‘एकनाथ शिंदे लाचार, दिल्लीवाल्यांच्या कृपेने मुख्यमंत्री झाले’, उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

| Updated on: Nov 24, 2022 | 5:56 PM

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.

एकनाथ शिंदे लाचार, दिल्लीवाल्यांच्या कृपेने मुख्यमंत्री झाले, उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
Follow us on

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. “महाराष्ट्रात ईडी,खोके, मिंधे सरकार आहे. या सरकारमध्ये मुख्यमंत्री आहेत का, ते कळतच नाही. त्यांना विचारलं तर ते सांगितील, मी पंतप्रधानांना सांगितलेलं आहे, ते म्हणाले, त्यांनी चाळीस गावे मागितले ते द्या, आपण पाकव्याप्त काशमीर जिंकल्यानंतर शंभर गावं देऊ”, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

“मुख्यमंत्री भाजपच्या वरिष्ठांच्या आज्ञेशिवाय चालत नाही. त्यांना खुर्चीला चिपकून बसायचं आहे. ते लाचार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्राचे आपण मुख्यमंत्री आहोत, असं त्यांना वाटतंच नाही”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

“एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले ते दिल्लीवाल्यांच्या कृपेने, ते दिल्लीवाल्यांच्या विरोधात काय बोलणार? ते खुर्ची सोडू शकतात का? त्यांच्यात हिंमत आहे का तितकी? महाराष्ट्राचा अपमान सहन करायचा, हे बाळासाहेब ठाकरेंचं हिदुत्व आहे?”, असे सवाल उद्धव ठाकरेंनी केले.

उद्धव ठाकरेंचा राज्यपालांवर निशाणा

“आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली. साधारणत: एक प्रघात आहे, ज्यांचं सरकार केंद्रात आहे, त्यांचीच माणसं किंवा त्यांच्या विचारसरणीचीच माणसं ही देशातील सगळ्या राज्यांमध्ये राज्यपाल म्हणून जातात. या माणसांची कुवत काय असते? पात्रता काय असते?”, असे प्रश्न उद्धव ठाकरेंनी उपस्थित केले.

“एक शब्द वापरतो, कुणी गैरसमज करु नये, ज्यांना वृद्धाश्रमातही जागा नाही, अशांना राज्यपाल म्हणून नेमलं जातं का? असा प्रश्न केंद्र सरकारला विचारला पाहिजे. राज्यपाल नियुक्तीचे निकष ठरवायला पाहिजेत. राज्यपाल हे आपल्या महामहीम राष्ट्रपतींचे दूत असतात”, असं ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे आणखी काय म्हणाले?

“गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात काही विषयांवर चर्चा व्हायला हवी. मी त्याच विषयातील तिसऱ्या विषयावर बोलतोय. देशाच्या न्यायालयातील न्यायमूर्तींच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे. ती पद्धत अपारदर्शक आहे, असं त्याचं मत आहे. नेमणुकीचे अधिकार पंतप्रधानांकडे असावेत, असं त्यांचं म्हणणं आहे.”

“दुसरी एक केस सुप्रीम कोर्टात सुरुय. तिथे निवडणूक आयुक्तांबद्दल अपील केलेलं आहे. त्याबद्दल न्यायमूर्तींचं मत आपण ऐकतोय. या देशाला चांगला निवडणूक आयुक्त पाहिजे. कारण वेळ पडली तर उद्या पंतप्रधानांवर सुद्धा कारवाई करायला तो मागेपुढे पाहणार नाही. निवडणूक आयुक्त नेमण्याची पद्धत तपासायला पाहिजे आणि बदलायला पाहिजे.”