BMC | मनपा कर्मचाऱ्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी ‘आनापानसती’ प्रशिक्षणाचे आयोजन

| Updated on: Dec 09, 2021 | 9:32 PM

‘आनापानसती’ हा विपश्यनेचा एक भाग असून, याद्वारे आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करून आपले मन स्थिर केले जाते. या क्रियेद्वारे मानसिक व शारीरिक आरोग्य सुदृढ राखण्यास मदत होत असल्याबाबत प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात आले.

BMC | मनपा कर्मचाऱ्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी ‘आनापानसती’ प्रशिक्षणाचे आयोजन
मुंबई महापालिका निवडणुकीआधी भाजप-काँग्रेस आमनेसामने
Follow us on

मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावादरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिका कर्मचारी विविध शारीरिक व मानसिक आव्हानांना सामोरे जात असतानाच मनपा कर्मचाऱ्यांनी अधिकाधिक प्रभावी सातत्यपूर्ण सेवा देत आपले मोलाचे योगदान दिले आहे. मात्र, अद्यापही कोविडचे सावट काही प्रमाणात आहे. या अनुषंगाने आपले दैनंदिन जीवन पूर्वपदावर आणण्यासाठी शासनाचे व महानगरपालिकेचे प्रामाणिक प्रयत्न नियमितपणे सुरु आहेत. या अनुषंगाने कर्मचाऱ्यांचे मानसिक व शारीरिक आरोग्य सुदृढ राखून नागरी सेवा-सुविधा देण्याच्या कामात आणि प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणण्याच्या उद्देशाने ‘आनापानसती’ प्रशिक्षणाचे आयोजन नुकतेच केले होते.

महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या आदेशान्वये व अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनात शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी करीरोड येथील शिक्षण विभागाच्या मुख्यालयात याचे आयोजन नुकतेच केले होते. पालिकेचे सेवानिवृत्त सह-आयुक्त शांताराम शिंदे यांनी या प्रशिक्षण शिबिराला मार्गदर्शन करताना ‘आनापानसती’ क्रियेचे आपल्या जीवनातील महत्व स्पष्ट केले. ‘आनापानसती’ हा विपश्यनेचा एक भाग असून, याद्वारे आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करून आपले मन स्थिर केले जाते. या क्रियेद्वारे मानसिक व शारीरिक आरोग्य सुदृढ राखण्यास मदत होत असल्याबाबत प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात आले. यासाठी धम्म प्रसारक एस.एन. गोयंका गुरुजी यांच्या ध्वनिफितीच्या सहाय्याने हे प्रशिक्षण देण्यात आले.

महापालिका कर्मचाऱ्यांना विपश्यनेसाठी 14 दिवसाच्या विशेष रजेची सवलत

महाराष्ट्र शासनाच्या ‘मित्र’ उपक्रमांतर्गत राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी ‘आनापानसती’ क्रिया घेतल्यास त्यांची स्मरणशक्ती व आत्मविशास वाढतो आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढीस कशाप्रकारे मदत होते, याची छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देखील या प्रशिक्षणादरम्यान उपस्थितांना देण्यात आली. सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना तसेच महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना विपश्यनेसाठी 14 दिवसाच्या विशेष रजेची सवलत देण्यात आली असून, याचा सर्व कर्मचाऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहनही या निमित्ताने शांताराम शिंदे यांनी केले.

सुमारे 300 कर्माचाऱ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला

या प्रशिक्षणास उपप्रमुख लेखापाल (शिक्षण निधी) राजेंद्र पवार, पालिकेचे माजी शिक्षणाधिकारी प्रकाश चऱ्हाटे, उपशिक्षणाधिकारी किर्तीवर्धन किरतकुडवे, इंदरसिंह कडाकोटी, आशा मोरे, सेवानिवृत्त ज्युनिअर ऑडिटर राम मेघराजानी उपस्थित होते. शिक्षण विभागाच्या या संकुलातील अधीक्षक, प्रशासकीय अधिकारी, विभाग निरीक्षक, प्रचार्य संगीत-कला, निदेशक हस्तकला, मुख्य लिपिक, लिपिक, शिपाई तसेच उपप्रमुख लेखापाल (शिक्षण निधी) कार्यालयातील उपप्रमुख लेखापालांसह सर्व लेखाधिकारी व त्यांच्या सर्व स्टाफ यांच्यासह सुमारे 300 कर्माचाऱ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेत आपापले सकारात्मक अनुभव देखील व्यक्त केले. (Organizing Anapanasati training for the health of the employees of the Corporation)

इतर बातम्या

omicron : आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर 31 जानेवारीपर्यंत बंदी, ओमिक्रॉनच्या धोक्यामुळे मोठा निर्णय

कामगारांना 50 किलोपेक्षा जास्त वजनाच्यावर भार वाहू देऊ नये, सहकार व पणन मंत्र्यांचे निर्देश