Vinayak Raut : मुंबईत पुढचा महापौर शिवसेनेचाच, विनायक राऊतांचं देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर

पुढचा महापौर हा बाळासाहेबांच्या शिवसेनेचाच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा असेल, याचा पुनरुच्चारही विनायक राऊत यांनी केला.

Vinayak Raut : मुंबईत पुढचा महापौर शिवसेनेचाच, विनायक राऊतांचं देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर
विनायक राऊतांचं देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर
| Edited By: | Updated on: Aug 20, 2022 | 8:24 PM

मुंबई : माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात मुंबई भाजपचा कार्यकर्ता मेळावा (BJP Worker Gathering) पार पडला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडला. राज्यातील सत्तांतरानंतर मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपनं हालचाली सुरू केल्यात. फडणवीस म्हणाले, मागच्यावेळी आपण महापौर बनवू शकलो असतो. परंतु, मित्र पक्षासाठी दोन पाऊलं मागे गेलो. त्यांना महापौर बनवून दिला. आता आपला महापौर होणार आहे. फडणवीसांच्या या वक्तव्यावर शिवसेना (Shiv Sena) खासदार विनायक राऊत (MP Raut) यांनी प्रत्युत्तर दिलं. राऊत म्हणाले, मुंबईची सेवा हा शिवसेनेचा धर्म झालेला आहे. 30 वर्षे मुंबईची सेवा करण्याचं काम शिवसेनेनं केलंय. नगरसेवक जे काम करत होते त्याला तोड नाही. एवढा पाऊस पडला तरी पुढचा महापौर हा शिवसेनेचा असेल. बाळासाहेबांच्या शिवसेनेचा असेल, असा टोला शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलारांना लगावला.

राऊत म्हणाले, पुढचा महापौर ठाकरेंच्या शिवसेनेचाच

पुढचा महापौर हा बाळासाहेबांच्या शिवसेनेचाच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा असेल, याचा पुनरुच्चारही विनायक राऊत यांनी केला. राऊत म्हणाले, रिफायनरीच्या प्रकल्पावर स्थानिकांचं काय मत आहे, हे विचारात घेतलं जाईल. कोणत्याही परिस्थितीत स्थानिकांच्या घरावर नांगर फिरवून रिफायनरी होऊ देणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जांभोरी मैदानाच्या संदर्भात माजी पालकमंत्री आदित्य ठाकरेंनी सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात. मैदान हे मैदान राहावं त्याचा वापर इतर कारणासाठी नको अशी भूमिका घेतली होती. याची आठवण राऊत यांनी करून दिली.

शिंदे गटाच्या पायाखालची वाळू सरकायला लागली

विनायक राऊत म्हणाले, एकनाथ शिंदे यांसारखे असे किती आले न गेले. शिंदे गटाच्या पायाखालची वाळू सरकायला लागली आहे. आपलं विसर्जन होणार आहे, हे त्यांना कळायला लागलंय. म्हणून ही ड्रामेबाजी करतील. आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला प्रतिसाद मिळतोय. म्हणून यांचं आता सुरू झालंय, अशीही टोलेबाजी त्यांनी केली. विनायक राऊत हे देवेंद्र फडणवीस यांना सवाल केला की, तुम्ही ज्यावेळी मुख्यमंत्री म्हणून होतात तेव्हा तुम्हाला बाळासाहेबांच्या स्वप्नाची आठवण झाली नाही का? आता देवेंद्र फडणवीसांना बाळासाहेबांची आठवण होते. बाळासाहेबांची शिवसेना आणि मुंबई असं नातं आहे. हे नातं तोडण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी होणार नसल्याचं राऊतांनी ठणकावून सांगितलं.