70 टक्के मुंबईकर बाहेरचे, कागदपत्रं नाहीत, प्रकाश आंबडेकरांचं CAA विरोधात धरणं

| Updated on: Dec 26, 2019 | 9:34 AM

सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कायदा (एनआरसी) याच्याविरोधात वंचित बहुजन आघाडीतर्फे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे

70 टक्के मुंबईकर बाहेरचे, कागदपत्रं नाहीत, प्रकाश आंबडेकरांचं CAA विरोधात धरणं
Follow us on

मुंबई : सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात आज मुंबईत धरणं आंदोलन होणार आहे. दादरमधील खोदादाद सर्कल भागात दुपारी बारा वाजल्यापासून प्रकाश आंबेडकर धरणं आंदोलन करणार (Prakash Ambedkar Protest against CAA) आहेत. मुंबईत 70 टक्के नागरिक शहराबाहेरील आहेत, त्यांच्याकडे कागदपत्रं सापडणार नाहीत, असा दावाही प्रकाश आंबेडकरांनी केला.

सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कायदा (एनआरसी) याच्याविरोधात वंचित बहुजन आघाडीतर्फे मोर्चा नसून, धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. प्रकाश आंबेडकरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ‘मातोश्री’वर जाऊन यासंबंधी माहिती दिली होती.

एनआरसी-सीएएला आमचा विरोध आहे. मुंबईत 70 टक्के नागरिक शहराबाहेरील, बाहेरच्या राज्यातील आहेत. कोणाकडेही वाडवडिलांचे पुरावे मिळणार नाहीत. त्यांच्या तीन-चार पिढ्या मुंबईत गेल्या आहेत. गाव, तालुका कुठला यांची माहिती नाही. आपले आजोबा-पणजोबा कुठे आणि कधी जन्मले, याचे पुरावे नाहीत, मग ते कागदपत्रं कशी सादर करणार? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना विचारला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, की एनआरसी देशभरात लागू करण्याबाबत निर्णय झालाच नाही, पण हे साफ खोटं आहे. कर्नाटकात छावण्या (डिटेंशन सेंटर) बांधण्यात आल्याचे फोटो आणि वृत्त मी वाचलं आहे, असंही त्यांनी सांगितलं. आपल्या विचारधारेमुळे आपण फार काळ टिकू शकणार नाही, हे संघाला माहित आहे. संघ आणि भाजपला खोटं बोलण्याचा इतिहास असल्याचा घणाघात प्रकाश आंबेडकरांनी केला.

महाराष्ट्रात 16 टक्के भटके विमुक्त जमातीतील लोक आहेत. ज्यांच्या सहा पिढ्या छावण्यांमध्ये गेल्या, त्यांचं काय होणार जे अलुतेदार बलुतेदार आहेत, ते पोटापाण्यासाठी वणवण फिरत होते, त्यांची नोंद कुठे? असा प्रश्नही प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला.

मुख्यमंत्र्यांनी आम्हाला शांततेचं आवाहन केलं. आमची आंदोलनं शांततेतच होतात असं सांगितल्याचं ते ‘मातोश्री’वारीनंतर म्हणाले होते.

“नागरिकत्व कायदा केवळ मुस्लिमांनाच लागू होतो हा भाजप-संघाचा प्रचार खोटा आहे. या कायद्यामुळे 40 टक्के हिंदूही भरडले जाणार आहेत. शिवाय अन्य जातींनाही याचा फटका बसणार आहे, त्यामुळेच हे धरणे आंदोलन करण्यात येत आहे”, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं होतं. Prakash Ambedkar Protest against CAA