संजय राऊत यांनी ‘ती’ चूक टाळली, अजित पवार यांचं बोलणं लक्षात ठेवलं

| Updated on: Jun 10, 2023 | 4:27 PM

आपल्या वक्तव्यामुळे अजित पवार नाराज होऊ नये, तसेच महाविकास आघाडीत काही वाद उद्भवू नये याची काळजी संजय राऊत यांनी यावेळी घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील सध्या घडत असलेल्या घडामोडींवर संजय राऊत यांनी अजित पवार यांच्या विरोधात प्रतिक्रिया दिलेली नाहीय.

संजय राऊत यांनी ती चूक टाळली, अजित पवार यांचं बोलणं लक्षात ठेवलं
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षचे अध्यक्ष शरद पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. त्यांच्या या नियुक्तीवरुन विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर अन्याय झाला, अशा चर्चांना उधाण आलं आहे. या चर्चांवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना विचारलं असता त्यांनी सावध भूमिका घेतली. “महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत घडामोडींवर आम्ही कोणतंही भाष्य करणार नाहीत. कुणावर न्याय, अन्याय झाला असेल तर ती व्यक्ती बोलेल ना? बाहेरच्यांनी का बोलावं? त्यांचं वकीलपत्र त्यांनी कुणाला दिलंय का? भाजपला दिलंय का? तर नाही. ते समर्थ आहेत. शरद पवार समर्थ आहेत”, अशी स्पष्ट भूमिका संजय राऊत यांनी मांडली आहे.

शरद पवार यांनी गेल्या महिन्यात जेव्हा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तेव्हा संजय राऊत यांनी रोखठोक भूमिका मांडली होती. त्यांनी अजित पवार यांच्या वागणुकीवर आणि भूमिकेवर बोट ठेवलं होतं. राऊतांनी अजित पवार यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर अजित पवार यांनी संजय राऊतांना चांगलंच सुनावलं होतं. राष्ट्रवादीच्या घडामोडींवर बाहेरच्या पक्षाच्या लोकांनी का बोलावं? त्यांना पक्षाचं वकीलपत्र दिलं आहे का? असे सवाल अजित पवार यांनी केले होते. त्यांच्या त्याच वक्तव्यानंतर यावेळी राऊतांनी कोणताही वाद होईल असं वक्तव्य करणं टाळलं आहे.

‘राष्ट्रवादीच्या घडामोडींवर आम्ही का बोलावं?’

“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली तेव्हा जिमखान्यावरुन आम्ही सगळे हा सोहळा पाहत होतो. कारण ती एक ऐतिहासिक घटना होती. प्रचंड गर्दी उसळलेली होती. आम्ही पाहिलं शरद पवार होते, अनेक जण होते, आम्ही होतो, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, बरेच लोकं होते. राजकीय घडामोड घतडेय, त्या घटनेला 25 वर्षे झाली. आता 25 वर्षानंतर त्या पक्षामध्ये घडामोडी घडत असतील, नवीन जबाबदाऱ्या कुणावर टाकल्या असतील, त्यावर का बोलावं? शरद पवार त्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी नवीन जबाबदारी दिल्या असतील. ज्या पक्षाला 25 वर्षे पूर्ण होतोय, रौप्य महोत्सव साजरा होतोय त्याला आमच्या शुभेच्छा आहेत”, असं संजय राऊत म्हणाले.

हे सुद्धा वाचा

शरद पवारांनी अजित पवारांचे पंख कापले? राऊत म्हणतात…

शरद पवारांनी अजित पवार यांचे पंख कापले की त्यांचा पक्षातून बाहेर पडण्यासाठीचा मार्ग मोकळा केला? असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला. त्यावर संजय राऊत यांनी “मला तसं वाटत नाही. अजित पवार हे विधीमंडळ पक्षाचे नेते आहेत. ते विरोधी पक्षनेते आहेत. ही दोन्ही पदं फार महत्त्वाची आहेत एवढंच मी सांगतो”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.