सेन्सेक्सची इतिहासातील सर्वात मोठी घसरण, कोरोनाचा मुंबई शेअर बाजारात कहर

| Updated on: Mar 23, 2020 | 5:10 PM

कोरोनाचा हाहाकार जगभरात असताना, मुंबई शेअर बाजारालाही  (Sensex collapsed) त्याला मोठा फटका बसला. मुंबई शेअर बाजार इतिहासात पहिल्यांदाच तब्बल 3934 अंकांनी कोसळला

सेन्सेक्सची इतिहासातील सर्वात मोठी घसरण, कोरोनाचा मुंबई शेअर बाजारात कहर
Follow us on

मुंबई : कोरोनाचा हाहाकार जगभरात असताना, मुंबई शेअर बाजारालाही  (Sensex collapsed) त्याला मोठा फटका बसला. मुंबई शेअर बाजार इतिहासात पहिल्यांदाच तब्बल 3934 अंकांनी कोसळून, 25,981.24 अंकांवर बंद झाला. याशिवाय राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात निफ्टीतही 1110 अंकांची घट होऊन निफ्टी 7634 अंकांवर बंद झाली. (Sensex collapsed)

शेअर बाजार सुरु झाल्यानंतर मोठी पडझड होऊन, मार्केट तब्बल 10 टक्क्यांपेक्षा जास्त अंकांनी कोसळलं. त्यामुळे 45 मिनिटांसाठी लोअर सर्किट लावण्यात आलं. त्यानंतर बाजार सुरु होताच मार्केट काहीस स्थिरस्थावर होईल अशी अपेक्षा होती. मात्र निर्देशांकात तब्बल 3934 अंकांची पडझड पाहायला मिळाली.

आठवड्याच्या सुरुवातीला आज बाजाराची सुरुवात पडझडीने झाली. सकाळी सकाळी सेन्सेक्समध्ये 2991 अंकांची घसरण होऊन, तो 26,924 अंकांपर्यंत पोहोचला. मार्केट 10 टक्क्यांपेक्षा जास्त अंकांनी कोसळल्याने ट्रेडिंग थांबवून लोअर सर्किट लावण्यात आलं.

लोअर सर्किट

जेव्हा मार्केट 10 टक्क्यांपेक्षा जास्त कोसळतं त्यावेळी लोअर सर्किट लावलं जातं म्हणजेच शेअर मार्केटचे व्यवहार काही काळासाठी थांबवले जातात. नुकतंच दहा दिवसांपूर्वी म्हणजेच 13 मार्चला शेअर बाजारात लोअर सर्किट लावण्यात आलं होतं. त्या आधी मे 2008 मध्ये अशाच पडझडीमुळे शेअर मार्केट काही काळासाठी बंद करण्यात आला होता. त्यावेळी जागतिक मंदीचं सावट भारतीय बाजारात दिसत होतं.

व्यापार बंद का केला जातो?

गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीचे संरक्षण करण्यासाठी व्यापारावर बंदी घालण्यात येते. यामुळे गुंतवणूकदारांचे नुकसान होण्याचे संकट अधिकच गहिरे होण्यास चाप बसतो.

सेबीचे नियम काय?

SEBI म्हणजे Securities and Exchange Board of India किंवा भारतीय सुरक्षा आणि विनिमय मंडळाने निर्देशांकाबाबत काही नियम ठरवले आहेत. ‘सेबी’च्या नियमानुसार –

  • निर्देशांक (सेन्सेक्स किंवा निफ्टी) एक वाजण्याआधी 10 टक्क्यांनी घसरले, तर व्यवहार 45 मिनिटांसाठी थांबवण्यात येतो.
  • दुपारी एक ते अडीच वाजताच्या दरम्यान पडला, तर हा कालावधी 15 मिनिटांचा असतो. तर दुपारी अडीचनंतर पडल्यास व्यवहार थांबत नाहीत.

दिग्गज कंपन्यांचे शेअर्स घसरले
शेअर बाजारातील पडझडीचा फटका सर्वांनाच बसला. आरआयएल आणि आयसीआयसीआय बँकसह दिग्गज कंपन्यांचे शेअर दहा ते १५ टक्क्यांनी घसरले. इंडसइंड बँक २४ टक्के तर अक्सिस बँकेचे शेअर २८ टक्क्यांपर्यंत घसरले.

संबंधित बातम्या

Share Market Live | त्सुनामीनंतर शेअर बाजाराची भरारी, सेन्सेक्समध्ये 500 अंकांची वाढ