सेटलमेंटनंतर आंदोलन मागे? जरांगेंवर गंभीर आरोप; अजय महाराज बारस्करांनी उडवली खळबळ
मनोज जरांगे पाटील यांनी 20 दिवसांचे उपोषण मागे घेतले असले तरी जरांगेंवर आता यामुळे आरोप केले जात आहेत. मराठा अभ्यासक अजय महाराज बारस्कर यांनी जरांगेंवर 'सेटलमेंट' केल्याचा आरोप केला आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी संबंधित वाळू माफिया आणि ईडी चौकशी टाळण्यासाठी जरांगेंनी उपोषण सोडल्याचा आरोप बारस्करांनी केला आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी 20 दिवसानंतर आमरण उपोषण मागे घेतलं आहे. त्यामुळे सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. जरांगे यांनी सरकारला मागण्या मान्य करण्यासाठी वेळ दिला असून सरकारनेही ठरलेल्या वेळेत मागण्या मान्य करणार असल्याचं मान्य केल्यानंतर जरांगे यांनी उपोषण मागे घेतल्याचं सांगितलं जात आहे. पण मराठा आरक्षणाचे अभ्यासक अजय महाराज बारस्कर यांनी मात्र जरांगे यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे. सेटलमेंट झाल्यानंतर जरांगेंनी आंदोलन मागे घेतल्याचा मोठा दावा बारस्कर यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे. बारस्कर यांनी पत्रकार परिषद घेऊन हा आरोप केला आहे.
अजय महाराज बारस्कर यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक खळबळजनक दावे केले आहेत. अखेर 20 दिवसानंतर उपोषण नाट्य संपलं आहे. अंतरवाली सराटीच्या सरपंचाचा मुलगा आणि कंत्राटदार यांनी मिळून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यााशी सेटिंग केली. वाळू माफिया आणि ईडी चौकशी या मुद्द्यावरून सेटिंग झाली आहे. आता ईडीची चौकशी होणार नाही. बंद खोलीत जरांगेंची सेटलमेंट झाली, असा आरोप अजय महाराज बारस्कर यांनी केला आहे.
ईडीची चौकशी होणार नाही
पांडुरंग तारक यांच्याकडे ड्राफ्ट देतो असं जरांगे म्हणाले. तारक यांचा अभ्यास काय आहे? आता ईडीची चौकशी बंद करण्यासाठी लाभार्थी टोळीने सेटलमेंट केली. चोरी करणारा अत्यंत सावधगिरीने चोरी करतो, असं सांगतानाच सरकारने त्यांना काहीच आश्वासन दिलं नाही. जरांगे लोकांना वेड्यात काढत आहेत, असा दावाही बारस्कर यांनी केला.
जरांगेंचा अहंकार जिंकला
मराठ्यांच्या आरक्षणाच्या आंदोलनाचं नेतृत्व बुद्धीहिन माणसाकडं आलं आहे. जरांगे हा कुटील, कपटी माणूस आहे. आज मराठा समाज नाही, तर जरांगे यांचा अहंकार जिंकला. जरांगे यांचा लढा सोबतच्या लोकांना राजकारणात आणण्यासाठी आहे. जरांगे ब्रह्मराक्षस बनून आपल्या डोक्यावर बसले आहेत. ते भाजपचं पाळीव कुत्रं झाले आहेत. जरांगेंना मोठं करण्यात भाजप सरकारचा मोठा हात आहे, असा हल्लाच बारस्कर यांनी केला.
विखेच सूत्रधार असावेत
या आंदोलनामुळे जरांगे आणि त्यांच्या साथीदारांचा फायदा होत आहे. जरांगे यांची पहिली स्क्रिप्ट बारामतीहून आली होती. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी स्क्रिप्ट दिली. आता ते शिंदेंना शिव्या देत आहेत. आता तुम्ही विखे पाटलांवर प्रेम करा म्हणता. त्यामुळं यामागे विखे सूत्रधार असावेत, असा आरोप दावाही त्यांनी केला.