दावोसला जाण्यापेक्षा आधी गुजरातला जा; संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

| Updated on: Jan 16, 2023 | 10:34 AM

न्याय व्यवस्थेत होत असलेल्या ढवळाढवळीवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. कपिल सिब्बल यांनी सांगितलं सरकार संपूर्ण न्याय यंत्रणा ताब्यात घेऊ इच्छिते.

दावोसला जाण्यापेक्षा आधी गुजरातला जा; संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
sanjay raut
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

निखिल चव्हाण, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल दावोसच्या दौऱ्यावर गेले आहेत. दावोसमधून राज्यासाठी मोठी गुंतवणूक आणणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. तुमच्या नाकासमोर राज्यातील प्रकल्प पळवले. गुजरातने हे प्रकल्प पळवले. त्यामुळे राज्याचं मोठं नुकसान झालं. गुंतवणूक गेली आणि रोजगारही गेले आहेत. त्यामुळे दावोसला जाण्याआधी गुजरातला जा, असा टोला संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे. मीडियाशी संवाद साधताना संजय राऊत यांनी हा टोला लगावला.

दावोसमधून काय येतं ते माहीत नाही. तुमच्या नाकासमोर जे उद्योग पळवून नेले ते आणा. वेदांत, एअरबससारखे प्रकल्प गेले. दोन लाख कोटीच्यावरची गुंतवणूक तुमच्या नाकासमोर गुजरात आणि इतर राज्य घेऊन गेले. ते आधी घेऊन या, असं संजय राऊत म्हणाले.

हे सुद्धा वाचा

दावोसचे करार कसे होतात हे आम्हाला माहीत आहे. तिकडे जगभरातून राज्यकर्ते येतात. आपले करारमदार करतात. मग तुम्ही सांगता पाच लाख कोटीचे करार झाले, दहा लाख कोटींचे करार झाले… आतापर्यंत राज्यकर्त्यांनी दावोसला जाऊन किती कोटीचे करार केले ते प्रुव्ह करू शकले नाही, असा खळबळजनक दावा राऊत यांनी केला.

फॉक्सकॉन वेदांता असेल, ड्रग्स पार्क असेल, एअर बस हे प्रकल्प महाराष्ट्रात आले होते. ते तुमच्यासमोरून कुणी तरी खेचून नेले. त्यामुळे दावोसला जाण्यापेक्षा गुजरातला जा. गुजरातने नेलेले प्रकल्प महाराष्ट्रात घेऊन या, असा हल्लाही त्यांनी चढवला.

न्याय व्यवस्थेत होत असलेल्या ढवळाढवळीवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. कपिल सिब्बल यांनी सांगितलं सरकार संपूर्ण न्याय यंत्रणा ताब्यात घेऊ इच्छिते. इतर सर्व यंत्रणा त्यांनी ताब्यात घेतल्या आहेत. आता न्याय व्यवस्थेवर हातोडा घालायचा बाकी आहे. ती प्रक्रिया सुरू झालीय असं मला वाटतंय, असंही ते म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल दावोसच्या दौऱ्यावर गेले आहेत. त्यांच्यासोबत उद्योगमंत्री उदय सामंतही आहेत. दावोसमध्ये मोठ्या प्रमाणावर करार होणार असून महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक येणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.