राज्याची एकच शिफारस स्वीकारणं दुर्दैवी; भाजपशी जवळीक असलेल्यांना पुरस्कार : सचिन सावंत

| Updated on: Jan 26, 2021 | 1:18 PM

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी पद्म पुरस्कारांच्या घोषणेवरुन केंद्र सरकार आणि भाजपवर निशाणा साधला आहे. Sachin Sawant Padma Awards

राज्याची एकच शिफारस स्वीकारणं दुर्दैवी; भाजपशी जवळीक असलेल्यांना पुरस्कार : सचिन सावंत
सचिन सावंत, काँग्रेस प्रवक्ते
Follow us on

मुंबई: काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी पद्म पुरस्कारांच्या घोषणेवरुन केंद्र सरकार आणि भाजपवर निशाणा साधला आहे. राज्य सरकारने जवळपास 92 नावांच्या शिफारशी केल्या होत्या त्यापैकी एकच शिफारस स्वीकारली जाणं हे दुर्दैवी असल्याचं सावंत यांनी म्हटलंय. केंद्र सरकारनं भाजपशी जवळीक असलेल्यांना पुरस्कार दिल्याचा आरोप सचिन सावंत यांनी केला. राज्य सरकारनं शिफारस केलेल्या 92 नावांपैकी केवळ सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाय. केंद्र सरकारने महाराष्ट्रातील सहा जणांना पद्म पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारने रजनीकांत देवीदास श्रॉफ यांना पद्मभूषण तर गिरीश प्रभुणे, नामदेव कांबळे, परशुराम आत्माराम गंगावणे, जसवंतीबेन पोपट आणि सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करून गौरवण्यात आलं आहे. सिंधुताई सपकाळ वगळता राज्यानं इतरांची शिफारस केलेली नसतानाही त्यांना पुरस्कार मिळाला आहे. (Sachin Sawant slams Central Government and BJP over Padma Awards )

भाजपशी जवळीक असणाऱ्यांना पुरस्कार

सचिन सावंत यांनी यावेळी बोलताना भाजपशी जवळीक असणाऱ्या केंद्र सरकारनं पुरस्कार दिल्याचा आरोप केला. युनायटेड फॉस्फरस लिमिटेडच्या सीईओ रजनीकांत श्रॉफ यांना पद्म पुरस्कार जाहीर झालाय. या कंपनीवर 2019 साली निवडणूक आयोगाने छापा टाकली होता. तिथे भाजपच्या प्रचाराचे साहित्य आढळले होते, असा आरोप सचिन सावंतांनी केला. याच कंपनीच्या डायरेक्टर बोर्डावर पियुष गोयल यांचे बंधू आहेत, असही सचिन सावंत म्हणाले. विदर्भात याच कंपनीच्या किटकनाशकांच्या फवारणीत ४० शेतकर्‍यांचा बळी गेला होता, अशी माहिती सावंत यांनी दिली.

युनायटेड फॉस्फरस लिमिटेडच्या सीईओ रजनीकांत श्रॉफ यांना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वाचवलं होते, असा आरोप देखील सचिन सावंतांनी केला. श्रॉफ यांच्यासारख्या लोकांची नाव पुरस्काराच्या यादीमध्ये येतात यावरुन भाजपशी जवळीक हा निकष पद्म पुरस्कारांना लावला गेला, यात शंका नाही, असंही सचिन सावंत म्हणाले.

ठाकरे सरकारने पद्म पुरस्कारांसाठी केंद्राकडे विविध मान्यवरांच्या नावांची शिफारस केली होती. यामध्ये शिवसेना खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचंही नाव होतं. ‘सीरम’चे अदर पूनावाला, दिग्गज अभिनेते विक्रम गोखले, अभिनेत्री माधुरी दीक्षित, अभिनेता सुबोध भावे यांचीही नावं पाठवली होती. केंद्र सरकारनं राज्यानं पाठवलेल्या केवळ एका नावाचा विचार पुरस्कारासाठी केला आहे. विशेष म्हणजे, सिंधुताई सपकाळ यांचा पद्मभूषणने सन्मान करण्याची शिफारस राज्य सरकारने केली होती. मात्र त्यांचाही पद्मश्रीने गौरव होणार आहे.

संबंधित बातम्या:

ज्यांची ठाकरे सरकारनं शिफारस केली नाही; पण मोदींनी दिलं ती मराठी पद्म मंडळी कोण?

हा पुरस्कार माझी झोळी भरणाऱ्यांचा, माझ्या लेकरांचा, मग उरलासुरला माझा : सिंधुताई सपकाळ


(Sachin Sawant slams Central Government and BJP over Padma Awards )