विदर्भ होरपळला, नागपुरात 24 तासांत 3 जणांचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

नागपुरात तापमानाचा पारा ४५.५ अंशांवर पोहोचला असून गेल्या २४ तासांत उष्माघाताने ३ जणांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. विदर्भात पुढील ४ दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे.

विदर्भ होरपळला, नागपुरात 24 तासांत 3 जणांचा मृत्यू; नेमकं काय घडलं?
Nagpur heat wave
| Updated on: May 20, 2026 | 10:11 AM

सध्या संपूर्ण विदर्भासह नागपुरात उन्हाचा तीव्र तडाखा पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासांत नागपूर शहरातील तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे मंगळवारी नागपूरचा पारा थेट ४५.५ अंश सेल्सिअसवर पोहोचला होता. या वाढत्या तापमानामुळे आणि तीव्र उकाड्यामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. त्यातच नागपूर शहरातील वेगवेगळ्या भागात तीन व्यक्तींचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या तिघांचाही मृत्यू उष्माघाताने (Heat Stroke) झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

वेगवेगळ्या भागात आढळले मृतदेह

गेल्या २४ तासांत नागपुरात ३ व्यक्तींचे मृतदेह आढळले आहेत. नागपुरातील लकडगंज, गणेशपेठ आणि राणा प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांना हे मृतदेह बेवारस आणि बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. यात लकडगंज या ठिकाणी ४० वर्षीय पुरुष बेशुद्ध अवस्थेत आढळला. तर गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुमारे ५५ वर्षीय महिला बेशुद्ध अवस्थेत सापडली. त्यासोबतच राणा प्रतापनगर भागात एका ४५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळला.

पोलिसांनी या तिघांनाही तातडीने सरकारी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी अंती त्यांना मृत घोषित केले. या तिघांचा मृत्यू तीव्र उष्णतेमुळे म्हणजेच उष्माघाताने झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. हे तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. त्यामुळे आता हा शवविच्छेदन (Post-Mortem) अहवाल आल्यानंतरच यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

विदर्भातील ३ जिल्ह्यांमध्ये पारा ४६ पार

सध्या विदर्भात सूर्याचा प्रकोप पाहायला मिळत आहे. काल विदर्भातील ३ जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा ४६ अंश सेल्सिअसच्या पार गेला होता. तर नागपूरसह अन्य तीन जिल्ह्यांमध्ये तो ४५ अंशांच्या पुढे नोंदवला गेला. या वातावरणात आता एसी आणि कुलरसारखी साधनेही निकामी ठरत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर याचा गंभीर परिणाम होत आहे. उष्माघाताचा धोका वाढल्याने नागरिकांनी दुपारच्या वेळी काळजी घ्यावी. तसेच आवश्यक काम असल्यास सोयीनुसार बाहेर पडावे, असा सल्ला दिला जात आहे.

पुढील ४ दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नागपूरसह संपूर्ण विदर्भात तापमानाचा पारा आणखी वाढण्याची शक्यता आहे. विदर्भात अजून किमान आठवडाभर उन्हाची तीव्रता अशीच कायम राहणार आहे. त्यामुळे पुढील चार दिवस उष्णतेच्या लाटेचा (Heat Wave) इशारा देण्यात आला आहे. नागपुरातील अकोला, अमरावती, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने विशेष अलर्ट जारी केला आहे. विदर्भात पुढील काही दिवस उष्णतेची तीव्र लाट कायम राहील. नागरिकांनी वाढत्या तापमानापासून स्वतःचा बचाव करावा, असा सल्ला हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. श्रीकांत टी. एस. यांनी दिला आहे.

एकीकडे उन्हाच्या झळा सोसाव्या लागत असतानाच दुसरीकडे हवामान विभागाने एक दिलासादायक अंदाजही वर्तवला आहे. विदर्भात दरवर्षी साधारणपणे १५ जूननंतर मान्सूनचे आगमन होते. मात्र, यंदा जूनच्या दुसऱ्या आठवड्यातच मान्सून विदर्भात दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे जूनच्या सुरुवातीला उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.

Follow Us