अजित पवार खरंच भाजपसोबत जातील? संजय राऊत यांनी स्पष्टच सांगितलं

विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांवर संजय राऊत यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं आहे. संजय राऊत यांनी आज दुपारी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भूमिका मांडली.

अजित पवार खरंच भाजपसोबत जातील? संजय राऊत यांनी स्पष्टच सांगितलं
Chetan Patil | Updated on: Apr 12, 2023 | 6:37 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) भाजपसोबत हातमिळवणी करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. कारण सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी याबाबत मोठा दावा केलाय. अंजली दमानिया यांच्या दाव्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना प्रश्न विचारला असता त्यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली. “अंजली दमानिया यांना भाजपकडून माहिती मिळाली असेल तर त्यांनी ती जाहीर केली असेल. पण अजित पवार असं काही करतील असं वाटत नाही”, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

“अजित पवार आता महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आहेत. त्यांचं राजकीय भविष्य उज्ज्वल आहे. ते स्वाभिमानी आहेत. त्यांचा कणा नेहमी ताठ असतो. बाणेदार असं नेतृत्व आहे. ते जाऊन मिंधेंप्रमाणे गुलामी करतील असं मला वाटत नाही. शेवटी प्रत्येकजण वैयक्तिक मतं घेत असतो. पण मी जे पाहतोय त्यानुसार अजित पवार हे मांडलिक म्हणून कुणाचं काम करतील असं मला वाटत नाही”, अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडली.

“काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेची महाविकास आघाडी ही फेविकॉलची जोड आहे. ही जोड तुटणार नाही आणि झुकणारही नाही”, असा दावा संजय राऊत यांनी केला. “विरोधी पक्षनेते एकत्र होणार नाही, अशाप्रकारच्या कंड्या निर्माण केल्या जातात. पण तसं नाहीय”, असंदेखील ते यावेळी म्हणाले.

“अजित पवार हे राज्याचे विरोधी पक्षनेते आहेत. राज्यामध्ये शेतकऱ्यांवर संकट आलेलं आहे. अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे भाज्या, धान्य, फळबागा नष्ट झाले आहेत. शेतकऱ्यांचा खूप ठिकणी आक्रोश सुरु आहे. विरोधी पक्षनेत्याचं काम आहे की शेतकऱ्यांचे मुद्दे घेऊन प्रशासनासमोर मांडणं. त्यामुळे अजित पवार हे शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन सह्याद्री अतिथीगृहावर गेले आणि मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना भेटले”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

“महाराष्ट्रात आम्ही सगळे एकत्र आहोत. आम्ही राष्ट्रीय स्तरावर एकत्र आहोत. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याशी आमचा संवाद आहे. आज दिल्लीमध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि तेजस्वी यादव हे मल्लिकार्जुन खर्गे यांना भेटले. सगळे घटक एकत्र येत आहेत. भाजपला मोठं आव्हान उभं राहील. तसेच 2024 ची सत्ता आम्ही काबीज करु, अशाप्रकारचं गठबंधन होतंय”, असं संजय राऊत म्हणाले.

उद्धव ठाकरे यांची 23 एप्रिलला पाचोऱ्यात सभा

“महाविकास आघाडीच्या सभांमध्ये आम्ही सहभागी आहोत. पण त्याचबरोबर संभाजीनगर, खेड, मालेगाव येथील सभांनंतर आता पाचोऱ्यात उद्धव ठाकरे यांची सभा होईल. पक्ष संघटनात्म किंवा पक्षबांधनीसाठी आम्ही सभा आयोजित केल्या आहेत. जळगावच्या पाचोऱ्यातील प्रमुख नेते आर.ओ. तात्या पाटील हे आमचे आमदारही होते. मधल्या काळात त्यांचे निधन झालं. त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून आपल्या पुतण्याला आमदार केलं. त्यांचा पुतण्या गद्दार झाला. पळून गेला. आर ओ तात्या पाटील यांच्या पुतळ्याचं अनावरण आणि त्या निमित्ताने संध्याकाळी पाचोऱ्यात शिवसेनेची सभा असा कार्यक्रम ठरला आहे”, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

‘एकोप्यातून आपण लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीत विजय मिळवू’

“काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नेमकी काय भूमिका मांडलीय ते मला माहिती नाही. पण कालच आमची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी भेट झाली. ज्येष्ठ नेते म्हणून आम्ही त्यांची मार्गदर्शनपर मतं घेतली. उद्धव ठाकरे स्वत: तिथे उपस्थित होते. त्यांचंही मत आहे की, महाविकास आघाडीत आपण एकोप्याने काम करतोय. या एकोप्यातून आपण लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीत विजयाच्या दिशेने पाऊल ठेवलं पाहिजे. आपण एकत्र राहिलो तर महाष्ट्रातून भाजप आणि त्यांचं वॉशिंग मशीनचं राजकारण यांचं नामोनिशाण राहणार नाही. राज्याची जनता वेगळ्या मूडमध्ये आहे. त्यांना ही सगळी घाण नष्ट करायची आहे. त्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र राहणं गरजेचं आहे”, असं राऊत यांनी सांगितलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us