MLC Election 2022: खडसेंचा ‘अभिमन्यू’ होणार? फडणवीसांच्या टार्गेटवर नाथाभाऊ, अजित पवारांच्या भूमिकेकडे लक्ष!

| Updated on: Jun 19, 2022 | 4:04 PM

MLC Election 2022: विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपकडून प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड हे निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.

MLC Election 2022: खडसेंचा अभिमन्यू होणार? फडणवीसांच्या टार्गेटवर नाथाभाऊ, अजित पवारांच्या भूमिकेकडे लक्ष!
खडसेंचा 'अभिमन्यू' होणार? फडणवीसांच्या टार्गेटवर नाथाभाऊ
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: राज्यसभेच्या निवडणुकीत संख्याबळ हाती नसतानाही मोठा विजय मिळाल्यानंतर भाजपचं बळ वाढलं आहे. त्यामुळे भाजपने विधान परिषदेसाठी (Maharashtra MLC Election) जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यातच राष्ट्रवादीने एकनाथ खडसे यांना विधान परिषदेच्या मैदानात उतरवल्याने भाजपने पाचवा उमेदवार देऊन आघाडीला आव्हानच दिलं आहे. भाजपने (bjp) पाचवा उमेदवार दिल्याने भाजपचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेसचे नेते भाई जगताप यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. जगताप आणि लाड वगळता आघाडी आणि भाजपचे सर्व उमेदवार पहिल्या पसंतीची मते घेऊन विजयी होणार आहेत. मात्र, असं असलं तरी एकनाथ खडसे (eknath khadse) यांना पाडण्यासाठी भाजपने हालचाली सुरू केल्याने या निवडणुकीची रंगत वाढली आहे. त्यामुळे नाथाभाऊंचा अभिमन्यू होणार का? फडणवीसांची खेळी यशस्वी ठरणार का? अजित पवार हे फडणवीसांची खेळी उधळवून लावणार का? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.

विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपकडून प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड हे निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. शिवसेनेने सचिन अहिर आणि आमशा पाडवी, राष्ट्रवादीने एकनाथ खडसे, रामराज नाईक निंबाळकर आणि काँग्रेसने चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप यांना उमेदवारी दिली आहे. दहा जगांसाठी ही निवडणूक होत आहे. मात्र, भाजपने पाचवा उमेदवार दिल्याने निवडणुकीची रंगत वाढली आहे.

हे सुद्धा वाचा

खडसे टार्गेटवर

या निवडणुकीत भाई जगताप आणि प्रसाद लाड यांच्या थेट लढत होणार आहे. अटीतटीच्या लढतीत कोण जिंकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. लाड यांना 27 मतांची गरज आहे. भाजपकडे ही मते नाहीत. तरीही भाजपने लाड यांच्यासाठी ही मते मिळवण्याकरिता मोर्चेबांधणी सुरू केली आहे. हे करत असतानाच खडसे यांना पराभूत करण्यासाठीही भाजपने रणनीती आखली असल्याचं सांगितलं जातं. खडसे हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या रडारवर आहेत. त्यामुळे खडसेंना पाडण्यात फडणवीस यशस्वी ठरतात की उपमुख्यमंत्री अजित पवार फडणवीसांची खेळी उलटवून लावतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सध्या तरी आकडेवारीनुसार राष्ट्रवादीचे दोन्ही आमदार सेफ झोनमध्ये आहेत. अपक्ष आणि समाजवादी पार्टीच्या मतांमुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही उमेदवारांकडे पुरेशी मते असल्याचं सांगण्यात येत आहे.

खडसेंच्या भेटीगाठी

निवडणुकीला अवघे काही तास उरलेले असताना एकनाथ खडसेही सक्रिय झाले आहेत. रामराजे नाईक निंबाळकर यांच्या पाठोपाठ खडसे हे बविआचे नेते हितेंद्र ठाकूर यांना भेटायला वसईत गेले आहेत. बविआकडे तीन मते आहेत. ही मते आपल्याला मिळावीत यासाठी खडसे हे ठाकूर यांना भेटण्यासाठी गेले आहेत. त्यामुळे खडसे हे ठाकूर यांना आपल्याकडे वळवण्यात यशस्वी ठरतात का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

अजितदादांचं वन टू वन

राष्ट्रवादीच्या उमेदवारांना कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार स्वत: मैदानात उतरले आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे दिल्लीत गेले आहेत. ते उद्याही मुंबईत नसतील. त्यामुळे आपल्या आमदारांना सांभाळण्याची सर्व जबाबदारी अजित पवारांवर आली आहे. अजित पवार हे आमदारांना भेटण्यासाठी हॉटेलात गेले आहेत. यावेळी ते आमदारांशी वन टू वन चर्चा करणार आहेत. त्यांच्या समस्या जाणून घेतानाच त्यांना विश्वासातही घेण्यात येणार आहे. शिवाय अजित पवार हे अपक्ष आमदारांशीही चर्चा करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.