राज्यात कोरोनाचा आकडा वाढला, महाराष्ट्रात कुठे कुठे संचारबंदी?

| Updated on: Feb 27, 2021 | 10:48 PM

वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. (Maharashtra district imposed  Curfew)

राज्यात कोरोनाचा आकडा वाढला, महाराष्ट्रात कुठे कुठे संचारबंदी?
या काळात शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लास पूर्णपणे बंद राहतील. केवळ दहावी आणि बारावीच्या शिकवणी वर्गांना परीक्षा जवळ आल्यामुळे अपवादात्मक परवानगी देण्यात आली आहे.
Follow us on

मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गेल्या 24 तासात महाराष्ट्रात 8 हजार 623 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर दुसरीकडे 51 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दरम्यान वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. (Which Maharashtra district imposed  Curfew)

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये नव्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक नवे कोरोना हॉटस्पॉट तयार होत आहेत. यात अमरावीत, अकोला, बुलडाणा, यवतमाळ आणि नागपूर जिल्ह्याचा समावेश आहे. मराठवाड्यातील लातूर, हिंगोली, नांदेड, परभणी या जिल्ह्यांमध्येही आता कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे.

महाराष्ट्रात कुठे कुठे संचारबंदी?

अमरावतीत 7 दिवस संचारबंदी

अमरावती जिल्ह्यात 7 दिवस संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अमरावती, अचलपूर ,अंजनगाव सूर्जी शहर कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत. या तिन्ही शहरात 8 मार्चपर्यंत लॉकडाऊन राहणार आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांची वेळ तशीच राहणार आहे. तसेच नंतरची स्थिती पाहून पुढील निर्णय घेणार असल्याचंही प्रशासनानं सांगितलं आहे.

अमरावतीत 22 फेब्रुवारी संध्याकाळी आठ वाजेपासून अमरावती शहर, अचलपूर शहर आठवड्याभरासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. हा लॉकडाऊन सात दिवसांसाठी होता. या लॉकडाऊनची मुदत संपत आल्यानंतर पुन्हा एकदा अमरावतीत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. यानुसार येत्या 1 मार्चपासून 8 मार्चपर्यंत अमरावतीत लॉकडाऊन असणार आहे.

वाशिममध्ये 38 तास संचारबंदी
वाशिम जिल्ह्यात गेल्या दहा दिवसापासून कोरोनाने डोके वर काढले आहे. गेल्या काही दिवसांपासून वाशिममध्ये एक हजार रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे आज संध्याकाळी पाच वाजल्यापासून ते सोमवारी सकाळी 9 पर्यंत जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात दूध विक्रेते, डेअरी यांना सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत मुभा देण्यात आली आहे. तर दवाखाने,मेडिकल हे 24 तास चालू राहणार आहेत, असे आदेश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस यांनी दिले आहे.
हिंगोलीत संचारबंदी 
हिंगोली जिल्ह्यात 1 मार्च ते 7 मार्च कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. हिंगोली जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे संचारबंदी लागू करण्यात आली. या काळात औषधांची दुकाने, दवाखाने,दूध, कृषी विषयक वाहने वगळता सामान्य नागरिकांसाठी पेट्रोल पंप देखील बंद राहणार आहेत. हिंगोली जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी याबाबतचे आदेश दिले आहे.

राज्यातील आजचा कोरोना रुग्णांचा आकडा

गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाचे 8 हजार 623 रुग्ण आढळले.
गेल्या 24 तासात 3 हजार 648 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
गेल्या 24 तासात 51 जणांचा मृत्यू झाला.
आतापर्यंत एकूण कोरोना बाधितांचा आकडा 21 लाख 46 हजार 777 वर
आतापर्यंत कोरोनामुळे 52 हजार 92 जणांचा मृत्यू झाला.
आतापर्यंत एकूण 20 लाख 20 हजार 951 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.  (Which Maharashtra district imposed  Curfew)

संबंधित बातम्या : 

धोका वाढला! राज्यात कोरोनाचे 8 हजार 623 नवे रुग्ण सापडले

कोरोना रोखण्यासाठी रिटायर्ड आर्मी मैदानात; सांगली महापालिकेचा अनोखा फंडा

वर्षभर कोरोनाविरुद्ध लढलो, आता पुन्हा लढाईचे दिवस- पोलीस महासंचालक