नागपूरकरांनो, विमान प्रवासाचा प्लॅन करताय? थांबा… एअरलाईन्सचा मोठा निर्णय

नागपूरकरांना मोठा झटका! इंधन दरवाढीमुळे १ जूनपासून नागपूर-मुंबईसह बंगळुरू, हैदराबाद आणि कोलकात्याच्या अनेक विमानफेऱ्या बंद होणार आहेत. वाचा सविस्तर वृत्त.

नागपूरकरांनो, विमान प्रवासाचा प्लॅन करताय? थांबा... एअरलाईन्सचा मोठा निर्णय
nagpur airport
| Updated on: May 22, 2026 | 12:43 PM

नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अत्यंत वाईट बातमी आहे. सातत्याने वाढणाऱ्या विमान इंधनाच्या दरांचा मोठा फटका हवाई क्षेत्राला बसला असून विमानांचा संचालन खर्च तब्बल ५५ ते ६० टक्क्यांवर पोहोचला आहे. या वाढत्या खर्चामुळे विविध विमान कंपन्यांनी नागपूरहून उडणारी अनेक महत्त्वाची विमानं येत्या १ जूनपासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात मुंबई, बंगळुरू, हैदराबाद आणि कोलकाता यासारख्या प्रमुख शहरांचा समावेश आहे. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होणार आहेत.

एअर इंडियाच्या मुंबई फेऱ्या दोन महिन्यांसाठी रद्द

नागपूर-मुंबई हा राज्यातील अत्यंत व्यस्त आणि महत्त्वाचा हवाई मार्ग मानला जातो. मात्र, एअर इंडियाने १ जून ते ३१ जुलै या दोन महिन्यांच्या कालावधीत नागपूर-मुंबई मार्गावरील सकाळच्या आणि संध्याकाळच्या दोन्ही नियमित फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता घेतलेल्या या निर्णयामुळे व्यावसायिक, उद्योजक, विद्यार्थी, रुग्ण आणि नोकरदार वर्गासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. यामुळे मुंबईत दिवसाची कामे आटपून रात्री परतणाऱ्या प्रवाशांची यामुळे मोठी गैरसोय होणार आहे.

बंगळुरू, हैदराबाद आणि कोलकात्याची कनेक्टिव्हिटी तुटणार

फक्त मुंबईच नव्हे, तर दक्षिण आणि पूर्व भारताला जोडणाऱ्या विमानांनाही या कपातीचा फटका बसला आहे. नागपूरहून बंगळुरूला जाणाऱ्या चार फ्लाईट्स अनिश्चित काळासाठी बंद होणार आहेत. एअर इंडियाची नागपूर-बंगळुरू रात्रीची फ्लाईट १ जूनपासून, तर इंडिगोची रात्रीची बंगळुरू फ्लाईट १६ जूनपासून बंद होईल.

तर हैदराबादवरून दुपारी ३.०५ वाजता नागपुरात येणारी आणि नागपूरहून दुपारी ३.३५ वाजता हैदराबादसाठी उडणारी फ्लाईट १६ जूनपासून बंद करण्यात येणार आहे. त्यासोबतच येत्या १ जूनपासून कोलकात्याला जाणारी फ्लाईट पूर्णपणे बंद होणार आहे. तर अहमदाबादला जाणाऱ्या रात्रीच्या फ्लाईट्समध्येही मोठी कपात करण्यात आली आहे.

तिकिटांचे दर कडाडणार; रेल्वेवर ताण वाढणार

ऐन सुट्यांच्या आणि गर्दीच्या हंगामात एकदम अनेक विमानांच्या फेऱ्या बंद झाल्यामुळे उपलब्ध आसनसंख्या कमालीची घटणार आहे. याचा थेट परिणाम विमान तिकिटांच्या दरांवर होणार असून, तिकिटे प्रचंड महागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेषतः ऐनवेळी प्रवास करणाऱ्यांना दुप्पट-तिप्पट भाडे मोजावे लागू शकते. विमानांचे पर्याय संपल्यामुळे प्रवाशांनी आता रेल्वे आणि खासगी ट्रॅव्हल्सकडे मोर्चा वळवला आहे, ज्यामुळे रेल्वेच्या आरक्षणावर आणि इतर वाहतूक व्यवस्थांवर प्रचंड ताण निर्माण होणार आहे.

प्रवासी आणि व्यापारी संघटनांमध्ये तीव्र संताप

दरम्यान नागपूर शहरासाठी मुंबई, बंगळुरू आणि हैदराबादसारख्या व्यावसायिक शहराशी थेट हवाई जोडणी असणे अत्यंत गरजेचे आहे. असे असताना अचानक सेवा बंद केल्यामुळे व्यापारी आणि प्रवासी संघटनांनी एअर इंडिया आणि इतर कंपन्यांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. विमान कंपन्यांनी या निर्णयाचा पुनर्विचार करावा आणि तातडीने पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. दरम्यान, या रद्द केलेल्या सेवा पुन्हा कधी सुरू होणार, याबाबत विमान कंपन्यांकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

Follow Us