शिवतीर्थावर इंडिया आघाडीचे शक्ती प्रदर्शन, बड्या नेत्याची एन्ट्री, राहुल गांधींना जेवणाचेही आमंत्रण

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याया यात्रेची समारोप सभा मुंबईमध्ये शिवतीर्थावर होणार आहे. रविवारी होणाऱ्या या सभेमध्ये राज्यातील बडा नेते इंडिया आघाडीच्या मंचावर दिसणार आहे. कोण आहेत ते नेते? ज्यांनी राहुल गांधींना जेवणासाठीही निमंत्रण दिलं आहे.

शिवतीर्थावर इंडिया आघाडीचे शक्ती प्रदर्शन, बड्या नेत्याची एन्ट्री, राहुल गांधींना जेवणाचेही आमंत्रण
| Updated on: Mar 16, 2024 | 10:14 PM

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेल्या भारत जोडो न्याय यात्रेचा रविवारी मुंबईमध्ये समारोप होणार आहे. मुंबईतील शिवतीर्थावर इंडिया आघाडी मोठं शक्तीप्रदर्शन करणार आहे. या समारोप यात्रेला इंडिया आघाडीचे बडे नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहत आपली ताकद दाखवून देणार आहेत. राज्यातील बडा नेता या मंचावर दिसणार आहे. नेमके कोण आहेत जाणून घ्या.

राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा ही मणिपूरपासून निघाली होती. तब्बल 6700 किमी अंतर पार करत ही यात्रा मुंबईतील चैत्यभूमीवर समाप्त झाली. मुंबईमध्ये भिवंडीतून सुरू झालेली यात्रा कळवा, मुंब्रा, ठाणे, भांडूप, सायन, धारावीतून दादर येथील चैत्यभूमीवर आली होती. यावेळी राहुल गांधी यांनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. त्यासोबतच संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचनही केलं. आता शिवाजी पार्कवर इंडिया आघाडी आगामी लोकसभा निवडणुकीसाठीच्या प्रचाराला खऱ्या अर्थाने सुरूवात करेल.

राहुल गांधी यांच्या समारोप सभेला इंडिया आघाडीच्या मंचावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर उपस्थित असणार आहेत. प्रकाश आंबेडकर यांना इंडिया आघाडीकडून निमंत्रण आलं असून याबाबत त्यांनी ट्विटरवर (एक्स) माहिती दिली आहे.

 

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी दिलेले भारत जोडो न्याय यात्रेच्या समापन महासमारोहाचे निमंत्रण मला मिळाले आहे. मी काल निमंत्रण स्वीकारले आहे आणि 17 मार्चला शिवाजी पार्क, मुंबई येथे होणाऱ्या या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. तसेच 17 मार्चला मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांना राजगृह येथे भोजनाचे निमंत्रण दिल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं आहे.