दीड महिन्यानंतर या लोकांना नोकऱ्या मिळणार नाही…शिवसेनेच्या रोजगार मेळाव्यातून उद्धव ठाकरे गरजले

uddhav thackeray speech: आमचे हिंदुत्व घरातील चूल पेटवते. त्यांचे हिंदुत्व घर पेटवते. त्यामुळे त्यांना शिवसेना संपवायची आहे. शिवसेनेमुळे लाखो युवक, युवतींना रोजगार मिळाले आहेत. मराठी माणसांना नो एन्ट्री असे बोर्ड जेथे असेल ते दार आम्ही तोडणार आहोत.

दीड महिन्यानंतर या लोकांना नोकऱ्या मिळणार नाही...शिवसेनेच्या रोजगार मेळाव्यातून उद्धव ठाकरे गरजले
उद्धव ठाकरे
Jitendra Zavar | Updated on: Oct 05, 2024 | 12:46 PM

शिवसेना उबाठातर्फे मुंबईत रोजगार मेळावा झाला. या मेळाव्यातून उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकनाथ शिंदे गटावर जोरदार हल्ला केला. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नाव न घेता उद्धव ठाकरे म्हणाले, दीड महिन्यानंतर सरकारमध्ये बसलेले गद्दार बेकार होणार आहेत. परंतु त्यांना नोकऱ्या मिळणार नाही. आम्ही त्यांना रोजगार देणार नाही. एकाही गद्दारास नोकऱ्या देणार नाही. महिन्याभरात तुमचा हिशोब मांडल्याशिवाय राहणार नाही.

इतर पक्षांनी राज्यासाठी काय केले?

उद्धव ठाकरे म्हणाले, मुंबई महाराष्ट्राला मिळाली, पण मुंबईत मराठी माणसांसाठी दारे बंद होती. मुंबईत मराठी माणसाला उद्योग आणि रोजगाराची संधी मिळत नव्हती. मग त्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना केली. बाळासाहेब म्हणत होते, रोजगार मागणारे नाही देणारे व्हा. राज्यासाठी इतर पक्षांनी काय केले अन् शिवसेनेने काय केले? हे पहिल्यावर शिवसेनेने महाराष्ट्रासाठी जे केले आहे त्याचा अभिमान आम्हाला आहे.

नरेंद्र मोदींवर जोरदार टीका

नोकरी किंवा रोजगार या विषयात शिवसेनेशिवाय इतर कोणत्याही पक्षाने काम केले नाही. पंतप्रधान ठाणे अन् मुंबईत आले आहेत. त्याच दिवशी सर्वसामान्य जनतेसाठी आम्ही रोजगार मेळावे घेत आहोत. पंतप्रधान ठेकेदारांचे खिसे भरत आहेत. कोट्यवधीचे प्रकल्पांची घोषणा होत आहे. परंतु ते प्रकल्प पूर्ण होत नाही, असा हल्ला रोजगार मेळाव्यातून उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर केला.

यामुळे त्यांना शिवसेना संपवायची…

आमचे हिंदुत्व घरातील चूल पेटवते. त्यांचे हिंदुत्व घर पेटवते. त्यामुळे त्यांना शिवसेना संपवायची आहे. शिवसेनेमुळे लाखो युवक, युवतींना रोजगार मिळाले आहेत. मराठी माणसांना नो एन्ट्री असे बोर्ड जेथे असेल ते दार आम्ही तोडणार आहोत. राज्यात भूमीपुत्रांचा मान राखला गेला पाहिजे. अडीच वर्षांत एकही मोठा प्रकल्प सुरु नाही. आज एकही गुंतवणूकदार राज्यात येण्यास तयार नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us