राज ठाकरे हाजिर हो!, 6 फेब्रुवारीला हजर राहण्याचे वाशी न्यायालयाचे आदेश

| Updated on: Jan 28, 2021 | 3:07 PM

मनसे कार्यकर्त्यांनी 2014 मध्ये वाशी टोलनाफा फोडला होता. त्या प्रकरणात आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोर्टात हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे.

राज ठाकरे हाजिर हो!, 6 फेब्रुवारीला हजर राहण्याचे वाशी न्यायालयाचे आदेश
Raj Thackeray
Follow us on

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश वाशी न्यायालयाने दिले आहेत. राज ठाकरे यांनी जामीन घेतला नसल्यानं 6 फेब्रुवारीला कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नायाधीश बडे यांच्या कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान हा आदेश देण्यात आला आहे. मनसे कार्यकर्त्यांनी 2014 मध्ये वाशी टोलनाफा फोडला होता. त्या प्रकरणात आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोर्टात हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे.(Vashi court orders Raj Thackeray to appear in court)

26 जानेवारी 2014 रोजी राज ठाकरे यांनी वाशी इथल्या मेळाव्यात टोल नाका बंद करण्याबाबत प्रक्षोभक भाषण केलं होतं. त्यानंतर गजाजन काळे यांनी काही कर्यकर्त्यांसह लगेच वाशी टोल नाका फोडला होता. त्याबाबत 30 जानेवारी 2014 रोजी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात 2018, 2020 मध्येही राज ठाकरे यांच्याविरोधात समन्स आणि वॉरंट काढण्यात आलं होतं. आज ते वॉरंट रद्द झालं आहे. मात्र 6 फेब्रुवारीला राज ठाकरे यांनी कोर्टात उपस्थित राहणं गरजेचं आहे. त्यामुळे राज ठाकरे आता वाशी कोर्टात हजर राहतात की नाही, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

राज ठाकरे यांच्या सुरक्षेत कपात

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेत राज्य सरकारकडून नुकतीच कपात करण्यात आली आहे. राज ठाकरे यांची Z दर्जाची सुरक्षा काढून त्यांना Y+ सुरक्षाव्यवस्था देण्यात आली आहे. त्यावरुन मनसे कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसंच राज ठाकरे यांना सुरक्षा पुरवण्यासाठी पोलिसांची गरज नाही, तमाम मनसे कार्यकर्तेच राज ठाकरे यांना सुरक्षा देतील, अशी संतापजनक प्रतिक्रिया मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यावेळी दिली होती.

बाळा नांदगावकरांची फेसबूक पोस्ट

“राज ठाकरे यांच्या रोखठोक स्वभावामुळे अनेक हितशत्रू त्यांच्याबद्दल वैर बाळगून आहेत, परंतु त्यांनी कधी अशा हितशत्रूंची तमा बाळगली नाही. त्यांच्या एका आवाजावर अनेक सामान्य लोकांना संरक्षण देणारे हजारो महाराष्ट्र सैनिक या राज्यात आहेत. सरकार दरबारी जी कामे होत नाही किंवा ज्या विषयांना मतपेटीसाठी टाळले जाते असे अनेक विषय राज दरबारी निकालात निघतात. त्यांच्या जीवाला आपल्या देशातील विघ्नसंतोषी लोकांपासून तर पाकिस्तानी दहशतवाद्यांपर्यंत धोका असल्याचे आपण जाणूनच आहोत. तरी त्यांची सुरक्षा वाढविण्याऐवजी कमी करण्याचा घेतलेला निर्णय हा सरकारचे “खुजेपण” ठळकपणे दाखविणारा आहे,” अशी राज्य सरकारवर टीका करणारी फेसबूक पोस्ट मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी लिहिली होती.

संबंधित बातम्या :

‘जिथे भेळ, तिथे खेळ’; गीते, बागुलांच्या शिवसेना प्रवेशावर मनसेचा टोला

फडणवीस, राज ठाकरे, चंद्रकांतदादांच्या सुरक्षेत कपात; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

Vashi court orders Raj Thackeray to appear in court