाधिकाऱ्यांनी या मतदारसंघात जाऊन तरुण-तरुणींना पक्षात आणायचं आहे. मेळावे, मोर्चा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून संघटन वाढवण्यावर या मतदारसंघात काम करायचं आहे. तसेच इतर पक्षातील किंवा पक्षांशी संबंध नसलेल्या तरुणांना राष्ट्रवादीकडे आकर्षित करण्याची तसेच प्रत्येक विधासभेत सोशल इंजिनीयरिंगचा प्रयोग राबवण्याची जबाबदारीही या तरुण पदाधिकाऱ्यांवर देण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यासाठी 34 निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून इतर निरीक्षकांचीही लवकरच नियुक्ती करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं.

100 मतदारसंघच का?

राज्यात तीन पक्षाचं सरकार आहे. तीन पक्षांची विधानसभेत आघाडी झाल्यास प्रत्येकाच्या वाट्याला 80 ते 100 जागा येणार आहेत. जर शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती झाल्यास दोन्ही पक्षाच्या वाट्याला 120 ते 140 जागा येऊ शकतात. त्यामुळे राष्ट्रवादीने जागावाटपात किमान शंभर जागा मिळतील या हिशोबाने 100 मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केलं आहे. ज्या ठिकाणी राष्ट्रवादी दोन आणि तीन नंबरला होती, अशा मतदारसंघाचा या ‘सुपर 100’मध्ये समावेश आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीने या मतदारसंघावर फोकस केल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

 

जयंत पाटील काय म्हणाले?

दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिवसेनेसोबत आघाडी करण्याचे संकेत दिले आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये तीन पक्ष आहेत. त्या तिघांनी एकत्रित राहावं याला सर्वांनीच प्राधान्य द्यावे. त्यातूनच एखाद्या पक्षाला स्वबळावर लढण्याची इच्छा असेल तर उरलेले दोन पक्ष नक्कीच एकत्रित राहतील त्यादृष्टीने ‘सामना’ ने मत व्यक्त केले आहे. मात्र महाराष्ट्रातील जनतेचीही तशीच इच्छा दिसते, असे स्पष्ट मत पाटील यांनी व्यक्त केले आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सध्या पक्षवाढीसाठी स्वबळावर लढण्याचा निर्धार व्यक्त करत असतील. प्रत्येक पक्षाचं बळ किती आहे हे महाराष्ट्रात सर्वांनाच माहित आहे. म्हणून तिघांनी एकत्र येऊन अधिक संघटितपणाने काम करणे अपेक्षित आहे. निवडणुका जवळ आल्यावर कदाचित ते वेगळा विचार करू शकतील. पण त्यांनी तसा विचार केला नाही तर मग जे समविचारी पक्ष आहेत ते एकत्रित राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केलं. आता निवडणुका नाहीत त्यामुळे यावर रोज चर्चा कशाला करायची? ज्यावेळी वेळ असेल त्यावेळी नक्कीच चर्चा करू. ज्यावेळी निवडणूका होतील त्यावेळी स्थानिक परिस्थितीचा अंदाज घेऊन चर्चा होईल, असेही त्यांनी स्पष्ट केलं. (ncp’s mission ‘super 100’, NCP youth president appointed 34 observer in maharashtra)

 

संबंधित बातम्या:

काँग्रेस स्वतंत्र लढल्यास राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढेल, जयंत पाटलांचाही राऊतांच्या सुरात सूर

एवढ्या वर्षाच्या निष्ठेनंतर सिंधुदुर्ग, रत्नागिरीच्या पदरी मृत्यू, हीच का उपकाराची परतफेड? राणेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

सक्रिय राजकारणात या, आरक्षण समर्थकांनासोबत घ्या; प्रकाश आंबेडकरांचं संभाजीराजेंना आवतन

(ncp’s mission ‘super 100’, NCP youth president appointed 34 observer in maharashtra)