‘निवडणूक आयोग बोगस, चुना लावणारा आयोग’, उद्धव ठाकरे यांचं खूप मोठं वक्तव्य

| Updated on: Feb 27, 2023 | 9:04 PM

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज पहिल्यांदाच केंद्रीय निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली आहे. "निवडणूक आयोग बोगसच आहे. त्याला निवडणूक चुना लगाओ आयोग का म्हणत नाही तेच कळत नाही", असा घणाघात त्यांनी केला.

निवडणूक आयोग बोगस, चुना लावणारा आयोग, उद्धव ठाकरे यांचं खूप मोठं वक्तव्य
election commission
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज पहिल्यांदाच केंद्रीय निवडणूक आयोगावर (Election Commission of India) जोरदार टीका केली आहे. “निवडणूक आयोग बोगसच आहे. त्याला निवडणूक चुना लगाओ आयोग का म्हणत नाही तेच कळत नाही. आमचा विश्वास उडालेला आहे. निवडणूक चुनाव आयोग नाही तर चुना लावणारा आयोग आहे”, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने जागर मराठी भाषेचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि निवडणूक आयोगावर टीका केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला.

“असं कधी घडलं नव्हतं. राम विलास पासवान यांच्या पक्षातसुद्धा असा वाद झालेला आहे. तिकडे त्यांनी जे केलेलं आहे, किती वर्ष झाली वाद सुरु आहे. वाद सुरु असताना त्यांनी राम विलास पासवान यांच्या मुलाला एक चिन्ह दिलेलं आहे आणि काकाला वेगळं चिन्ह दिलं आहे. हे दोन्ही गट शांत का बसले आहेत, कारण हे दोन्ही गट भाजपसोबत आहेत. म्हणजे तुमच्या सोयीनुसार सगळं करणार असाल तर ही हुकूमशाही आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“या हुकूमशाही विरोधात एकजुट व्हायला लागली आहे. परवा अरविंद केजरीवाल आले होते, त्याआधी ममता बॅनर्जी आणि आणखी काही नेत्यांच्या भेटीगाठी झाल्या. हे महत्त्वाचं आहे. कारण आपले डोळे उघडले नाहीतर तर 2024 ची निवडणूक ही शेवटची निवडणूक असेल. आपल्याला ठरवायचं आहे. कारण कपिल सिब्बल काय बोलले ते महत्त्वाचं आहे. मी इथे जिंकण्यासाठी किंवा हरण्यासाठी उभा नाहीय. तर मी देशातील संविधान वाचवण्यासाठी उभा आहे”, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

उद्धव ठाकरे आणखी काय-काय म्हणाले?

पक्षाचं नाव चोरलं पण संस्कार चोरता येत नाही. तुम्ही नाव चोरलंत, धनुष्यबाण चोरले, पण ठाकरे कसे चोरणार? ठाकरे म्हणजे मी एकटा नाही. ठाकरे म्हणजे विचार आहेत. हे इथे बसलेल्या सगळ्यांमध्ये तो विचार गेलाय. हे सगळे ठाकरे आहेत. मध्यंतरी एक चित्रपट आलेला की चोरीचा मामला आणि हळहळू बोंबला. पण हे जोरात बोंबलतात की, आम्ही चोरलं.

आज मराठी भाषा दिवस आहे. मला अभिमान आहे, ज्या हेतून शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची स्थापना केली होती तो हेतू पूर्ण झाला. तो जमाना वेगळा होता. आता ज्या पिढ्या आल्या आहेत त्यांना सांगितलं तर विश्वास बसणार नाही की मराठीची अवहेलना कशी होत होती. मराठी माणूस म्हटल्यावर घाटी.

आपल्याच राज्यात आपला मराठी माणूस हातात भीकेचा कटोरा घेऊन उभा होता. त्यातल्या भीकेच्या कटोरेच्या जागी शिवसेनाप्रमुखांनी एक आत्मविश्वासाची तलवार दिली ती म्हणजे शिवसेना. मोठमोठे मोर्चे झाले, सभा व्हायचे. आजही होतात. त्या पिढीला न्याय हक्क म्हणजे काय आणि तो लढून कसा मिळवावा लागतो हे त्या पिढीला माहिती आहे.

संघर्ष म्हणजे काय ते या पिढीला माहिती आहे. आता जे पावट्यांना मोर फुटले आहेत ना ते नव्हते. बाळासाहेबांनी कधीही कुणासमोर गुडघे टेका आणि पालख्या वाहा, असं शिकवलेलं नाही. जगाल तर आत्मविश्वास आणि स्वाभिमानाने जगा हा विचार शिवसेनाप्रमुखांनी रुजवलेला आहे.

संकटात सुद्धा मी संधी शोधणार आहे. मी तेव्हापासून बघत आलेलो आहे. आमच्या दादरच्या घरी शिवसेनेची स्थापना झाली. मी आणीबाणीचा देखील काळ पाहिला. आणीबाणीमध्ये मार्मिकवर सुद्धा बंदने होती. मार्मिकच्या प्रेसवर बंदी होती. तेव्हा दिवाकर रावते हातगाडीवर घेऊन मार्मिकचे गठ्ठे घेऊन जायचे. ही वीण घट्ट आहेत. रुजलेले आहेत. वरचे शेंडे उडवा तुम्ही, कुणाला वाटलं असेल फुलं तोडली म्हणजे झाड मेलं, अजिबात नाही. काही वेळेला बानगुडं छाटावी लागतात.