BREAKING | पद धोक्यात असल्याच्या वृत्ताने शिवसेनेच्या मंत्र्यांचं टेन्शन वाढलं, पडद्यामागे काय घडतंय?

| Updated on: Jun 13, 2023 | 4:20 PM

राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर शिवसेना मंत्र्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पाऊणतास चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.

BREAKING | पद धोक्यात असल्याच्या वृत्ताने शिवसेनेच्या मंत्र्यांचं टेन्शन वाढलं, पडद्यामागे काय घडतंय?
Follow us on

मुंबई : शिवसेनेच्या 5 मंत्र्यांच्या कामकाजांवर भाजपचं दिल्लीतील हायकमांड नाराज आहे. त्यामुळे हायकमांडने संबंधित शिवसेनेच्या 5 मंत्र्यांचा राजीनामा घेण्याची सूचना केल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात आलाय. त्यानंतर आता आगामी मंत्रिमंडळ विस्तारात या मंत्र्यांना डच्चू मिळणार का? अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे. संबंधित चर्चांचं भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी खंडन केलं आहे. तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी देखील खंडन केलंय. पण तरीही शिवसेनेच्या मंत्र्यांचं टेन्शन वाढलं आहे. संबंधित वृत्त खरं असेल तर आपलं पद धोक्यात आहे या विचाराने ते टेन्शनमध्ये आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर शिवसेना मंत्र्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पाऊणतास चर्चा केली. शिवसेनेतील 5 मंत्र्यांची मंत्रीपद धोक्यात असल्याच्या वृत्तावरून या मंत्र्यांचे टेन्शन वाढलं आहे. त्यामुळे या मंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली.

मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी

या बैठकीत मंत्र्यांनी संबंधित वृत्ताची जोरदार चर्चा होत असल्याने नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे कॅबिनेट बैठकीपेक्षा मंत्र्यांच्या याच बैठकीला सर्वाधिक उशिर झाल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरु झाल्या आहेत.

‘कुठलीही नाराजी नाही’, केसरकरांचं स्पष्टीकरण

दरम्यान, कॅबिनेट बैठक संपल्यानंतर मंत्री दीपक केसरकर, मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी कुठलीही नाराजी नाही, असं सांगितलं. पण ज्यावेळी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल त्याचवेळी याबाबतचं चित्र स्पष्ट होईल.

दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मनात कोणत्याही मंत्र्याबद्दल नाराजी नाही. या अशा बातम्या प्लॅन करुन सोडल्या जात आहेत, अशी टीका दीपक केसरकर यांनी केली. ज्या पाच मंत्र्यांची नावे चर्चेत होती त्यापैकी संजय राठोड, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार यांच्यासह शिवसेनेच्या मंत्र्यांची देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा पार पडली. त्यामुळे अशा प्रकारच्या बातम्या चुकीच्या आहेत, असं त्यांनी स्पष्ट केलं.

शिवसेनेच्या जाहिरातीमुळे भाजप नेते नाराज

भाजप आणि शिवसेना युतीत कल्याणमधील घटनाक्रमामुळे वाद निर्माण झालेला बघायला मिळाला. हा वाद वरिष्ठ नेते चर्चा करुन सोडवतील, अशी प्रतिक्रिया दोन्ही बाजूच्या नेत्यांनी सांगितली. पण त्यानंतर आज अचानक शिवसेनेच्या वृत्तपत्रातील जाहिरातीमुळे खळबळ उडाली.

या जाहिरातीत राष्ट्रात मोदी, तर महाराष्ट्रात शिंदे असं म्हटलंय. तसेच सर्वात उत्कृष्ट मुख्यमंत्र्यांच्या टक्केवारीत एकनाथ शिंदे यांना देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा जास्त पसंती असल्याचं टक्केवारीत सांगण्यात आलं आहे. या जाहिरातीमुळे भाजप नेते नाराज झाले आहेत. भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी तर शिवसेनेची ही जाहिरात चुकीची असल्याचं म्हटलं आहे.