मोठी बातमी ! एकनाथ शिंदे सप्टेंबरमध्ये मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होणार?; विजय वडेट्टीवार म्हणाले, ठासून सांगतो…

| Updated on: Aug 19, 2023 | 9:40 AM

कोणत्याही महापुरुषांचा पुतळा बनवताना त्याचा क्ले बनतो. तो पाहून पुतळ्याला मान्यता दिली जाते. भाजपची काही तरी बकबक बकबक चाललीय. भाजप कधी महाराजांचे झाले काय? संभाजी महाराजांबद्दल गोळवलकर गुरुजीने काय लिहिलं हे जरा वाचा.

मोठी बातमी ! एकनाथ शिंदे सप्टेंबरमध्ये मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होणार?; विजय वडेट्टीवार म्हणाले, ठासून सांगतो...
vijay wadettiwar
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नागपूर | 19 ऑगस्ट 2023 : मुख्यमंत्री असतात तेव्हा दोन पैकी एक उपमुख्यमंत्री नसतो. दोन उपमुख्यमंत्री असतात तेव्हा मुख्यमंत्री नसतात. मुख्यमंत्र्यांनी भोजनाचं आवतन दिलं त्याला एक उपमुख्यमंत्र्यांनी दांडी मारली. यावरून राज्यात सर्व काही अलबेल सुरू आहे असं म्हणता येत नाही. सप्टेंबर महिन्यातच राज्यातील मुख्य खुर्ची बदलणार आहे. राज्यात सत्ताबदल होणार आहे. मी ठासून सांगतो राज्यात बदल होणार आहेच, असा दावा राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. वडेट्टीवार यांच्या दाव्यामुळे एकनाथ शिंदे हे सप्टेंबरमध्ये सत्तेतून पायउतार होणार असल्याचं स्पष्ट होत आहे.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा केला आहे. सत्तेच्या हव्यासापोटी, सत्तेच्या खुर्चीसाठी वाट्टेल ते महाराष्ट्रात चाललं आहे. राज्यात काहीच अलबेल नाहीये. येणाऱ्या 15 ते 20 दिवसात महाराष्ट्रात मोठे बदल होतील. राज्यातील जनता हे बदल पाहील. राज्यात मुख्य खुर्ची पासून बदलला सुरुवात होईल. मी खात्रीने सांगतो. सप्टेंबरमध्ये पूर्ण सत्ता बदलेल. सत्ता बदलेल म्हणजे आमची सत्ता येईल असं मी म्हणत नाही. पण खुर्ची मात्र मुख्य बदलेल. हे ठासून सांगतो, असा मोठा दावाच विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्राची पत घालवली

राज्यातील राजकीय वातावरण हे संपूर्ण महाराष्ट्र पाहात आहे. कधी पुण्याचे उपमुख्यमंत्री दांडी मारतात. तर कधी नागपूरचे उपमुख्यमंत्री दांडी मारत आहेत. तिघेही कधी एकत्र येत नाहीत. दोन उपमुख्यमंत्री एकत्र आले की मुख्यमंत्री येत नाहीत. हे सर्व राज्यात चाललं आहे. साधं जेवणासाठी बोलावल्यावरही एक उपमुख्यमंत्री डिनरला जात नाही. याचा अर्थ अलबेल नाहीये. महाराष्ट्रातील जनतेला सत्ताधाऱ्यांचं नाटक आणि तमाशा दिसत आहे. यांनी महाराष्ट्राची पत घालवली आहे, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.

जेवढा हात मारला जाईल तेवढा…

तिन्ही पक्षाच्या महत्त्वकांक्षा आहे. प्रत्येकजण जेवढा हात मारता येईल तेवढा हात मारला जात आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येची त्यांना पर्वा नाहीये. राज्य उद्ध्वस्त करण्याचा हा प्रयत्न आहे. सरकार चालवायचं म्हणून चालवलं जात आहे, अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली.

तेव्हा तोंड शिवलं होतं का?

यावेळी त्यांनी कर्नाटकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या मुद्द्यावरून भाजपवर हल्ला चढवला. कर्नाटकात जो पुतळा हटवला गेला. तो अनधिकृत पुतळा होता. त्या पुतळ्याचा चेहरा आणि महाराजांचा चेहरा यात फरक होता. अनधिकृतपणे तो पुतळा बसवला होता. भाजपने थोडी तरी माहिती घ्यावी. अरे तोंडात आलं बकून दिलं करू नका. मूर्खा सारखे बोलू नका. कर्नाटकात भाजपचं सरकार असताना छत्रपती शिवाजी महाराजांचे 11 ते 12 पुतळे हटवण्यात आले होते. ते अनधिकृत होते. तेव्हा का बोलले नाही? तेव्हा तोंड शिवलं होतं का?, असा सवाल त्यांनी भाजपला केला.