युद्ध हवं की नको, राज ठाकरेंकडून मोदींना मोठा पर्याय

| Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM

मुंबई: पुलवामा हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट आहे. युद्ध करुन पाकिस्तानचा बदला घ्या अशी मागणी होत आहे. मात्र दुसरीकडे युद्ध हा काही पर्याय नाही, त्यामुळे युद्ध नको अशी भूमिकाही अनेकांनी घेतली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आपली भूमिका एका पत्रकाद्वारे जाहीर केली. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दोनवेळा चर्चेचं आवाहन केलं आहे. अटल बिहारी वाजपेयींनी […]

युद्ध हवं की नको, राज ठाकरेंकडून मोदींना मोठा पर्याय
Follow us on

मुंबई: पुलवामा हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट आहे. युद्ध करुन पाकिस्तानचा बदला घ्या अशी मागणी होत आहे. मात्र दुसरीकडे युद्ध हा काही पर्याय नाही, त्यामुळे युद्ध नको अशी भूमिकाही अनेकांनी घेतली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आपली भूमिका एका पत्रकाद्वारे जाहीर केली.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दोनवेळा चर्चेचं आवाहन केलं आहे. अटल बिहारी वाजपेयींनी सुरु केलेली चर्चा दुर्दैवाने पूर्णत्वास जाऊ शकली नाही. ती संधी आता पुन्हा एकदा आली आहे. उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया ही दोन कट्टर शत्रूराष्ट्र चर्चेसाठी पुढे येऊ शकतात तर आपण का नाही, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

यावेळी राज ठाकरे यांनी चर्चा करण्याचा सल्ला दिला असला तरी, यावेळी चर्चेचं पहिलं पाऊल पाकिस्ताननेच टाकायला हवं असंही म्हटलं आहे. आधी भारतीय वैमानिक अभिनंदन यांना सोडा त्यानंतर चर्चा करा, असं राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे यांनी पत्रकात काय म्हटलंय?
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी चर्चेतून मार्ग काढण्याचं आवाहन केलं. त्यांनी पुलवामा हल्ल्यानंतरही असं आवाहन केलं होतं. भारताचे सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले, त्यानंतर भारताने हवाई हल्ला केला, तो आवश्यकच होता. त्याबद्दल मी भारतीय हवाई दलाचं अभिनंदन केलं.

काल पुन्हा इम्रान खान यांनी चर्चेचं आवाहन केलं. इतकंच नव्हे तर पुलवामा हल्ल्यासह सर्व मुद्द्यावर चर्चेची तयारी दर्शवली. चर्चेतून मार्ग काढण्याची संधी अटलबिहारी वाजपेयीजी आणि परवेझ मुशर्रफ यांच्या काळात आली होती. अटलजींनी ‘सदा ए सरहद’ ही लाहोरपर्यंतची बससेवा सुरु केली, समझौता एक्स्प्रेस सुरु केली, आग्र्यात ऐतिहासिक चर्चा झाली, पण दुर्दैवाने या चर्चा पूर्णत्वास जाऊ शकल्या नाहीत. tv9marathi.com

जी संधी अटलजींच्या काळाता दोन्ही देशांच्या हातातून निसटली, ती संधी पुन्हा आली आहे. उत्तर आणि दक्षिण कोरिया चर्चेसाठी एकत्र येतात तर आपण का नाही?

युद्ध हे कोणत्याही प्रश्नाचं उत्तर असू शकत नाही. दोन्ही देशांत ज्या समस्या आहेत त्यावर चर्चेतून मार्ग काढावा आणि दोन्ही देशात शांततेचं वातावरण निर्माण व्हावं, हीच इच्छा आहे.

पाकिस्तानची खरंच चर्चेची तयारी असेल तर त्यासाठी पहिलं पाऊल हे त्यांनीच उचलायला हवं, ते म्हणजे त्यांच्या कैदेत असलेल्या आमच्या वैमानिकाला, अभिनंदन यांना तात्काळ सोडायला हवं. सीमारेषेजवळचा गोळीबार तात्काळ थांबला पाहिजे. जर तसं झालं तर इम्रान खान यांचा हेतू स्वच्छ आहे असं म्हणता येईल. तसं घडलं तर पंतप्रधान मोदींनी ही संधी गमावू नये.

मी पुन्हा सांगतो की युद्ध अथवा युद्धजन्य परिस्थिती हे कोणत्याही प्रश्नाचं उत्तर होऊ शकत नाही, आणि त्याचा फायदा करुन घेण्याचा प्रयत्न करणे हे कोणत्याही उमद्या राजकारण्याचं लक्षण असू शकत नाही, हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावं.