चंद्रकांतदादा पत्र लिहिणार..? अरे बापरे..! ताबडतोब… भीती वाटते मला : राऊत

| Updated on: Jan 02, 2021 | 12:48 PM

दैनिक 'सामना'तील अग्रलेखाच्या भाषेवरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील प्रचंड नाराज असून त्यांनी सामनाच्या संपादिका रश्मी ठाकरेंकडे पत्राद्वारे तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे. (sanjay raut criticized chandrakant patil)

चंद्रकांतदादा पत्र लिहिणार..? अरे बापरे..! ताबडतोब... भीती वाटते मला : राऊत
Follow us on

मुंबई: दैनिक ‘सामना’तील अग्रलेखाच्या भाषेवरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील प्रचंड नाराज असून त्यांनी सामनाच्या संपादिका रश्मी ठाकरेंकडे पत्राद्वारे तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे. चंद्रकांतदादांच्या या विधानाची शिवसेना नेते संजय राऊत यांनी खिल्ली उडवली आहे. ‘बापरे, चंद्रकांतदादा पत्रं लिहिणार आहेत. मला भीती वाटतेय, त्यांनी तात्काळ पत्रं लिहावं,’ असा खोचक टोला संजय राऊत यांनी चंद्रकांतदादांना लगावला आहे. (sanjay raut criticized chandrakant patil)

प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी ही टीका केली आहे. चंद्रकांतदादा रश्मी ठाकरे यांना पत्र लिहित असतील तर ताबडतोब लिहा. बापरे, ते पत्रं लिहित आहेत. मला त्याची भीती वाटते, अशी खोचक प्रतिक्रिया राऊत यांनी व्यक्त केली. चंद्रकांतदादा ‘सामना’ वाचतात ही चांगली गोष्ट आहे. कालपर्यंत ते ‘सामना’ वाचत नव्हते. आज वाचतात. चांगलं आहे. त्यांनी ‘सामना’ रोज वाचला पाहिजे. त्यामुळे त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल होईल. रोज पेपर वाचत राहिले तर आघाडी सरकार पाच वर्षे कायम राहणार असल्याचा विश्वासही त्यांच्या मनात निर्माण होईल, असा चिमटाही त्यांनी काढला.

काँग्रेस नेत्यांची संभाजी महाराजांवर अधिक श्रद्धा असणार

औरंगाबादच्या नामांतराला काँग्रेसने विरोध केला आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. शहराच्या नावावर काही मतभेद असूच शकत नाही. काँग्रेस नेते अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण यांची औरंगजेबापेक्षा संभाजी महाराजांवरच जास्त श्रद्धा असणार यात शंका नाही, असं राऊत म्हणाले. बाबर आपला कोणीच लागत नाही. पण प्रत्येक हिंदुंची संभाजी महाराजांवर श्रद्धा आहे, असंही ते म्हणाले.

विमानतळाला संभाजी महाराजांचं नाव का नाही?

औरंगाबादच्या विमानतळाला संभाजी महाराजांचं नाव देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला दिलेला आहे. त्याचं काय झालं? विमानतळाला हे नाव दिलं की नाही? भाजपने त्यावर उत्तर दिलं तर आमच्या ज्ञानात भर पडेल, असा चिमटाही त्यांनी भाजपला काढला. औरंगाबादचं नामांतर कधीच झालंय. फक्त कागदावर ते नाव बदलायचं राहिलंय, असं सांगतानाच अयोध्येचं नामकरण केलं तेव्हाच केंद्राला औरंगाबादचंही नामकरण करता आलं असता असा टोलाही त्यांनी लगावला.

राष्ट्रभक्ती कोणत्याही धर्मावर अवलंबून नाही

हिंदू कधीच राष्ट्रविरोधी होऊ शकत नाही, असं विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं होतं. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. हा देश स्वतंत्र करताना सर्वच जाती धर्माच्या लोकांनी बलिदान केलं आहे. कारगील युद्धात तर 35 पेक्षा जास्त मुस्लिम जवान शहीद झाले आहेत. आजही सीमेवर सर्वच जाती धर्माचे लोक तैनात आहेत, असं सांगतानाच राष्ट्रभक्ती कोणत्याही जातीधर्मावर अवलंबून नसते, असा टोलाही त्यांनी लगावला. (sanjay raut criticized chandrakant patil)

 

संबंधित बातम्या:

शनिवार विशेष: राज ठाकरेंचा ‘मराठी अजेंडा’ पालिकेत मतं मिळवून देणार? मराठी बोलाचा कसाय बोलबाला?

मुख्यमंत्री साहेब सरकार इतकं निर्दयी कसं झालं…? मनसेकडून उद्धव ठाकरेंना अनोख्या शुभेच्छा

चंद्रकांत पाटील म्हणतात ‘सामना’तून माझ्यावर गलिच्छ टीका; शिवसेनेनं दिलं प्रत्युत्तर

(sanjay raut criticized chandrakant patil)