उद्धव ठाकरे यांनी कोणत्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात जावं?; प्रकाश आंबेडकर यांचा मित्रत्वाचा सल्ला काय?

निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानंतर ठाकरे गटात खलबतं सुरू झाली आहेत. उद्धव ठाकरे यांनी आज तातडीने शिवसेना नेते, उपनेते, आमदार आणि खासदारांची बैठक बोलावली आहे. दुपारी 1 वाजता मातोश्री येथे ही बैठक बोलावण्यात आली आहे.

उद्धव ठाकरे यांनी कोणत्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात जावं?; प्रकाश आंबेडकर यांचा मित्रत्वाचा सल्ला काय?
uddhav thackeray
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 18, 2023 | 12:05 PM

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरे गटाच्या विरोधात निर्णय दिला आहे. निवडणूक आयोगाने निवडणूक चिन्ह आणि पक्षाचं नाव शिंदे गटाला बहाल केलं आहे. आयोगाने उद्धव ठाकरे यांनाच मूळ शिवसेनेपासून बेदखल केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाचा निर्णय आणि उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. ठाकरे गटाचे मित्र पक्ष असलेल्या वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मित्रत्वाचा सल्ला दिला आहे.

निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या वादावर आपला निर्णय दिला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. उद्धव ठाकरे यांचा निर्णय योग्यच आहे. त्यांनी कोर्टात अपील केलं पाहिजे. निवडणूक आयोग चिन्ह किंवा पक्षाच्या झगड्यात निर्णय देणं अधिकारात येतं का? हा या प्रकरणातील महत्त्वाचा मुद्दा आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

त्या मुद्द्यावर कोर्टात जावं

मुळात निवडणूक आयोगाला पक्षाच्या अंतर्गत वादावर निर्णय देण्याचा अधिकार आहे का? हाच सर्वात मोठा प्रश्न आहे. कुठल्याही परिस्थितीत निवडणुका घेणे हे निवडणूक आयोगाचे काम आहे, राजकीय पक्षातील विवादावर निवाडा करणे हे निवडणूक आयोगाचे काम नाही. हाच मुद्दा घेऊन उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात गेले तर त्यांना नक्कीच न्याय मिळेल, असा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.

मातोश्रीवर बैठक

दरम्यान, निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानंतर ठाकरे गटात खलबतं सुरू झाली आहेत. उद्धव ठाकरे यांनी आज तातडीने शिवसेना नेते, उपनेते, आमदार आणि खासदारांची बैठक बोलावली आहे. दुपारी 1 वाजता मातोश्री येथे ही बैठक बोलावण्यात आली आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचं सांगितलं जातं. तसेच उद्धव ठाकरे हे सोमवारीच सर्वोच्च न्यायालयात अपील करतील असंही सांगितलं जात आहे.

निर्णय धक्कादायक

दरन्यान, निवडणूक आयोगाच्या निर्णयावर काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. निवडणुक आयोगाकडून निष्पक्ष निर्णय अपेक्षित होता. पण कालचा निर्णय धक्कादायक आहे, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली.

या निर्णयामुळे लोकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. शरद पवार यांची अतिशय सूचक प्रतिक्रिया आहे. चिन्ह आणि पक्ष गेल्यानंतर राष्ट्रवादीने नवीन चिन्हा सोबत निवडणुक लढवली, ताकद दाखवली. त्याच मार्गाने उद्धव ठाकरेना जावं लागेल. सर्वोच न्यायालयात ते जाणार आहेत.

तिथे त्यांना यश मिळालं तर चांगलच आहे. पण यश नाही मिळालं तर त्यांना नवीन पक्ष, नवीन चिन्हासोबत लोकांमध्ये जावं लागेल, असंही चव्हाण यांनी सांगितलं. महाविकास आघाडी अजूनही एकत्र असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us