राज्यपालांच्या सडक्या मेंदूमागे कोण?; उद्धव ठाकरे यांचा सवाल

| Updated on: Nov 24, 2022 | 5:41 PM

राज्यपाल पदाची झुल पांघरली म्हणजे त्यांनी काहीही वेडवाकडं बोलावं. हे काही महाराष्ट्र मान्य करणार नाही.

राज्यपालांच्या सडक्या मेंदूमागे कोण?; उद्धव ठाकरे यांचा सवाल
उद्धव ठाकरे
Follow us on

मुंबई – अधिक चांगला वृद्धाश्रम असेल, तर राज्यपाल कोश्यारी यांना तिकडे पाठवा, असा खोटक टोला शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी लगावला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी ठाकरे यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. राज्यपालांच्या सडक्या मेंदूमागे कोण, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. उद्धव ठाकरे म्हणाले, केंद्रातील सरकारची माणसं ही वेगवेगळ्या राज्यांत पाठविली जातात. या माणसांची कुवत काय असते. पात्रता काय असते. खास करून ज्येष्ठ नागरिकांबद्दल बोलतोय, असा टोला ठाकरे यांनी राज्यपाल कोश्यारी यांना लगावला.

राज्यपाल म्हणण मी सोडून दिलंय. कारण राज्यपाल पदाची झुल पांघरली म्हणजे त्यांनी काहीही वेडवाकडं बोलावं. हे काही महाराष्ट्र मान्य करणार नाही. कोश्यारी यांनी मुंबई, ठाण्यातील मराठी माणसाचा अपमान केला होता. तेव्हा कोल्हापुरी जोडा दाखविण्याची वेळ आल्याचं म्हटलं होतं. त्यानंतरही हे महोद्य थांबले नाहीत.

छत्रपती शिवाजी महाराज यांना आपण आदर्श मानतो. अशा व्यक्तीबद्दल राज्यपाल कोश्यारी यांनी केलेलं वादग्रस्त विधान हे त्यांच्या काळ्या टोपीतून आलेलं नाही. या सडक्या मेंदूच्या मागे कोण आहे, याचा शोध घेण्याची वेळ आली आहे, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

महाराष्ट्रातल्या आदर्शांना अपमान केला आहे. सावित्रीबाई फुले यांच्याबद्दलही असेच बोलले होते. हळुवारपणे अपमान करत राहायचा. महाराष्ट्रातील आदर्श पुसून टाकण्याचा हा डाव असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.

महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज यांना मानतो. गेले काही दिवस देशात एक-दोन महत्त्वाच्या विषयांवर चर्चा व्हायला हवी. देशाचे कायदेमंत्री यांनी देशाच्या न्यायमूर्तींवर प्रश्नचिन्ह निर्माण केली आहे. या देशाला टी. एन. सेशन यांच्यासारख्या निवडणूक आयुक्तांची गरज आहे, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.