संजय निरुपम बीजेपीत जाणार?, नाराज निरुपम म्हणाले, माझ्यासमोर सर्व पर्याय…

| Updated on: Mar 27, 2024 | 1:06 PM

माझ्यासमोर आता सगळे पर्याय उपलब्ध आहेत. आता आरपारची लढाई होईल. येत्या आठवड्याभरात तुम्हाला घोषणा ऐकायला मिळू शकते, असे सांगत संजय निरुपम यांनी काँग्रेस मधून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. आता ते कोणता पर्याय निवडणार ? भाजपात जाणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संजय निरुपम बीजेपीत जाणार?, नाराज निरुपम म्हणाले, माझ्यासमोर सर्व पर्याय...
संजय निरुपम नाराज
Follow us on

मी फार फार तर अजून एखाद आठवडा वाट पाहीन. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, माझ्यासमोर आता सगळे पर्याय उपलब्ध आहेत. आता आरपारची लढाई होईल. येत्या आठवड्याभरात तुम्हाला घोषणा ऐकायला मिळू शकते, असे सांगत संजय निरुपम यांनी एकप्रकारे काँग्रेस मधून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. आता ते कोणता पर्याय निवडणार ? भाजपात जाणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्रात शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने आज लोकसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यातील 17 उमेदवारांची नावं जाहीर झाली झाली आहेत. मात्र ठाकरे गटाने अमोल कीर्तिकर यांना उत्तर पश्चिम मुंबईतून तिकीट दिलं आहे. विद्यमान खासदार गजानन किर्तीकर यांचे ते सुपूत्र आहेत. गजानन किर्तीकर शिंदे गटासोबत आहेत. मुलगा अमोल उद्धव ठाकरे गटामध्ये आहे. मात्र अमोल किर्तीकर यांना उमेदवारी मिळाल्याने काँग्रेस नेते संजय निरुपम संतापले आहेत. निरुपम यांना उत्तर पश्चिम मुंबईतून उमेदवारी हवी होती. आज पत्रकार परिषदेत त्यांनी त्यांची नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवली.  खिचडी चोर उमेदवारासाठी मी काम करणार नाही अशा शब्दात निरुपम यांनी हल्ला चढवला.

काय म्हणाले संजय निरुपम ?

आज सकाळी शिवसेनेने मुंबईतील चार जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. शिवसेना 6 पैकी 5 जागा लढवणार, मात्र काँग्रेससाठी अवघी एक जागा सोडली आहे. हा काँग्रेसला गाडून टाकणारा हा निर्णय आहे. यासाठी मी शिवसेना नेतृत्वाचा आणि वाटाघाटीत काँग्रेसकडून जे लोक सामील होते, त्यांचा निषेध करतो. एकेकाळी मुंबईतील सहाही जागांवर काँग्रेसचं प्राबल्य होतं, तिथे आज जर पक्षाच्या वाट्याला केवळ एक जागा येत असेल तर हा मुंबईतील काँग्रेसचं अस्तित्व संपवण्याचा घाट घातला जात आहे, याचा विचार व्हायला पाहिजे , असा आरोप संजय निरुपम यांनी केला.

शिवसेना ठाकरे गटाने जो उमेदवार जाहीर केला आहे (अमोल किर्तीकर) त्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्याची सध्या ईडीकडून चौकशी सुरू आहे. कोविड काळात खिचडी घोटाळ्याचे आरोप आहेत. मी अशा खिचडी चोराचे काम करणार नाही, असे निरुपम यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसने वेळोवेळी भ्रष्टाचाराविरोधात ठोस भूमिका घेतली आहे. त्यामुळे शिवसेनेने जाहीर केलेल्या, भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या उमेदवाराच्या नावाबद्दल आमच्या सर्वोच्च नेतृत्वाने आक्षेप नोंदवावा, अशी मी अपेक्षा करतो. आपल्या नेतृत्वाला आता मुंबई आणि संपूर्ण देशाची चिंता राहिलेली नाही. गेल्या 10 दिवस पासून आम्ही कोणाशीही बोललो नाही. आपल्या कार्यकर्त्यांना न्याय मिळतो की नाही, याची चिंता नाही. तुमची काय अपेक्षा आहे, असे कोणीही एकदाही विचारलेलं नाही. काँग्रेसच्या कोणत्याही नेत्यांनी माझ्याशी संवाद साधला नाही, असेही निरुपम म्हणाले.

मी अपेक्षा केली होती, मी माझ्या क्षेत्रात 5 वर्षांपासून सक्रिय आहे आणि मला लढण्याचा अधिकार आहे. अजून आठवडाभर मी वाट पाहीन, नाहीतर माझ्यासमोरचे सर्व पर्याय खुले आहेत, असा इशारा संजय निरुपम यांनी दिला.