आरेचा विषय सोडणार नाही, झाडांच्या खुन्यांना बघून घेऊ : उद्धव ठाकरे

| Updated on: Oct 05, 2019 | 2:17 PM

सरकार आल्यानंतर हे झाडांचे खुनी जे कोणी असतील, त्यांचं काय करायचं हे आम्ही बघून घेऊ , असा दम उद्धव ठाकरे यांनी दिला. 

आरेचा विषय सोडणार नाही, झाडांच्या खुन्यांना बघून घेऊ : उद्धव ठाकरे
Follow us on

मुंबई :   शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray Aarey) यांच्यासोबत आज ओबीसी, भटके विमुक्त, धनगर, कुणबी, वंजारा, तेली, माळी, आगरी आदि समाजाच्या नेत्यांची महत्वाची बैठक झाली. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray Aarey) यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण सर्व समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचं म्हटलं. यावेळी यवतमाळचे हरिभाऊ राठोड आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रकाश शेडगे हे दोन्ही नेते उद्धव ठाकरेंसोबत पाहायला मिळाले.

“ऐन लढाईत साथ द्यायला येतात, ते खरी सोबती असतात. तुम्ही अर्ज भरल्यानंतर शिवसेनेला समर्थन देताय, हे महत्वाचे. समाजाचे विषय घेऊन यायचं आणि स्वत:चे चांगभलं करून घ्यायचं, पण तुम्ही समाजासाठी मागितले.  साधीसुधी माणसंच इतिहास घडवतात. दिलेल्या शब्दाला जागायचं, हे शिवसेनेचे तत्व आहे. सरकार आलेलेच आहे, या तुमच्या मागण्यांचा पाठपुरावा तुम्ही नव्हे तर मी करणार आहे. तुमच्या मागण्यांसाठी मी वचनबद्ध आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

भाजपनं त्यांना म्हणजे मित्रपक्षांना त्यांची जागा दाखवली आहे किंवा जागा दिलीय असं म्हणता येईल. धनगर आरक्षण हे आदिवासींना धक्का न लावता द्यायला हवं. त्या दिशेने पाच वर्षे पावलं टाकली आहेत. कायदा करुन न्याय मिळवून दिला जाईल, असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिलं.

झाडांचे खुनी कोण?

“आरे हा विषय महत्वाचा आहे, त्यासाठी वेगळी पत्रकार परिषद घेणार आहे. तो विषय महत्त्वाचा आणि स्वतंत्र आहे. काल काय घडलंय, आज काय घडतंय, जे कोण घडवतंय, या सर्वांची माहिती घेऊन,  मी रोखठोक आणि ठणठणीत बोलणार आहे. आरे हा विषय मी सोडत नाही. या विषयात मी तो विषय मिक्स करत नाही. उद्याचं सरकार आमचे असेल, सरकार आल्यानंतर हे झाडांचे खुनी जे कोणी असतील, त्यांचं काय करायचं हे आम्ही बघून घेऊ , असा दम उद्धव ठाकरे यांनी दिला.