पक्ष गेला, चिन्ह गेले, आता शिवसेना भवनावर कोणाची मालकी असणार

दादरमधील शिवसेना भवन आणि सामना, मार्मिक यांची मालकी कोणाकडे जाणार? असा प्रश्न सामान्यांच्या मनात असणार आहे. शिवसेना गेल्यावर उद्धव ठाकरे यांचा शिवसेना भवनावर अधिकार राहील का, हा प्रश्न आहे.

पक्ष गेला, चिन्ह गेले, आता शिवसेना भवनावर कोणाची मालकी असणार
Image Credit source: टीव्ही९ नेटवर्क
Jitendra Zavar | Updated on: Feb 18, 2023 | 12:25 PM

मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यांकडून शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह (Shiv Sena Symbol)गेले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबतचा आदेश शुक्रवारी दिला आहे. निवडणूक आयोगाच्या निकालात शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले आहे. आता दादरमधील शिवसेना भवन आणि सामना, मार्मिक यांची मालकी कोणाकडे जाणार? असा प्रश्न सामान्यांच्या मनात असणार आहे. शिवसेना गेल्यावर उद्धव ठाकरे यांचा शिवसेना भवनावर अधिकार राहील का, हा प्रश्न आहे. तसेच मुंबईतील २२७ प्रभागांमध्ये असणाऱ्या शाखांचे काय होणार? यावर चर्चा होत आहे.

 

शिवसेना भवन कोणाचे?


शिवसेनेचे दादरमधील सेना भवन यावर पक्षाची मालकी नाही. हे भवन शिवाई ट्रस्टच्या मालकीचे आहे. शिवाई ट्रस्टचे अध्यक्ष लीलाधर डाके आहेत. ते उद्धव ठाकरे यांचे विश्वासू आहेत. तसेच इतर ट्रस्टीही उद्धव ठाकरे यांच्या विश्वासातील आहे. यामुळे पक्ष आणि चिन्ह गेले तरी शिवाई ट्रस्ट म्हणजेच शिवसेना भवन उद्धव ठाकरे यांचे राहणार आहे.

सामना अन् मार्मिकचे काय होणार?


सामना हे दैनिक आणि मार्मिक शिवसेनेची मुखपत्रे आहेत. आता हे कोणाच्या ताब्यात राहणार, हा प्रश्न आहे. परंतु सामना आणि मार्मिक यांच्यांवर प्रबोधन प्रकाशन या संस्थेची मालकी आहे. प्रबोधन प्रकाशन ही पब्लिक लिमिटेड कंपनी आहे. ही कंपनी रश्मी उद्धव ठाकरे यांच्या ताब्यात आहे. यामुळे सामना आणि मार्मिक उद्धव ठाकरे यांच्यांकडेच राहणार आहे.

मुंबईतील शाखांचे काय होणार?


मुंबई शहरामध्ये २२७ प्रभाग आहेत. प्रत्येक प्रभागामध्ये शिवसेनेच्या एकापेक्षा अधिक शाखा आहेत. या शाखांची मालकी ठाकरे गटाकडे आहे. परंतु या बहुतांश शाखा अनधिकृत आहे. त्या स्थानिक शिवसैनिकांकडून चालवल्या जातात. त्या शिंदे गट मिळवण्याचा प्रयत्न करेल. यामुळे काही शाखा शिंदे यांच्या शिवसेनेला मिळू शकतील.

शिवसेनेची मालमत्ता


शिवसेना भवनासह मुंबईत, राज्यात पक्षाची कार्यालये आहेत. त्यांची किंमत अनेक कोटींमध्ये आहेत. परंतु मुंबई वगळता इतर कार्यालये कोणाच्या ताब्यात जातील, हे सांगता येत नाही. त्यांची मालकी कोणाची यावर ते अवलंबून राहणार आहे.

निकालानंतर संजय राऊत काय म्हणाले

निकालानंतर संजय राऊत म्हणाले की, हे अपेक्षित होतं, ज्या पद्धतीने सरकार बनवलं त्या पद्धतीने खोक्यांचा वारेमाफ झाला हा वापर कुठपर्यंत झाला आहे. हे स्पष्ट होत आहे. हा खोक्यांचा विजय आहे. सत्याचा विजय नाही. श्रीरामाचा धनुष्यबाण जर रावणाला मिळाला, सत्यमेव जयते खोडून असत्यमेव जयते असा केला पाहिजेजो पक्ष बाळासाहेब ठाकरे यांनी लाखों शिवसैनिकांनी रक्त सांडून उभा केला तो पक्ष बाजारबुनगे विकत घेतात. त्यामुळे निवडणूक आयोगावरील विश्वास जनतेने गमावला आहे.

Follow Us