पंजाबला अस्वस्थतेकडे नेण्याचं पातक करू नका; पवारांचं केंद्र सरकारला आवाहन

| Updated on: Jan 26, 2021 | 6:04 PM

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यावर चिंता व्यक्त केली. (sharad pawar reaction on Farmer Tractor rally violence)

पंजाबला अस्वस्थतेकडे नेण्याचं पातक करू नका; पवारांचं केंद्र सरकारला आवाहन
शरद पवार
Follow us on

मुंबई: दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यावर चिंता व्यक्त केली. एकेकाळी अस्वस्थ असलेला पंजाब आता सावरला आहे. त्या पंजाबला पुन्हा अस्वस्थतेकडे नेण्याचं पातक करू नका, असं आवाहन शरद पवार यांनी केंद्र सरकारला केलं. (sharad pawar reaction on Farmer Tractor rally violence)

शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधून केंद्र सरकारला कानपिचक्या दिल्या. अजूनही वेळ गेलेली नाही. केंद्र सरकारने शहाणपणा दाखवावा. टोकाची भूमिका घेऊ नये. शेतकऱ्यांच्या रास्त प्रश्नांसंबंधित अनुकूल निर्णय घ्या, असं सांगतानाच बळाचा वापर करून निर्णय घेणं योग्य नाही. तशी मानसिकताही ठेवू नका. एकेकाळी अस्वस्थ असलेला पंजाब आपण पाहिला आहे. तो सावरलेला आहे. पुन्हा पंजाबला अस्वस्थतेकडे नेण्याचं पातक मोदी सरकारने करू नये, असं आवाहनही त्यांनी केलं.

मी यापूर्वीही शेतकऱ्यांचे मोर्चे पाहिले आहेत. अगदी मोर्च्यांवर गोळीबार झालेलाही पाहिला आहे. पण फक्त शेतकरी वर्गालाच टार्गेट करण्याचा प्रकार पहिल्यांदाच झाला आहे. शेतकऱ्यांना खलिस्तानी ठरवणं, त्यांना पाकिस्तानी संबोधणं, त्यांच्या झेंड्यावरून वक्तव्य करणं हा आततायीपणा आहे, असं सांगतानाच देशाच्या प्रमुखाने शेतकऱ्यांशी चर्चा करायला हवी होती. दिल्लीतच शेतकरी आंदोलनाला बसले आहेत. चर्चा करायला हरकत नव्हती, असंही ते म्हणाले.

म्हणून आंदोलन चिघळलं

गेल्या 60 दिवसांपासून पंजाब-हरयाणाचे शेतकरी आंदोलन करत आहेत. कडाक्याच्या थंडीत बसून त्यांचं म्हणणं मांडत आहेत. शेतकऱ्यांनी 60 दिवस संयम दाखवला ही अभूतपूर्व गोष्ट आहे. इतक्या संयमाने भूमिका गेणारे शेतकरी असताना केंद्राने सकारात्मक पुढाकार घेऊन मार्ग काढायला हवा होता, असं त्यांनी सांगितलं. इतके दिवस संयमाने आंदोलन केल्यानंतर वेगळ्या मार्गाने म्हणणं मांडण्यासाठी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर मोर्चा काढला असावा. इतक्या दिवसानंतर संयमाने आंदोलन करणारे लोक रस्त्यावर उतरतात तेव्हा सरकारने त्याकडे समंजसपणे पाहायला हवे होते. त्यांच्या रॅलीला येण्याजाण्यासाठी परवानगी द्यायला हवी होती. त्यांचे मार्ग आखून द्यायला हवे होते. 25 हजार ट्रॅक्टर रस्त्यावर उतरल्यावर काय परिस्थिती होईल याचा अंदाज त्यांना यायला हवा होता. पण पोलिसांनी जाचक अटी लादल्याने प्रतिकार झाला. वातावरण चिघळलं, असं सांगातनाच जे घडलं त्याचं समर्थन करता येणार नाही. पण ते का घडलंय याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असंही ते म्हणाले.

आघाडी सरकार सारखा संयम दाखवायला हवा होता

मुंबईतही काल सोमवारी हजारो शेतकरी आले. पण राज्य सरकारने संयमाची भूमिका घेतली. त्यामुळे शेतकरी शांतपणे आले आणि शांतपणे गेले. राज्य सरकारने परिस्थिती यशस्वीपणे हाताळली. केंद्र सरकारनेही असाच संयम दाखवायला हवा होता. बळाचा वापर करून प्रश्न मार्गी लावू शकतो असं जर केंद्राला वाटत असेल तर ते योग्य नाही, असंही त्यांनी सांगितलं. (sharad pawar reaction on Farmer Tractor rally violence)

गुप्तचर यंत्रणेच्या माहितीची दखल घेतली नाही

ट्रॅक्टर रॅलीत नॉन पॉलिटिकल एलिमेंट्स आल्याच्या वृत्ताचा पवारांनी इन्कार केला. रॅलीत नॉन पॉलिटिकल एलिमेंट्स आल्यावर ते इतका उद्रेक करू शकतात का? असा सवाल पवारांनी केला. 25 हजार ट्रॅक्टर एकत्र आल्यावर त्याचे काय परिणाम होतील? कसे होतील? याचा सरकाने विचार करायला हवा होता. गुप्तचर यंत्रणनेने याबाबत सरकारला माहिती दिली असेल. पण माहिती असूनही त्याची दखल घेतल्या गेली नाही. गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या माहितीची दखलच घेतली नाही तर त्याचे काय परिणाम होतात हे दिसून आलं आहे, असंही ते म्हणाले. (sharad pawar reaction on Farmer Tractor rally violence)

संबंधित बातम्या:

Delhi Farmers Tractor Rally | केंद्राने अजूनही शहाणपणा दाखवावा, टोकाची भूमिका घेऊ नये : शरद पवार

आंदोलन करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना जेलमध्ये टाका; त्यांची संपत्ती जप्त करा: कंगना रनौत

Ayodhya Mosque : प्रजासत्ताक दिनी अयोध्येतील मशिदीचा शिलान्यास, लवकरच बांधकामाला सुरुवात

(sharad pawar reaction on Farmer Tractor rally violence)