ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के, संजय राऊत कडाडले, मुंबईत आता काय घडणार?

उद्धव ठाकरे यांनी घोषित केलेल्या मोर्चाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यामुळे 1 जुलैला मुंबईत काय घडतं? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के, संजय राऊत कडाडले, मुंबईत आता काय घडणार?
sanjay raut
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 27, 2023 | 4:52 PM

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाकडून येत्या 1 जुलैला मुंबई महापालिकेवर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण देत मुंबई पोलिसांनी या मोर्चाची परवानगी नाकारली आहे. पण याच गोष्टीवरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत चांगलेच आक्रमक झाले आहेत. “महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न असेल आणि त्या कारणासाठी आमच्या आक्रोश मोर्चाला परवानगी नाकारली जात असेल, आम्ही कोण आहोत? हा काय अतिरेक्यांचा मोर्चा आहे?”, असा सवाल संजय राऊत यांनी केला. “या मुंबईतल्या नागरिकांचा मोर्चा आहे. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न असेल तर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे. कारण कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती त्यांच्यामुळे कोसळली आहे”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

संजय राऊत यांना यावेळी पत्रकारांनी मुंबई महापालिकेकडून शिवसेनेच्या शाखेवर करण्यात आलेल्या कारवाईबाबत प्रश्न विचारला. तसेच या कारवाईनंतर जो वाद उफाळला त्यावर स्पष्टीकरण देताना राऊत यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचं समर्थन केलं. “बाळासाहेब ठाकरे यांना राष्ट्रपुरुषाचा दर्जा दिला आहे. राष्ट्रपुरुषांचा अवमानाबद्दल जी शिक्षा असते ती शिक्षा त्या अभियंत्याला ठोठावा, ज्याने बाळासाहेबांच्या छायाचित्रावर हातोडा मारण्याचे आदेश दिले”, असं संजय राऊत म्हणाले.

‘मुख्यमंत्र्यांचा मुलाकडून शाखा पाडण्याचे आदेश’

“तुम्ही कायदा-सुव्यवस्थेच्या गोष्टी करताय. शाखा बेकायदेशीर आहे, अशी 40 वर्षांनी जागा आली का? ती शाखा 40 वर्षांपासून तिथे आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याहून शाखा पाडण्यासाठी आदेश देण्यात आले. मुख्यमंत्री निवासस्थानातून हे आदेश दिले जात आहेत. मुख्यमंत्र्यांचा मुलगा हा आदेश देत आहे”, असा मोठा दावा संजय राऊत यांनी केला.

संजय राऊत यांचा देवेंद्र फडणवीस यांना इशारा

“बाळासाहेब ठाकरेंचा अशाप्रकारे कुणी अपमान करत असेल तर शिवसैनिक अनिल परब असतील किंवा आम्ही सगळे असू, अशाप्रकारचे गुन्हे, कारवाई, आम्ही अंगावर घ्यायला तयार आहोत. मिस्टर फडणवीस आपण गृहमंत्री असाल पण आम्ही शिवसैनिक आहोत”, असं संजय राऊत म्हणाले.

कोर्टाकडून मिळालेल्या समन्सवर राऊत म्हणतात….

दरम्यान, संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांना राहुल शेवाळे यांनी दाखल केलेल्या मानहानी प्रकरणात कोर्टाने समन्स बजावले आहेत. कोर्टाने राऊत आणि ठाकरे यांना 14 जुलैला कोर्टात हजर राहण्याचे आदेश आले आहेत. या विषयी राऊतांना प्रश्न विचारला असता त्यांनी “सोडून द्या. असे शंभर समन्स मला येतात”, अशी प्रतिक्रिया दिली.

Follow Us