महिलांच्या लोकल प्रवासाबाबत भाजपचं राजकारण, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा गंभीर आरोप

| Updated on: Oct 20, 2020 | 1:07 PM

सरसकट सर्व महिलांना लोकल प्रवास करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी काँग्रेसकडून होत आहे. भाजप या मुद्द्यावर राजकारण करत असल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

महिलांच्या लोकल प्रवासाबाबत भाजपचं राजकारण, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा गंभीर आरोप
Follow us on

मुंबई: घटस्थापनेच्या मुहूर्तावर महिलांसाठी लोकल प्रवास सुरु करण्याचा राज्य सरकारचा पयत्न होता. यासंदर्भात 13 ऑक्टोबरला चार तास बैठकही पार पडली. पण जेव्हा राज्यानं पत्र दिलं तेव्हा रेल्वे अधिकाऱ्यांनी हात वर केले, असा गंभीर आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यानी केला आहे. महिलांच्या लोकल प्रवासाबाबत अधिकाऱ्यांवर कुणाचा दबाव आहे का? असा सवालही सावंत यांनी विचारला आहे. (Sachin Sawant alligation against bjp regarding womens local travel)

महिलांच्या लोकल प्रवासाबाबत भाजप राजकारण करत असल्याचा आरोपही सावंत यानी केला आहे. कोविड 19 संदर्भातील नियमावली आधीच ठरली होती. मग महिलांसाठी लोकल सुरु करण्यास काय हरकत आहे? रेल्वे मंत्री पियुष गोयल यांची तशी इच्छा नाही काय? असा थेट प्रश्न सचिन सावंत यांनी विचारला आहे. तसंच महिलांच्या लोकल प्रवासावरुन राजकारण करु नका असं आवाहनही सावंत यांनी केलं आहे.

घटस्थापनेचा मुहूर्त साधत राज्य सरकारनं १७ ऑक्टोबरपासून सरसकट सर्व महिलांना लोकल प्रवासाची परवानगी दिली होती. मात्र, रेल्वेनं एवढ्या कमी वेळात नियोजन करणं कठीण असल्याचं सांगितलं. तसंच रेल्वे मंत्रालयाच्या परवानगीशिवाय हा निर्णय घेणे शक्त नाही, असं सांगत रेल्वेनं सरसकट सर्व महिलांना लोकल प्रवासाची परवानगी नाकारली.

महिलांच्या लोकल प्रवासाबाबत लवकरच निर्णयाची शक्यता

महिलांच्या लोकल प्रवासासंदर्भात १७ ऑक्टोबरचा मुहूर्त टळला असला तरी लवकरच याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. १७ ऑक्टोबरनंतर रेल्वे मंत्रालय आणि राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांमध्ये महत्वपूर्ण बैठका झाल्या. या बैठकांनंतर महिलांच्या लोकल प्रवासासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे.

लॉकडाऊनमुळे मुंबई लोकल रेल्वे 22 मार्चपासून बंद होती. त्यानंतर अनलॉक झाले, तेव्हापासून अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना लोकलमधून प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली. पण सर्वसामान्य नागरिकांना लोकलमध्ये प्रवेश मिळत नसल्याने, मुंबईकरांचे प्रचंड हाल होत आहेत. शिवाय रस्त्यावर ट्रॅफिकमुळे मुंबईकरांचे अनेक तास हे प्रवासातच जात आहेत. या पार्श्वभूमीवर मनसेसह अनेकांनी मुंबई लोकल रेल्वे सर्वसामान्यांसाठी सुरू करण्याची मागणी लावून धरली आहे.

संबंधित बातम्या: 

…म्हणून रेल्वे मंत्रालय महिलांसाठी लोकल सेवा सुरू करत नाही; नवाब मलिकांनी सांगितलं ‘राज’कारण

…म्हणून तूर्तास महिलांना लोकलनं प्रवास करता येणार नाही

Sachin Sawant alligation against bjp regarding womens local travel