धमकी की खोके? शिवसेनेचे 40 आमदार खरंच कशामुळे पळून गेले, संजय राऊत यांचं रोखठोक मत

"मी जे म्हणालो ते म्हणालो आहे. मी काही नाकारत नाही. पण हे अर्धवट वक्तव्य आहे. माझं म्हणणं होतं की, जे पळून गेले आहेत ते राज्यात येतील तेव्हा ते जिवंत प्रेतं असतील", असं संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

धमकी की खोके? शिवसेनेचे 40 आमदार खरंच कशामुळे पळून गेले, संजय राऊत यांचं रोखठोक मत
Chetan Patil | Updated on: Jan 31, 2023 | 7:05 PM

मुंबई : शिवसेना उद्धव बळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज ‘टीव्ही 9 मराठी’ला विशेष मुलाखत दिली. यावेळी ‘टीव्ही 9 मराठी’चे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांवर संजय राऊत यांनी रोखठोक उत्तरे दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाने संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केलाय. केंद्रीय निवडणूक आयोगात (Election Commission) सादर केलेल्या लेखी उत्तरात शिंदे गटाने दावा केलाय की, संजय राऊत यांनी आपल्याला धमकी दिलेली. त्या धमकीला घाबरुन सर्व आमदार पळून गेले, असा दावा करण्यात आलाय. त्यावर संजय राऊत यांनी रोखठोक उत्तर दिलं. याशिवाय 16 अपात्र आमदारांच्या मुद्यावरही संजय राऊत यांनी उत्तर दिलं.

“धमकीमुळे आमदार पळाले हे जर त्यांचं वक्तव्य असेल तर मग आधीचे त्यांचे वक्तव्य असतील की का पळाले? त्याचं काय? मुळात हे सगळे लोकं आधी सुरतला होते. ते सुरतहून गुवाहाटीला गेले. त्यांचा प्रवास मुंबई-सुरत-गुवाहाटी असा आहे. ते गुवाहाटीला पोहोचल्यावरती माझं वक्तव्य आहे. ते धादांत खोटं बोलत आहेत. हे त्यांचे बहाणे आहेत”, असं संजय राऊत म्हणाले.

“आधी म्हणत होते की, महाविकास आघाडी स्थापन केली म्हणून पळून गेलो, भाजपसोबत युती केली नाही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेलो म्हणून अस्वस्थ झालो आणि म्हणून पळून गेलो, आम्ही हिंदुत्व सोडलं म्हणून पळून गेलो, राष्ट्रवादी आम्हाला काम करु देत नाही म्हणून पळून गेलो, आता म्हणतात आम्ही धमक्या दिल्या म्हणून पळून गेलो. कुठल्यातरी एका वक्तव्यावर ठाम राहा”, असं राऊत यांनी शिंदे गटाच्या आमदारांना ठणकावून सांगितलं.

“मी जे म्हणालो ते म्हणालो आहे. मी काही नाकारत नाही. पण हे अर्धवट वक्तव्य आहे. माझं म्हणणं होतं की, जे पळून गेले आहेत ते राज्यात येतील तेव्हा ते जिवंत प्रेतं असतील. त्यांचा आत्मा नसेल. माणसं असतील, पण त्यांच्यातला आत्मा संपलेला असेल. या अर्थाने मी म्हणालो. आताही ते जिवंत प्रेतच आहेत”, असं वक्तव्य त्यांनी केलं.

आमदार नेमके का पळून गेले? संजय राऊत म्हणतात…

“सहा ते सात आमदारांमागे केंद्रीय तपास यंत्रणाचा तपास सुरु होता. सहा ते सात आमदार आणि पाच खासदारांमागे केंद्रीय तपास यंत्रणांचा चौकशीचा ससेमिरा होता. याशिवाय अनेकांना पैसे दिलेले आहेत. आमिष देण्यात आले आहेत. शेवटी राजकारणात आमिषापोटीच माणूस विकला जातो. तत्व, नितिमुल्ल्यांसाठी राजकारण करण्याच्या गोष्टी आता संपल्या. तो काळ गेला. आता आमिषं, लोभ, स्वार्थ. खोके आहेत. ते खोक्यांशिवाय कसे जातील? त्यातील काही आमदारांनी मान्य केलंय की, होय आम्ही खोके घेतले आहेत”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

“केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव आणि खोके अशी ती युती आहे”, अशी टीका त्यांनी यावेळी केली.

‘…तेव्हा जिवंत प्रेत असाल हा मराठीतला वाक्यप्रचार’

“ही धमकी आहे की सत्य आहे. तुम्ही परत याल तेव्हा जिवंत प्रेत असाल हा मराठीतला वाक्यप्रचार आहे. कुणी त्याला धमकी म्हणून घेत असतील. ते स्वत:ला बेडर समजत होते. तुम्ही शूरवीर समजत होता तर पळून का गेलात? आधील सुरतला जाता तिथे व्यवहार करतात, मग गुवाहाटीला जावून जादूटोणा करतात. या लोकांवर जादूटोण्यावरुन कारवाई केली पाहिजे”, असं संजय राऊत म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us