महापुरामुळे एसटीचं तब्बल 100 कोटींचं नुकसान

| Updated on: Aug 10, 2019 | 10:02 PM

पावसामुळे मराठवाडा वगळता इतर भागांमध्ये एसटीची दैनंदिन वाहतूक बहुतांश ठप्प झाली आहे. त्यामुळे एसटीला दररोजचा 4 ते 5 कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागत आहे.

महापुरामुळे एसटीचं तब्बल 100 कोटींचं नुकसान
Follow us on

मुंबई : महाराष्ट्रात सर्वदूरपर्यंत गेली 10 दिवस कोसळत असलेल्या पावसामुळे भयंकर पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यात पावसामुळे महापूर आला आहे, जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे. या भागातील लोकांच्या घरात पाणी शिरलं आहे, शेतातील पीकं पाण्याखाली गेली आहेत. इतकंच नाही, तर जिल्ह्यांतील अनेक गावांना पुराच्या पाण्याने वेढा घातल्याने लोकं गेल्या आठवडाभरापासून अडकून पडली आहेत. पुरात अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात बचावकार्य सुरु आहे. मात्र, अद्यापही अनेकांपर्यंत मदत पोहोचू शकलेली नाही. या महापुराचा फटका अनेकांना बसला आहे, या पूरसिस्थितून राज्याची लोकवाहिनी असलेली एसटीही सुटलेली नाही. एसटी महामंडळाला या पूरपरिस्थितीचा थेट फटका बसला आहे.

पावसामुळे मराठवाडा वगळता इतर भागांमध्ये एसटीची दैनंदिन वाहतूक बहुतांश ठप्प झाली आहे. त्यामुळे एसटीला दररोजचा 4 ते 5 कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागत आहे. आत्तापर्यंत गेल्या 10 दिवसांत एसटीचा 50 कोटी रुपयांचा महसूल बुडाला आहे. तसेच, अनेक आगार, बसस्थानकं, बसेस पाण्यामध्ये अडकल्यामुळे तेथील स्थावर मालमत्तेचेही आतोनात नुकसान झाले आहे. पूरपरिस्थिती ओसरल्यानंतरच या स्थावर मालमत्तेच्या नुकसानीचा आकडा समजू शकेल. मात्र, सद्यस्थिती पाहता 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त स्थावर मालमत्तेच्या नुकसानीचा अंदाज वर्तविला जात आहे. म्हणजे आतापर्यंत एसटीचं एकूण 100 कोटींचं नुकसान झालं आहे.

एसटीचा दररोज 18 हजार बसेसच्या माध्यमातून 55 लाख किलोमीटर इतका प्रवास होतो. त्यातून सरासरी 22 कोटी रुपये उत्पन्न मिळते. पण गेल्या 10 दिवसांपासून दररोज एसटीचे किमान 10 लाख किलोमीटरच्या बस फेऱ्या रद्द होत आहेत. साहजिकच त्यामुळे एसटीच्या 4 ते 5 कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागत आहे. एकट्या कोल्हापूर विभागाचा दैनंदिन महसूल 50 लाखांच्यावर आहे. परंतू गेल्या चार दिवसांपासून या विभागाच्या सर्व 12 आगारातून कोणत्याही प्रकारची वाहतूक होऊ शकली नाही. ही परिस्थिती सांगली, सातारा आणि कोकणातील काही विभागांमध्ये आहे. पुढील काही दिवसांमध्ये पूर ओसरल्यानंतरच प्रत्यक्ष नुकसानीचा आकडा स्पष्ट होऊ शकेल.

पाहा व्हिडीओ :