नागपूर : ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण आणि पदोन्नतीत रद्द झालेलं आरक्षण अशा प्रत्येक मुद्द्यावरुन भाजप नेते राज्य सरकारला घेरण्याची एकंही संधी सोडताना दिसत नाहीये. भाजपच्या एससी सेलचे नेते धम्मपाल मेश्राम यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केलेत. अजित पवार यांच्यामुळेच पदोन्नतीतील आरक्षण गेल्याचा आरोप धम्मपाल मेश्राम यांनी केला. गरज नसताना मंत्र्याची उपसमिती करुन या उपसमितीचं अध्यक्षपद मराठा समाजाच्या अजित पवार यांना कसं? असा सवालही मेश्राम यांनी केला (BJP criticize Ajit Pawar over reservation in promotion).
धम्मपाल मेश्राम म्हणाले, “उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळे पदोन्नतीतलं आरक्षण रद्द झालंय. गरज नसताना यासाठी मंत्र्यांची उपसमिती नेमली आणि त्या समितीचं अध्यक्षपद मराठा समाजाच्या अजित पवार यांना दिलं. मराठा समाजाच्या नेत्याला अनुसुचीत जाती, जमातीच्या समस्या कोणत्या प्रकारे समजणार? या सरकारमुळे पदोन्नतीतलं आरक्षण रद्द झालं. पदोन्नीत आरक्षण मिळालं नाही, तर रस्त्यावर उतरु.”
दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ओबीसी आरक्षणावरुन भाजपवर हल्ला चढवला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपुष्टात ( OBC reservation in local body) आले, याला सर्वस्वी भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे, असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला होता.
नाना पटोले म्हणाले होते, “ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचे हे प्रकरण कोर्टात असताना कोर्टाने केंद्र सरकारला ओबीसींची नेमकी लोकसंख्या किती आहे, याची आकडेवारी मागितली होती. परंतु केंद्र सरकारने ती दिली नाही. ओबीसींची नेमकी लोकसंख्या किती हे कळले पाहिजे असे कोर्टाने सांगूनही भाजप सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले, आकडेवारी दिली नाही. कोर्टाने 1931 ची लोकसंख्या लक्षात घेऊन हा निकाल दिला आहे.” तसेच पुढे बोलताना यामागे ओबीसी समाजाला राजकीय व्यवस्थेपासून वंचित ठेवण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केला.
पटोलेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही टीका केली होती. “घटनेच्या कलम 340 नुसार इतर मागास वर्गाला राजकीय, सामाजिक, शैक्षणिक अधिकार मिळाले आहेत. पण केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून जाणीवपूर्वक ओबीसींवर अन्याय केला जात आहे. यातील वस्तुस्थिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना माहीत आहे. पण ते जाणीवपूर्क खोटे बोलून दिशाभूल करत असून त्यांचे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत.”
“ओबीसींच्या पाठिंब्यावरच भाजपला केंद्रात व राज्यात सत्ता मिळाली. फडणवीसांनी त्यांच्या कार्यकाळात समांतर आरक्षणाचा निर्णय घेत ओबीसींच्या रिक्त जागांची भरती केली नव्हती. त्यामुळे त्यांना ओबीसींचे आरक्षण संपवायचे होते हे स्पष्टच आहे. आता फडणवीस खोटे बोलून राजकारण करून त्यांचे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे पाप लपवण्याचे काम करत आहेत,” असेही पटोले म्हणाले होते.
हेही वाचा :
व्हिडीओ पाहा :
BJP criticize Ajit Pawar over reservation in promotion