‘माँ साहेबांचा राजकारणात हस्तक्षेप नव्हता, पण…’; गोगावले काय बोलले मातोश्रीबद्दल?

राष्ट्रवादी पक्षातून अजित पवार यांनी भाजपसोबत जात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे शिंदे गटाची गोची झाल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. अशातच शिंदे गटातील आमदार भरत गोगावले यांनी मातोश्रीबाबत बोलताना मोठा दावा केला आहे.

माँ साहेबांचा राजकारणात हस्तक्षेप नव्हता, पण...; गोगावले काय बोलले मातोश्रीबद्दल?
Harish Malusare | Updated on: Jul 11, 2023 | 10:02 PM

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वात मोठा राजकीय भूकंप केला होता. शिवसेना पक्षाने अनेक बंड पाहिले मात्र एकनाथ शिंदे यांनी पक्षावरच दावा केला होता. मात्र आता राष्ट्रवादी पक्षातून अजित पवार यांनी भाजपसोबत जात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे आता शिंदे गटाची गोची झाल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत.

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार आता लवकरच होणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामध्ये शिंदे गटातील आमदार अजित पवार गटातील आमदार यांच्यात रस्सीखेच पाहायला मिळत आहे. अशातच शिंदे गटातील आमदार भरत गोगावले यांनी मंत्रिपदावर दावा केला आहे. त्यासोबतच यावेळी बोलताना गोगावलेंनी नाव न घेता रश्मी ठाकरेंना लक्ष्य केलं आहे.

भरत गोगावले काय म्हणाले?

कोणत्याही राजकारण्याचा इतिहास बघा, रामायण, महाभारतापासून ते आत्तापर्यंत ज्या कुटुंबाने हस्तक्षेप करायला सुरूवात केली की पक्ष आणि कार्यकर्ते नाराज होतात. बाळासाहेबांनी माँ साहेबांनी कधी हस्तक्षेप करू दिला नाही.  बाळासाहेबांनी मा साहेबांना कधी राजकारणात आणलं नाही त्या पडद्यामागे राहून आमच्यावर नेहमी मुलाप्रमाणे प्रेम करत होत्या पण तसं उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत झालं नाही हाच मोठा फरक आहे. भाताच्या शितावरून भात शिजला आहे की नाही हे समजतं, मी काय बोलतो हे समजून इथेच थांबतो, जय हिंद जय महाराष्ट्र, असं म्हणत भरत गोगावले म्हणाले.

भरत गोगावले यांच्या वक्तव्याचा अर्थ असाच होतो की उद्धव ठाकरे नेतृत्त्व करत असताना कुटुंबामधून पक्षात हस्तक्षेप करण्यात येत होता. इतकंच नाहीतर गोगावले यांनी मा साहेबांचा राजकारणात हस्तक्षेप नव्हता हे सांगत त्यांनी नाव न घेता अप्रत्यक्षपणे रश्मी ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

येत्या दोन दिवसांंमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं वाटत आहे. आमची मंत्रिपदाची तयारी झाली आहे. तिकडून फोन येण्याच्या आम्ही तयारीमध्ये आहोत. वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा झाली आहे त्यामध्ये निश्चितच काहीतरी ठरलं असेल, असं भरत गोगावले यांनी सांगितलं.

दरम्यान, भरत गोगावले यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना शितावरून भाताची परीक्षा म्हणत सूचक वक्तव्य केलं आहे. कारण गोगावलेंनी नाव न घेता रश्मी ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. यावर उद्धव ठाकरे काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us